शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

शहरातल्या मोकळ्या जागा, गच्च्या,
बाल्कन्या इत्यादी ठिकाणी करता येणारी शेती म्हणजे शहर शेती.
शेती म्हणजे वनस्पती वाढवण्याची सवय
माणसाला कित्येक हजार वर्षांपासून आहे. खतं, जंतुनाशकं, संस्कारित बिया आणि सिंचन या
गोष्टी हाताशी आल्यावर विसाव्या शतकात शेतीबद्दलच्या कल्पना बदलल्या. माहिती तंत्रज्ञानानं
जगातल्या शेतीत गुंतलेल्या अगणित प्रक्रियांची माहिती प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं
गोळा करणं आणि त्या माहितीची तितक्याच वेगानं घुसळण करून वनस्पतीचा वाढीला क्रांतीकारक
दिशा दिली.  
शेतीबद्दलची पारंपरीक
कल्पना आणि व्यवहार आता एकदमच बाजूला पडला आहे. निसर्गानं वनस्पतीच्या उत्पादनावर टाकलेल्या
मर्यादाही नव्या तंत्रज्ञानानं आता दूर सारल्या आहेत. एका बी मधून किती बिया निर्माण
व्हायचा याचे काही नियम निसर्गानं घालून दिले होते. आता तेही नियम नव्या तंत्रज्ञानानं
दूर सारले आहेत. वनस्पतीच्या व्यवहारातला मुख्य घटक सूर्य. नव्या तंत्रज्ञानानं सूर्यालाही
दूर सारून कृत्रीम प्रकाशात पिकं घेण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे.
परिणाम असा की मातीत, जमिनीत होणारी
शेती आता कुठंही होऊ शकते. अन्नाचा अभाव ही गोष्ट आता नव्या तंत्रज्ञानानं नष्ट केली
आहे.
शहर शेतीतली गंमत अशी की माणूस जिथं
रहातो तिथंच त्याला आवश्यक वनस्पती वाढू शकतात. आजवरची पद्धत अशी की दूरवर शेती करायची
आणि शेतमाल ट्रक-रेलवे-विमान-बोटीनं लोकांपर्यंत पोचवायचा. आता शेतमाल वाहून नेणं,
वाहतुक इत्यादी गोष्टीच अनावश्यक ठरल्या आहेत. म्हणजेच पेट्रोलचा वापर, वाहतुक व्यवस्थेमुळं
होणारं प्रदुषण इत्यादी गोष्टी संपल्या.
ब्रुकलिनमधे, लंडनमधे दुकानांच्या
गच्चीवर भाज्या आणि फळं पिकवली जातात आणि तळ मजल्यावरच्या दुकानात विकायला आणली जातात.
वर जाऊन फळं खुडायची आणि ग्राहक हिशोब करतोय तो पर्यंत ताजी फळं आणि भाज्या त्याला
द्यायच्या. अगदी हातगाडी, सायकल किंवा दैनंदिन वाहतुकीच्या साधनांचाच वापर करून माणसाला
हव्या त्या भाज्या, धान्यं फळं मिळणार.
पाणी, खतं इत्यादी इनपुट आणि प्रकाशाच्या
रुपात दिली जाणारी ऊर्जा ( आता एलईडी दिवे ) हे सारे घटक विविध अप्लिकेशन्स वापरून
नियंत्रित केली जातात. याचा एक परिणाम असा की ग्राहकांना हवी असणारी पिकं जेव्हा हवी
असतील त्याच दिवशी खुडण्याची व्यवस्था करता येते. शंभर दिवसात तयार होणारं पीक एकशेपंधरा
दिवस किंवा एकशेवीस दिवस असं केव्हांही काढता येतं. याचा एक अर्थ असा होतो की साठवण
नावाची भानगड संपली. धान्यं, भाज्या, फळं, पानपिकं साठवणं ही एक मोठी खर्चिक समस्या
असते. ती नव्या व्यवस्थेत जवळपास नाहिशी होते. माणसांना कोणत्या गोष्टी केव्हां पाहिजेत
हे आधी कळू शकतं. तशी मागणीही ग्राहक नोदवू शकतात. त्यानुसार नियोजन शक्य होतं. गणपतीच्या
वेळी माणसं काय खातात, दिवाळीत काय खातात, श्रावणात माणसांना काय हवं असतं इत्यादी
गोष्टी आधीच कळत असल्यानं साबूदाणा, वरीचे तांदूळ, ऋषींच्या भाज्या, मोदकांसाठी लागणारा
गूळ, तुळस, कोथिंबिर, दुर्वा इत्यादी इत्यादी सर्व गोष्टी माणसांना जशा आणि जेव्हा
हव्या असतील तशा देण्याची व्यवस्था नव्या तंत्रज्ञानामुळं होऊ घातली आहे.
नव्या तंत्रज्ञानामुळं धान्य, भाज्या,
फळं इत्यादी गोष्टींचा अभाव नष्ट होईल आणि किमतीही नियंत्रणात येतील. अर्थव्यवस्थेला
या तंत्रज्ञानामुळं एक नवं वळण लागणार आहे. आणि हे सारं शहरात शेती व्हायला हवी या
माणसाच्या इच्छेमुळं घडलं आहे.
 मुंबईत चुनाभट्टीत विज्ञान परिषदेच्या गच्चीवर फळबाग
आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या काही इमारतींच्या गच्च्यांवर नाना फळं देणारी मोठ्ठी बाग
फुलली आहे. एके काळी शहरी शेती किंवा गच्चीवरली शेती हे एक नाविन्य नवलाई होती. आता
शहरी शेती मुंबईत, भारतातल्या अनेक शहरांमधे अनेक ठिकाणी उभी राहिलेली दिसते.
 अशी ही शेती केवळ उत्साही आणि हौशी शेती न रहाता
ती किफायतशीर, व्यावसायिक होऊ शकते हेही आता सिद्ध होत आहे. निदान परदेशात तरी.
लंडनमधे क्लॅपहॅम विभागातल्या भुयारी
खंदकात शेती केली जातेय. व्यवसाय म्हणून. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन बाँबिंगपासून
जीव वाचवण्यासाठी जमिनीखाली १०० फुटावर भुयारी खंदक खणले होते. बाँबिंग सुरू झालं की
कुटुंबं या  भुयारात जात. महायुद्ध संपल्यानंतर
हे भुयारी खंदक ऐतिहासिक खुणा झाले होते. आता एक व्यावसायिक या भुयारात शेती करतो.
भुयारातल्या सहा हजार चौरस फुटामधे
ही शेती पसरलेली आहे. ट्रेमधे पसरलेल्या कृत्रीम मातीमधे पोषक द्रव्य मिसळून, त्यात
ओल निर्माण करून बिया पेरल्या जातात.चार पाच दिवसांत बियांची रोपं झाल्यानंतर ती रोपं
दुसऱ्या ट्रेमधे ठेवून एलईडी दिव्यांच्या प्रकाशात ठेवली जातात. दिवसाचे बारा तास रोपांना
प्रकाश मिळतो. पंखे चालवून हवा खेळती ठेवली जाते आणि भुयाराचे तपमान एकवीस ते तेवीस
सेल्सियस दरम्यान राखलं जातं. अठ्ठावीस दिवसात पिकं तयार होतात.
सध्या कोथिंबिर, सॅलड, रॉकेट ही पानपिकं
आणि मुळा ही भाजी घेतली जाते. ताजी ताजी भाजी आसपासच्या स्टार खाणावळींत खोक्यांत भरून
पाठवली जाते. सुरु झाल्यापासून आजवर सुमारे नऊ कोटी रुपयांची भाजी उद्योगानं विकली.
या वर्षी वीसेक कोटी रुपयांचा व्यवहार होईल अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. पुढं चालून
शंभर दिवसांची पिकंही घ्यायची उद्योजकांची योजना आहे.
न्यू यॉर्कच्या ब्रुकलिन विभागात एका
उद्योजकानं गच्चीवर शेती उभी केली आहे. इमारतीला जशा पायऱ्या असतात तशा पाच सात पायऱ्यांचे
स्टँड्स ईडनवर्क्सनं तयार केले आहेत. या पायऱ्यांवर ट्रेमधे खोक्यांमधे झाडं लावलेली
आहेत. हे उपकरण काचेनं झाकून त्यात ग्रीनहाऊस सारखं पर्यावरण तयार केलं आहे. या स्टँडच्या
मागं पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांमधे मासे वाढवले जातात. मासे मरणं, माशांची
विष्टा इत्यादी पाण्यात रहाणाऱ्या गोष्टींवर बॅक्टेरिया प्रक्रिया करतात आणि त्या पाण्याचं
झाडांना पोषक द्रव्ययुक्त पाण्यात रुपांतर करतात. हे पाणी झाडाना दिलं जातं.
रॅकमधील वातावरण आणि पिकांची स्थिती
याचा अभ्यास करण्यासाठी विविध सेन्सॉरचा वापर करणारं एक अप्लिकेशन योजलेलं आहे. हे
उपकरण बाष्प, विविध आवश्यक द्रव्यं, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी घटकांचा अभ्यास करून
वरील सर्व इनपुटचं नियोजन करतं. कोणत्याही पिकामधे सामान्य परंपरेमधे लागणाऱ्या पाण्याच्या
फक्त १० टक्के पाण्यात पिकं निघतात.
वरील पिकं न्यू यॉर्कमधल्या खाणावळी
विकत घेतात.
ईडनवर्क्स या उद्योगानं तयार केलेल्या
या शेतीव्यवस्थेमधे पाच हजार माणसांच्या भाज्या व फळांच्या गरजा ७५ हजार चौरस फुटावरच्या
शेतीमधे भागू शकेल.
 शहर शेतीची कल्पना लोकमानसात रुजवण्याचं श्रेय प्रयोग
परिवाराचे जनक श्री.अ.दाभोलकर यांना जातं. मुंबईतले डॉ. आर टी दोशी आणि मराठी विज्ञान
परिषद या दोघांना सोबतीला घेऊन दाभोलकरांनी परिषदेच्या चुनाभट्टीतल्या इमारतीत आणि
वाद्र्याला डॉ. दोशी यांच्या गच्चीत शेती विकसित केली.
दाभोलकरांना नागरिकांमधे वैज्ञानिक
जागृती करायची होती, वनस्पती कशी वाढते हे समजून सांगायचं होतं. डॉ. दोशी यांना स्वतः
पिकवलेली भाजी-फळं खाण्यातला आनंद नागरिकांना घ्यायला हवा होता.  विज्ञान परिषदेला शहरी शेतीच्या माध्यमातून पर्यावरण
सुधारायचं होतं. दाभोलकरांनी तयार केलेल्या शेती तंत्रामधे घरामधे तयार होणारा जैविक
कचरा वापरला जात होता. उरणारं उष्टं खरकटं, भाज्यांची डेखं आणि साली इत्यादी गोष्टी
पिशवीत घालून त्यात झाड लावल्यानं एकीकडं झाड वाढत असे आणि दुसरीकडं वरील जैविक गोष्टींचं
रूपांतर नैसर्गिक खतमातीत होत असे. प्रत्येक कुटुंबातून दररोज बाहेर जाणारा एक ते दोन
किलो कचरा गटारात न जाता आपल्याच गच्ची-बाल्कनीत जाऊन उपयुक्त खतात रुपांतरीत होणं
हा शहराचं पर्यावरण सुधारण्याचा नामी मार्ग होता.
बाल्कनीत तयार झालेला चार काकड्या
खाणं, पिशवीत तयार झालेली एक मेथीची जुडी भाजीसाठी वापरणं, झाडाला लागलेली चार डाळिंबं
खाणं यात एक और आनंद असतो. भाजीवाल्याकडून आणलेली भाजी आणि आपल्या डोळ्यासमोर तयार
झालेली भाजी यात दिसण्याचा आणि चवीचाही खूप फरक असतो. हा आनंद शहरी शेतीत नागरिकाला
मिळतो. तो तर नागरिकानं घ्यायलाच हवा.
परंतू हा आनंद व्यक्तिगत असतो, त्याच्या
मर्यादा असतात. बाल्कनीतल्या चार चौरस फुटात वाढणाऱ्या झाडांमधे जीव रमवून आपण कित्येक
तास त्यात गुंतवतो. एकादे वेळेस झाडावरचा रोग दूर करण्यासाठी बस किंवा कारनं प्रवास
करून आपण पाच दहा रुपयाचं औषध शे सव्वाशे रुपये खर्च करून आणतो. हे सारं हौस म्हणून
होतं खरं.  परंतू शहराची पर्यावरणाची समस्या,
योग्य किमतीत उत्तम भाज्या हव्या तेव्हा उपलब्ध होणं इत्यादी गोष्टी अशा अकार्यक्षम
हौसेमधून साधत नाहीत.
त्या ठिकाणी न्यू यॉर्कमधल्या ईडनवर्क्स
सारखी व्यवस्था उभारावी लागते. महाग वाटणारं तंत्रज्ञान  वापरावं लागतं. त्यासाठी यंत्र आणि उपकरणं सिद्ध
करावी लागतात. यासाठी गुंतवणूक करावी लागते, श्रम खर्च करावे लागतात. इतकी गुंतवणूक
करायची असेल तर ती गुंतवणूक पेलण्याची क्षमता प्रयोगात असावी लागते. पाच रुपयांच्या
बियांचं पाकीट आणण्यासाठी चार तास आणि पन्नास रुपये खर्च व्हायला लागले तर उभा राहू
शकत नाही, टिकू शकत नाही.
गच्चीत आणि बाल्कनीत निर्माण होणाऱ्या
फळ-भाज्या कुटुंबाची दैनंदिन गरज भागवू शकत नाहीत. ती गरज भागवण्यासाठी शेवटी बाजारातूनच
भाज्या-फळं आणावी लागतात. व्यावसायिक रीतीनं शहरी शेती झाल्याशिवाय त्या गरजा भागणार
नाहीत. हव्या तेव्हां भाज्या फळं मिळायची असतील, त्यांची किमत वाजवी असायला हवी असेल
तर तो सारा शेती व्यवहार व्यावसायिक पद्धतीनंच व्हायला हवा.
नागरिकानं आपल्या बाल्कनीत, गच्चीत
शहर शेती जरूर करावी नव्हे करायलाच हवी. त्या निमित्तानं त्याला वनस्पतीच्या वाढीचं
ज्ञान मिळेल, कायाशास्त्र कळेल. थोडं अधिक पुढं गेल्यास पेशीशास्त्र, जेनेटिक्स इत्यादी
शास्त्रांचीही ओळख होईल आणि नवी तंत्रंज्ञानंही त्याला समजतील. एक लीटरच्या दुधाच्या
प्लास्टिकच्या पिशवीत पंचेचाळीस दिवसांनी मिळणारी काकडी आनंद देऊ शकेल आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा
परिचय करून देईल. ते तर व्हायलाच हवं. पण त्याच सोबत व्यावसायिक शहरी शेतीही प्रचिलत
होईल यासाठी नागरिक या नात्यानं जे काही करावं लागेल तेही नागरिकांनी करायला हवं.

2 thoughts on “शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

  1. Good one. People need to move away from passive entertainment of TV, whatsapp, computer-mobile games to enjoy productive hobbies. There is no difference between work and play except our attitude.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *