वासुदेव बळवंतांचं कीर्तनचरित्र

वासुदेव बळवंतांचं कीर्तनचरित्र

क्रांतीकारक वासुदेव
फडके यांचं कीर्तनचरित्र
||||
क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचं  निधन १८८७ साली एडनच्या तुरुंगात झालं. त्यांचं १९५२ साली लिहिलेलं चरित्र नुकतंच बडोद्यात हाती लागलं.
हे चरित्र म्हणजे रूढार्थाचं चरित्र नाही. ते कीर्तनाच्या रुपात लिहिलेलं आहे. लेखक कीर्तनकार असल्यानं त्यांनी कीर्तनाचा फॉर्म निवडला.
विषय वासुदेव बळवंत फडके. काव्याच्या भोवती गुंफलेला.अभंग. त्या अभंगाचं निरूपण. विषय ओळख. नंतर ओवी. ओवीचा अर्थ.  विषय. नंतर आर्या.  विषय.  पोवाडा. विषय. अशा रीतीनं आख्यान पुढं
सरकतं. असं करत करत ३२८ पानांचं पुस्तक संपतं. अभंग, आर्या, ओव्या इत्यादी देतांना त्यांचे छंद, गाण्याचे प्रकार लिहिलेले आहेत. कीर्तन करणारा माणूस या पुस्तकाच्या आधारे कीर्तन करू शकतो. पूर्ण पुस्तकाचं कीर्तन करायचं कदाचित पंधरवडा किंवा महिना 
खर्ची पडेल.
वासुदेव बळवंतांचे दोन फोटो काढले गेले. एक फोटो ब्रिटिशांनी तुरुंगात काढला होता. एक फोटो वासुदेव बळवंतांचे चाहते गुळवे यांनी स्वतःच्या घरात काढवून घेतला होता.   वासुदेव बळवंत गाणगापुरात अज्ञातवासात असताना गुप्तपणेच ते गुळवे यांच्याकडं पनवेलला गेले होते. तिथं  गुळवे यांनी त्यांचं छायाचित्र काढवून घेतलं. हेच चित्रं लोकमान्य टिळकांकडं होतं.  त्या चित्राच्या मागं लोकमान्यांनी  लिहिलं होतं – काशीकर बाबा.  काशीकर बाबा हे वासुदेव बळवंतांचं अज्ञातवासातलं नाव होतं. कीर्तन चरित्राच्या मुखपृष्ठावरचं चित्र त्याच छायाचित्रावरून तयार केलं असावं. (तसा उल्लेख लेखकानं केलेला नाही.)
वासुदेव बळवंत जिवंत असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचं नावंही उच्चारणं अशक्य  इतका ब्रिटिशांचा दरारा होता. त्यांचं पहिलं त्रोटक चरित्र  कृष्णाची आबाजी गुरुजी यांनी प्रसिद्ध केलं. त्यानंतर ठाण्याचे रा.ग.बोरवणकर यांनी 
१९३९ साली एक  चरित्र प्रसिद्ध केलं. ही सारी माहिती एकत्र करून, त्या माहितीत भर घालून वि.श्री.जोशी यानी एक विस्तृत चरित्र प्रसिद्ध केलं. त्या चरित्रावर पटवर्धनबुवांनी कीर्तन चरित्र लिहिलं.
चरित्रामधे वासुदेव बळवंतांचं गुणवर्णन आहे, त्यांच्या साहसी जीवनातले प्रसंग ओघवत्या भाषेत, कीर्तनकाराच्या शैलीत वर्णन केले आहेत. देशभक्ती, त्याग, कष्ट हे वासुदेव बळवंतांचे गुण कीर्तनात सविस्तर मांडलेले आहेत. वासुदेव बळवंत जे जे सांगत होते नेमकं ते तेच पुढं सुभाषबाबू, सावरकर, गांधीजी इत्यादी नेते सांगत होते असं कीर्तनकार पुस्तकात वाचकांना सांगतात.
लेखक म्हणतात ‘ द्रव्यदृष्ट्या कीर्तन व्यवसायावर राहून अशी चरित्रे छापून प्रसिद्ध करणे फारच जड, नव्हे तर जवळ जवळ अशक्यच होते. … ते सध्यस्थितीत झेपत नाही. कारण अशी चरित्रे समाजापुढे ठेवल्यानंतर त्यांचा परामर्ष घ्यावा तितका समाज घेत नाही. जुन्याना वाटते की अशी चरित्रं लावणे कीर्तन क्षेत्रात बसत नाही….नवे लोक लघुकथा, कादंबऱ्या इत्यादी उथळ व करमणुकीच्या वाड़मयाचे भोक्ते असल्याने त्यांना हे वावडेच वाटते. प्रस्तुत अधिष्ठित सत्तेच्या ध्यानीं मनीही हे वाड.मय विचारार्ह आहे असे वाटत नाही. तात्पर्य अशा कामाला कोणाचाच पाठिंबा नाही.’ केवळ ईश्वराचाच पाठिंबा आहे असं मानून पदराला खार लावून पटवर्धन बुवांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं.
‘ अशा सत्प्रवृत्ति वाढवणाऱ्या वाञमयावर नफा मिळवणे … पाप आहे असे लेखकाला वाटतें…केवळ प्रचार व्हावा हाच ध्यास.’
‘ आपला भारत, आपली संस्कृति, धर्म, कुळपरंपरा समाजात जिवंत ठेवण्याला समर्थ कीर्तनासारखी दुसरी संस्था नाही असे लोकमान्यांसारख्यांनी बोलून दाखविले आहे…’ हे सर्व ध्यानी घेऊन लेखकानं हे कीर्तन चरित्र लिहिलं आहे.
  लेखक पटवर्धनबुवा १९१० ते १९१४ या काळात वैद्यकीचा अभ्यास करत होते. तेव्हां अण्णासाहेब पटवर्धनांनी वासुदेव बळवंत इत्यादी क्रांतीकारकांचं नित्य स्मरण करत रहा असं सांगितलं होतं. त्या आज्ञेचं पालन हे चरित्र लिहिताना आपण केलं असं हरी भक्त परायण डॉ. पटवर्धनबुवा सांगतात.
स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात   देशसेवा, पारतंत्र्यातून सुटका, ब्रिटीशांना हाकलून देऊन देश स्वतंत्र करणं ही त्या काळातली मुख्य प्रेरणा होती.
पटवर्धनबुवांनी लिहिलेली इतर पुस्तकं अशी होती. कीर्तन पंचक ( किमत १२ आणे), दिनचर्या (किंमत १२ आणे), संत दामाजी (किंमत १२ आणे), नरव्याध तानाजी (किमत १२ आणे). या पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर वंगरत्न नेताजी सुभाष आणि कल्याणकरी अशी दोन पुस्तकं प्रसिद्ध होणार होती.
वाईतल्या यशवंत प्रिंटिंग प्रेसमधे गो.शि.सोहनी यांनी हे पुस्तक छापलंय.
बडोद्यात रहाणाऱ्या निर्मला फडके यांच्या घरात हे कीर्तनचरित्र मिळालं.
          निर्मलाबाई आज ९५ वर्षाच्या  आहेत. त्यांना वाचनाचा नाद आहे. टीव्हीवरच्या मालिका त्या बघत नाहीत. बातम्या आणि चर्चांचे कार्यक्रम त्या पहातात. त्यांना भेटायला गेलं की त्या प्रश्न विचारतात ‘ महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या कां करतात? महाराष्ट्राच्या शेतीची समस्या कशी आहे आणि ती कशी सुटेल?’. शरीर खंगलं असलं 
तरी डोकं एकदम शाबूत. राजकीय पक्षांबद्दल प्रश्न विचारीत. वयोमानपरत्वे त्या आजारी आहेत.  त्या इस्पितळात असताना त्यांच्या रहात्या घरी फडके चरित्र मिळालं. अशी अनेक जुनी जुनी पिवळी पडलेली पुस्तकं त्यांच्या घरात आहेत. जपून ठेवलेली.
निर्मलाबाईंचे दिवंगत पती बाळकृष्ण फडके एक केमिस्टचं दुकान चालवत. त्यांना गाण्याचा नाद होता. बाल गंधर्वांचे, त्यांच्या गाण्याचे ते चाहते होते.  त्यांच्या बडोद्यातल्या घरात बाल गंधर्वांचं गाणं होत असे.
चेहऱ्यावर लावायची पावडर, फेस पावडर, फडके आपल्या केमिस्ट दुकानात विकत असत. या पावडरच्या पाकिटावर 
बालगंधर्वाचं चित्र डकवलेलं असे.
निर्मलाबाईंच्या घरात जुन्या पुस्तकांबरोबर गंधर्वांच्या मूळ रेकॉर्डस आहेत, त्या काळातला रेकॉर्ड प्लेअर आहे.
तर अशा या जुन्या घरात बालगंधर्वांच्या रेकॉर्डच्या पेटीवर फडक्यांचं चरित्र मिळालं.
                            ००

3 thoughts on “वासुदेव बळवंतांचं कीर्तनचरित्र

  1. कुणाही फडकेभक्ताला अगत्य वाटेल असा हा लेख आणि ही माहिती ! धन्यवाद.
    हे मूळ कीर्तनचरित्र आता पुनःप्रसिद्ध व्हावे ही इच्छा.
    मंगेश नाबर

  2. फार महत्वाच्या पुस्तकावरचा एक उत्तम ब्लॉग! पुस्तकाची तुम्ही पाहिलेली प्रत नीट जतन करून ठेवायला हवी. ती अनमोल आहे. शिवाय त्या पुस्तकाचे डिजिटलायजेशन करायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *