दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

दशक्रिया हा एक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

चित्रपटात क्रियाकर्म करणाऱ्या दोन ब्राह्मणांमधली स्पर्धा असं एक कथानक आहे.  क्रियाकर्म करणारे ब्राह्मण मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळतात असं आणखी एक कथानक आहे. कर्मकांडं, कर्मकांडांचा फोलपणा, अन्याय,त्याचं धर्माशी असलेलं नातं हे तिसरं कथानक. भान्या नामक एक खटाटोपी मुलगा हे चौथं कथानक. नाना धंदे करून हा मुलगा पैसे कमवतो, तो वात्रट असतो, तो त्याच्या वागण्यानं वरील चारही तीन्ही उपकथानकांमधल्या दोषांवर बोट ठेवतो.

दिग्दर्शकाला चार अत्यंत नाट्यमय घटक एकत्र आणून त्यातून एक सलग जैविक कथानक तयार करणं जमलेलं नाही. चित्रपटातलं प्रत्येक उपकथानक एकेक स्वतंत्र चित्रपट व्हावा इतकं सणसणीत आहे.

२०१६ साली मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चिली या देशातून आलेली स्पॅनिश भाषेतली फिल्म प्रदर्शित झाली.  पाच सहा पादरी, एक स्त्री धर्मोपदेश एका घरात कोंबलेले असतात. त्यांनी गुन्हे केलेले असतात. बोभाटा होऊ नये म्हणून या गुन्हेगारांना चर्चनं दूरवरच्या एका घरात ठेवलेलं असतं. ही माणसं उघडी पडू नयेत म्हणून त्यांना दिवसाढवळ्या बाहेर पडायला परवानगी नसते. सूर्य उगवायच्या आधी आणि सूर्य मावळल्यानंतर वावरायचं.  घटना घराच्या चार भिंतीतच घडतात. थरारक प्रसंगांना अगदीच कमी वाव. बरचसं कथानक संवादांमधून आकार घेतं.  लहानपणी बलात्काराचा बळी झालेला एक मध्यम वयीन माणूस घराच्या बाहेर येऊन किंचाळत न्याय मागत असतो. प्रेक्षक हादरतो.

क्लब या चित्रपटातलं प्रत्येक माणूस आणि त्याचे गुन्हे हे एकेक स्वतंत्र कथानक होतं. अत्यंत नाट्यमय.  चर्च हे आणखी एक महाकथानक. तेही नाट्यमय. अनेक तुकडे. दिद्गदर्शकानं कौशल्यानं त्या घटकांमधून एक सलग कथानक तयार केलं. चांगली पटकथा होती म्हणून ते जमलं.

चांगली पटकथा कशी असावी याचा फॉर्म्युला नसतो. चांगली पटकथा आणि दिद्गर्शन या गोष्टी सिनेशाळेत शिकून घडत नसतात. पण जमलेला सिनेमा पटकन कळतो. क्लब हा सिनेमा पटकन कळला, प्रेक्षकावर ठसला. दशक्रिया तसा ठसत नाही.

जे कथेचं तेच पात्रांचं. दोन किरवंत ब्राह्मण. एक सावकार. नदीवर प्रेताची राख गाळून पैसे मिळवणारा मुलगा. डोकी भादरणारा न्हावी. बटबटीत जाड स्ट्रोक्सनी काढलेली चित्रं. ही माणसं, त्यांची घरं,त्यांचे व्यवहार तुटक तुटक रीतीनं दिसतात, ती माणसं समजत नाहीत. त्यांच्या घरांचे तपशील पडद्यावर दिसत नाही. भांडी हवीत, ही घ्या भांडी. कोरी करकरीत. भाकऱ्या हव्यात, ही घ्या चूल आणि तवा. दारू पिण्यासाठी जागा हवी. हे घ्या टेबल आणि बाक. दारूच्या दुकानाच्या पाटीवर कुठल्याही दुकानाच्या पाटीवर असतो तसा  रजिस्ट्रेशन नंबर नाही.  सराफाचं दुकान हवंय. हे घ्या एक कपाट आणि त्यात ठेवलेले चार दागिने. गावात एक मयत झालंय, ही घ्या तिरडी आणि भेकणारी चार माणसं. कायम दारु पिऊन पडणारा एक माणूस अचानक छान पेटी वाजवतांना दिसतो. एक दुसरा दारुडा अचानक तबला वाजवू लागतो. त्याचे खांदे हलवणं आणि ताल याचा  संबंध नसतो.एका किरवंताबरोबर एक बाऊन्सर असतो. टीशर्ट, पायजमा. तो लोकांना मारायचा उद्योग करत असतो. थेट बाहुबली किवा सलमान सारखा. पैठणात हा माणूस कसा आला. अशानं  चित्रपट उभा रहात नाही.

चित्रपट गंभीर आहे की विनोदाच्या अंगानं गंभीर गोष्टी मांडणारा आहे? दशक्रिया चित्रपटात यजमानांना बोलावणं, त्यांच्याशी होणारा संवाद, ब्राह्मणांमधले आपसातले संवाद अशी कित्येक दृश्यं प्रेक्षागृहात हशा पिकवतात. पण त्या दृश्याचं पार्श्वसंगित मात्रं प्रचंड गंभीर आणि दुःखपोषक. चित्रपटाची हाताळणी घोटाळ्यात टाकते.

पैठणच्या खेड्यातली माणसं गंभीर तात्विक विवेचन केल्यासारखं बोलतात. छोटा भान्याही.

चित्रपटात गाणं असायलाच हवं हे कोणी ठरवलं? कधी काळी तो एक फॉर्म्युला होता. अजूनही भारतीय चित्रपटात गाणी असावीत असं जनता म्हणते.  गाण्याला योग्य  जागा हवी आणि गाणी पहाण्याऐकण्यासारखी हवीत. तेंडुलकरांच्या घाशीराममधे एका रांगेत उभे राहून ब्राह्मण गाणं म्हणतात. एक तर ते नाटक होतं. दुसरं म्हणजे नाटकाचा बाज असा होता की त्यात संगीत आणि नृत्याचे नाना प्रकार अंगभूत होते. गाणी, गाणारे, नाचणारे, कोरियोग्राफी, सारं काही कसलेलं होतं. दशक्रियेतला घाटावरचा नाच सिनेमातला नव्हता,  दर्जाला कमी पडला. गाण्यातल्या  प्रेक्षकांतले लोक शाळेत शारीरीक शिक्षणाच्या वर्गासारखे रांगा करून कां बसतात? शिस्तीत  एकाच प्रकारे डोलून नाचात कां भाग घेतात?

चित्रपटातली प्रमुख पात्रं चित्रपट, टीव्ही या क्षेत्रात वावरणारी आहेत. ती काम उरकल्यागत अभिनय करतात. भारतीय सिनेमात अनंत नट नट्या स्वतःचा एक साचा घेऊन वावरत असतात, त्यांच्या प्रसिद्धपणाला  दिद्गर्शक शरण गेलेला असतो. बरेच वेळा अमिताभ बच्चन हा दांडगा नट कॅमेऱ्यासमोर आला की दिद्गर्शक भारावतो, बच्चन यांना त्यांच्या मनास वाटेल ते करायला परवानगी देतो.  पण पिकू आणि पिंक या चित्रपटातल्या बच्चन यांच्या भूमिका पहा. दिद्गर्शकाला नटाकडून काय काढून घ्यायचंय ते बरोब्बर माहित होतं. त्यानं बच्चनांच्या अभिनय कौशल्याला आपल्या डोक्यातल्या पात्रासासारखं वागायचं वळण लावलं.

अलिकडं चित्रपटात अगदी दहा पंधरा सेकंदासाठी दिसणारं पात्रंही नीट वठवणारे कलाकार निवडले जातात. दशक्रियामधे कलाकार निवडतांना काळजी घ्यायला हवी होती.

नाटक या कलाप्रकाराच्या अंगभूत मर्यादांमुळं हालचाली रेखीव करणं, संवाद वरच्या पट्टीत फेकणं इत्यादी गोष्टी आवश्यक ठरतात. सिनेमात कॅमेरा असतो, मायक्रोफोन असतो, नाटकाच्या मर्यादा सिनेमावर नसतात. दशक्रिया  पहाताना आपण नाटक पहातोय असा भास अनेक वेळा होतो. मराठी चित्रपटांबाबत ते नेहमीच घडतांना दिसतं. मराठी चित्रपट आणि टीव्ही या दोन्ही माध्यमांत नाटकांचा प्रभाव दिसतो, त्यांना अजून चित्रपट माध्यम पुरेसं समजलेलं नाही असं वाटतं. पात्रं कॅमेऱ्यात पाहून बोलतात, वावरतात. संवादफेकही वरच्या आवाजात, नाटकातल्यासारखी असते.दशक्रियामधे माणसं कॅमेऱ्याला सामोरं जात रांगेत उभी रहातात.

जगात कोणतीही गोष्ट एका सरळ रेषेत नसते, अनेक दिशा, अनेक रेषा, अनेक पदर असतात. ते पदर, त्या रेषा यांतून एक जैविक कथन गुंफावं लागतं. ते फार कष्टाचं असतं. अनंत गुंते एकादा कवी एकाच शब्दात किंवा एकाच ओळीत आणतो तेव्हां कवीला कित्येक महिने-वर्षं त्यावर खर्च करावी लागत असतात. अरूण कोलटकर यांच्या असंख्य कविता एकादा शब्द पक्का न झाल्यानं अप्रकाशित राहिल्या. सिनेमात तर शेकडो दृश्यं, शेकडो सेकंदांची दृश्यं, शेकडो सेकंदांचे संवाद आणि ध्वनी गुंफायचे असतात. दहा सेकंदांचं दृश्य पुढे मागं झालं, अनावश्यक ठरलं, कळलं नाही तरी घोटाळा होतो. दशक्रिया चित्रपट अधिक घट्ट विणला जायला हवा होता. पात्रं आणि घटना ढिगासारखी एकत्र केल्यागत वाटतात.

दशक्रियाच्या कथानकात दणदणीत चित्रपटाची क्षमता आहे, अधिक चांगला चित्रपट त्यातून होऊ शकला असता.

चित्रपटावर जातीच्या मुद्द्यावर वाद चाललाय. सैराट एक चांगला चित्रपट आहे. त्यावरही विनाकारण जातीच्या मुद्द्यावर चर्चा झाली.वाद घालणारी माणसं जाणकार दिसत नाहीत, टाईमपास दिसतात. माध्यमं आणि राजकीय पुढारीही नको त्या गोष्टीसाठी या वादात पडतात. दिद्गर्शकानं त्याच्या परीनं चित्रपट हाताळला आहे. दिग्दर्शकाला काही म्हणायचं आहे. ते भले त्याला जमलं नसेल पण  ते म्हणण्याचा त्याचा अधिकार शाबूत ठेवायला हवा. झुंडशाही होता कामा नये.

कला आणि निर्मिती हे राजकारण आणि झुंडींचे प्रांत नव्हेत.

या निमित्तानं चांगले चित्रपट, चांगली निर्मिती कशी असले यावर विचार विनिमय व्हायला हवा. लोकांनी भरपूर चित्रपट पहायला हवेत, मोकळेणानं, मोकळेपणानं आस्वाद घ्यायला हवा. या प्रक्रीयेतून चांगले सिनेमे, चांगल्या कलाकृती घडतील.

दशक्रिया  आवडला नसेल तर कारणं सांगत तसं म्हणायला हवं. त्यात सुधारणा व्हाव्याशा वाटल्या तर तेही सांगायला हवं. तो  आवडला असेल तर तेही  प्रामाणिकपणे (जाहिरातबाजीचा भाग म्हणून किंवा भाबड्याभोळसटपणानं नव्हे) सांगायला हवं.

त्यासाठी अर्थातच दशक्रिया पहायलाही हवा.

।।

 

 

 

 

 

 

 

12 thoughts on “दशक्रिया. अधिक चांगला चित्रपट होऊ शकला असता.

  1. निळूजी खूप छान लिहिलं आहेत.
    दशक्रिया सिनेमाच्या निमित्ताने चित्रपट, त्यातल्यात्यात मराठी चित्रपटाबद्दल,भाबड्या रसिकांबद्दल खूप हळुवारपणे अंजन घातले आहेत.
    धन्यवाद
    अजित सातभाई

  2. काय सुंदर शैली आहे! ही प्रतिक्रिया मी आधीच दिली आहे असे सर्च काका म्हणतात ते खरेच आहे.सर्च काकाना अक्कल नसते.

  3. निळू,
    तुमच्या लेखावरून दशक्रिया बघितला पाहिजे असे जाणवले.
    अ.पां.देशपांडे

  4. अशा परीक्षणा मुळे चित्रपट पाहताना आपला दृष्टिकोण कदाचित थोड़ा बायस होइल पण कला कृति चा आस्वाद सर्वांगाने घेता येइल हे मात्र निश्चित .

  5. या लेखाने चित्रपट कसा बघावा आणि समिक्षण कसे लिहावे याचा एक सुंदर पाठ आपण घेतला आहे.

  6. समिक्षा नजर घडवण्यासाठीचं साधन ठरावी. चित्रपट पाहणे, अशी समिक्षा वाचून पाहणे..नक्की फरक असतो.

  7. सुंदर समिक्षा याला म्हणतात परीक्षण

  8. सर,
    मधातून कडुनिबांचा रस दिलाय कि,
    कडुनिंबातून मध दिलाय…असो
    दोन्ही सामाजिक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
    खूपच सुंदर…

  9. सुंदर समिक्षा ! तुमचं सर्वच् लेखन मला आवडतं !

  10. I didn’t know you were such a fine film-critic. Congratulations! Much better & more insightful than some so-called film-critics
    Prabhakar Paranjpe

Leave a Reply to Vijay Pandharipande

Your email address will not be published. Required fields are marked *