शहरं निर्माण करून माळीण दुर्घटना टाळण शक्य आहे.
माळीण गाव निखळलेले दगड आणि माती यांच्याखाली गाडलं गेलं. गाव डोंगराच्या उतारावर वसलेलं होतं. 
सह्याद्री प्रदेश डोंगरी आहे. डोंगर जांभा या ठिसूळ आणि सच्छिद्र दगडांचे आहेत. त्यात पाणी साठतं, भेगा पडतात. हवापाण्याचा परिणाम होतो, दगड तुटतात, माती होते, दगडमाती कोसळतात. कित्येक शतकं म्हणा, कित्येक सहस्रकं म्हणा ही प्रक्रिया घडते आहे. डोंगरात पाणी साठवलं, डोंगर कापून जमीन तयार केली की दगड मोकळे होऊन निसटण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होते.
सह्याद्री प्रदेश डोंगराळ असल्यानं इथे सपाट जमीन कमी आहे. त्यामुळं शेती, उद्योग, वसती या गोष्टी इथे कष्टाच्या, खर्चाच्या आहेत. तरीही माणसं या विभागात वसती करत होती. त्यातले काही लोक  डोंगरांशी समरस झालेल्या लोकसमूहांपैकी होते. काही लोक नाईलाज म्हणून या ठिकाणी बाहेरून वस्ती करण्यासाठी आले होते. डोंगरात रहाणाऱ्या लोकांची रहाणी कालमानानुसार बदलली, त्यांना डोंगरी वस्तूंवर जगणं अशक्य झालं. ही माणसं इतर उद्योग, इतर ठिकाणची कामं करत आणि डोंगरी जमीन सपाट करून काही प्रमाणात शेती करून जगू लागली.
मुळातले डोंगरी किंवा बाहेरून वस्ती करण्यासाठी आलेले लोक अशा या लोकांनी दगड-माती निसटण्याचा अनुभव घेतला होता. त्या संकटात घरं, वसत्या नष्ट झाल्याचा अनुभव त्यांनी घेतला होता. तरीही ही माणसं तिथं रहात होती याचं कारण इतर वसती-संस्कृतीचा अनुभव त्याना नव्हता, कदाचित त्या संस्कृती-जगणं त्यांना मिळू शकलं नव्हतं.
सह्याद्री सारखीच परिस्थिती हिमालयात आहे. तिथलेही दगड ठिसूळ आहेत. तिथंही वस्त्या आणि माणसं माळीणसारखीच नष्ट होत असतात. ही माणसं धोकादायक परिस्थितीत रहात होती हे माळीण दुर्घटनेनंतर ठळकपणे लक्षात आलं. अनेक नद्यांच्याकाठच्या वस्त्याही धोकादायक असतात, पुरात त्या नष्ट होतात. 
अशा धोकादायक ठिकाणी माणसांनी राहू नये, त्यांना तिथून हलवावं असा एक विचार सूक्ष्मपणानं उमटतो आहे. पुनर्वसन. 
पुनर्वसन कुठं करणार? डोंगरात नको, नदीच्या काठी नको. म्हणजे कुठं?  (एक वेळ नदीच्या काठी शक्य आहे. कारण पूररेषेपासून दूर वसती केली तर धोका उरत नाही.) जिथं माणसाना रोजगार मिळेल आणि जगण्यासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध असतील तिथंच माणसं वसती करणार. अशी ठिकाणं कुठं असतात? 
शहर हे अशा वसतीचं ठिकाण असतं. शहरं सामान्यतः सपाटीवर असतात. शहरं सामान्यतः वसवली जातात, प्रयत्नपू्र्वक. काही शहरं पूर्णतया आखून वसवली जातात. काही शहरं सावकाशीनं आकार घेतात. गटागटानं वस्त्या होत जातात आणि वस्त्यांचं शहर होतं. वस्ती करणाऱ्या गटांच्या संस्कृतीनुसार शहरं आकार घेतात. काही माणसं शिस्तीची असतात. ती विचारपूर्वक वस्ती वसवतात. माणसाना किती निवांतपणा असतो, हाताशी किती साधनं असतात यावर  वस्त्यांचं रूप ठरतं. 
 मुंबई-पुणे शहरांत डोंगरउतारावरच्या झोपडपट्याही माळीणसारख्याच असतात, तिथंही दरडी कोसळत असतात.
अशा किती तरी गावं, वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. त्यांना एकाद्या आधीच वसलेल्या शहरात न्यावं लागेल किंवा  नवी शहर वसवावी लागतील.
शहर कां? कारण माणसाला जगण्यासाठी आवश्यक सोयी मोठ्या लोकसंख्येनं गोळा होणाऱ्या समूहाला लवकर आणि कमी किमतीत पुरवता येतात. चाळीस घरांच्या वसतीला दूरवर जाऊन विजेच्या तारा टाकणं, पाण्याची नळी पुरवणं महाग पडतं. त्या गावात मुलांना शाळा हवी असते. वीस मुलांसाठी शाळा पुरवणं शक्य होत नाही. चाळीस घरांसाठी हॉस्पिटल बांधणं शक्य होत नाही. तेव्हां चाळीस घरांची वसती न ठेवता चाळीस हजार घरांची वसती केली तर वीज, पाणी, सांडपाणी, आरोग्य, शिक्षण इत्यादी गोष्टी नीट पुरवता येतात. 
शहरात येणाऱ्या माणसांच्या रोजगाराचं काय? रोजगारही शहरात किवा शहराच्या परिघावर असायला हवेत. जेणेकरून काही मिनिटांच्या प्रवासानं माणसं कामावर येजा करू शकतात.
माणसं शहरात एकत्रित  करा. खेडी, डोंगरं मोकळी सोडा. खेडी आणि डोंगरांवर वनस्पती वाढू द्या. डोंगरात झाडं वाढू द्या, सपाट जमिनीवर पिकं येऊ द्यात. पिकं घेण्यासाठी माणसं आणि यंत्रांची वहातूक खेड्यापासून, डोंगरापासून काही अंतरावर असलेल्या वस्त्यांतून करता येतील. झाडं वाढवण्यासाठी आणि पिकं घेण्यासाठी माणसानं तिथंच राहिलं पाहिजे असं नाही. काही धाडसी विचार करणारी माणसं आता अशा शहरांचा विचार करू लागली आहेत. स्टुअर्ट ब्रँड हा त्यापैकी एक माणूस. तो म्हणतो की जगातली सगळी लोकसंख्या शहरांत केंद्रीत करता येईल, १० टक्के जमिनीवर. उरलेली ९० टक्के जमीन पूर्णपणे निसर्गाला सोडून देता येईल. त्यामुळं प्रदूषणाचा प्रश्नही सुटेल.शहरात गोळा झालेल्या माणसांसाठी नवी तंत्रज्ञानं ऊर्जा, उत्पादनाची साधनं इत्यादी गोष्टी पुरवतील. इमारती पावसाळी पाणी साठवतील, भाज्या फळंही पिकवतील. आजची शेती जमिनीवर पडणारा आडवा सूर्यप्रकाश वापरते. इमारती आणि टॉवर उभा सूर्यप्रकाश वापरतील. वनस्पतींची नवी वाणं वनस्पतीमधून मिळणारं अन्न आणि ऊर्जा दोन्हींची मात्रा आणि प्रमाण वाढवतील.
पूर्वी असं घडलं होतं कां? नाही. पूर्वी नवी तंत्रज्ञानंच नव्हती त्याला काय करणार? उंच इमारत उभी करायची, ती चारही बाजूनी सूर्यप्रकाशाला उघडी ठेवायची, आतमधलं वातावरण नियंत्रीत करायचं या गोष्टींची कल्पनाही दहा वर्षांपूर्वी करता येत नव्हती. अपवाद प्रयोग परिवाराचे दाभोलकर. ते म्हणत होते की टीव्ही टॉवरसारख्या उंच टॉवरच्या वरच्या टोकापर्यंत वेलींची लागवड केली तर त्यातून कायच्या काय भाज्या पिकवता येतील. उभ्या शेतीची कल्पना त्यांनी मांडली होती. ती कल्पना अमलात आणण्यासाठी लागणारी गुतवणूक आणि तंत्रज्ञान त्यांच्या हाताशी नव्हतं येवढीच अडचण होती.
तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि माणसं गोळा करणं असे तीन घटक यात गुंतलेले आहेत. तीनही गोष्टी अशक्य नाहीत. जबरदस्ती न करता, माणसांना समजावून, त्यांना अधिक शहाणं करून हे साधता येणं शक्य आहे. एक तर कल्पनाशक्ती नावाची गोष्ट आपण कुलुपबंद ठेवली आहे. ती मोकळी करावी. गरीबी आणि अभाव या दोन गोष्टींमधे आपण फार म्हणजे फार वर्षं वाढलो असल्यानं चांगलं जीवन शक्य आहे यावरचा आपला विश्वासच उडाला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाणं आपल्या डोक्यात रुतलेलं आहे, सात-चौदा-एकवीस…. तीळ शक्य आहेत हा विचार आपल्याला शिवत नाही.

आणि एक गोष्ट. गोष्टी घडवणं ज्यांच्या हाती असतं ती माणसंच डोक्यानं खुजी आहेत. स्वतःचं-परिवाराचं-आश्रितांचं शॉर्टकटनं भलं करायचं, अनुत्पादक पद्धतीनं भलं करायचं म्हणजेच थोडक्यात भ्रष्टाचार करायचा येवढंच त्यांना समजतं. त्याना वळसा घालून वाट शोधणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. ते जमलं तर माळीण संकट भविष्यात टळू शकेल.

One thought on “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *