इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.

इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.

इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.
 Heretic
Why Islam Needs A Reformation Now
Ayaan Hirsi Ali
Harper Collins.
पेशावरमधील बाच्चा खान शिक्षण संस्थेमधे घुसून तालिबानी घातपात्यांनी तीसेक विद्यार्थ्यांना
ठार मारलं. मेलेले विद्यार्थी मुसलमान होते. मारणारे तालिबानी मुसलमान होते.
सुरवात अल कायदानं केली. अल कायदातून फुटून आयसिसनं स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन केली. अल कायदातून स्फूर्ती घेऊन अल नुस्र फ्रंट, बोको हराम या संघटना स्थापन झाल्या. गेल्या वीसेक वर्षात या संघटनांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, इजिप्त, येमेन, इथियोपिया, सोमालिया,सुदान,नायजेरिया, इंडोनेशिया, सीरिया, इराक, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांत हिंसा माजवली आहे. फार माणसं मारली आहेत. मारलेल्या माणसांत बायका मुलं आहेत, ज्यू-ख्रिस्ती आहेत, मुस्लीम आहेत. या मंडळींचा विचार मान्य नसणारे ते सगळे शत्रू आणि त्यांना नष्ट करण्याचा अधिकार या मंडळींना अल्लानं, कुराणानं दिला आहे असं यांचं म्हणणं.  या मंडळींना सारं जग इस्लाममय करायचं आहे.
एकेकाळी अल कायदानं तालिबानच्या सहाय्यानं अफगाणिस्तानवर अधिकृत राज्य केलं. सध्या आयसिसनं सीरियातल्या राक्का या गावात आपलं अधिकृत खिलाफत सुरु केलंय. अल बगदादी हा आधुनिक खलिफा पश्चिम आशियामधे पुन्हा एकदा ऑटोमन साम्राज्य उभं करण्याच्या प्रयत्नात आहे.
  जगातल्या बहुसंख्य देशात आयसिसनं शिरकाव केला आहे. स्थानिक तरुण तरुणींचे आयसिस गट जगात तयार होत आहेत. त्यांना सीरिया, पाकिस्तान, येमेन, अफगाणिस्तान असं कुठंकुठं प्रशिक्षण मिळतं, प्रेरणा मिळते. मग हे तरूण सीरिया-इराकमधे जातात किंवा पॅरिसमधे किंवा जाकार्तामधे किंवा ट्युनिसमधे पर्यटन स्थळांवर हल्ले करतात.
इस्लामी समाजात दहशतादाला-हिंसेला मूक, अंशतः  पाठिंबा आहे. जग इस्लाम नष्ट करू पहातंय हा आयसिस-अल कायदा इत्यादी संघटनांचा प्रचार मुसलमानांना पटतो. पश्चिमी, ख्रिस्ती, इस्लामेतर जग इस्लामच्या विरोधात आहे असं बहुसंख्य मुसलमानांना वाटतं. भले सगळा मुस्लीम समाज हिंसक नसेल, त्याला सुखात रहायचं असेल. परंतू आयसिस, अल कायदा, तालिबान, इत्यादी संघटनांचा-विचारांचा पूर्ण नायनाट करायला इस्लामी समाज तयार नाहीये असंही दिसतंय.
फार तर असं म्हणता येईल की आयसिस-अल कायदाचा विचार मुसलमानांना पटतो पण त्यांची कामाची पद्धत मुसलमानांना मंजूर नाही.
दहशतवादाचा बंदोबस्त कसा होणार?
लष्करी कारवाई करून?
इस्लामी तरूण मंडळींच्या आर्थिक अडचणी दूर केल्या तर ती हिंसेकडं वळणार नाहीत?
इस्लामी तरूण इतर समाजात मिसळले तर दहशतवादापासून  दूर जातील?
अमेरिका, फ्रान्स, ब्रीटन इत्यादी देशामधे अनेक संस्कृती-धर्म एकत्र नांदतात. तीच या अतिरेकी मंडळींना ताळ्यावर आणण्याची वाट आहे?
‘खरा इस्लाम’ पटवून दिला तर हिंसा थांबेल?
||||||
अयान हिरसी अलीचं म्हणणं आहे की वरील कोणत्याही उपायांनी इस्लामी दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत. इस्लाम या धर्मातच हिंसेला, दहशतवादाला वाव असल्यानं इस्लाममधेच मूलभूत सुधारणा केल्या शिवाय दहशतवाद आटोक्यात येणार नाही असं अयान म्हणतात.
इस्लाम हा मुळातच शांततावादी धर्म नाही असं अयान यांचं म्हणणं आहे.
इस्लामची निर्मिती दोन टप्प्यात झाली, मक्का टप्पा आणि मदिना टप्पा. मक्का टप्प्यात उपास, प्रवचनं, समजावणं, उपकार  या गोष्टीं इस्लाममधे होत्या. महंमद लोकांना समजावत होते, इतर उपासनापद्धतीच्या लोकांशी संवाद करत होते, त्यांना पटवून देत होते, गरजूंना मदत करत होते. मदिना हा टप्पा म्हणजे महंमदांचं राज्य स्थापन झाल्याचा टप्पा. त्या काळात इस्लाम असहिष्णू झाला. इतर धर्माची माणसं आणि इस्लाममधलेही विरोधी मत असलेले यांच्यावर हल्ला करा, त्यांना खतम करा असं महंमदांनी मदिना टप्प्यात सांगितलं.
मक्का इस्लाम म्हणजे शांततेचा इस्लाम आणि मदिना इस्लाम म्हणजे हिंसक इस्लाम अशी विभागणी करून अयान दहशतवादींना मदिना इस्लामी कप्प्यात टाकतात.जगभरात मदिना इस्लामचा प्रभाव जास्त आहे असं अयान यांचं म्हणणं आहे. जे थोडेफार मक्का मुसलमान आहे त्यांना आपलंसं करून मदिना इस्लामवाल्यांना काबूत आणणं अशी अयान यांची खटपट आहे.
अयान हिरसी अलींचं म्हणणं संक्षेपात असं आहे. ‘इस्लाममधे साक्षेपी विचारांची (क्रिटिकल थिंकिंग) परंपरा नाही. माणसानं धर्म-देव निर्माण केला, देवानं-धर्मानं माणसाला निर्माण केलेलं नाही हा वास्तव आणि तर्कशुद्ध विचार मुसलमानांनी केलेला नाही. कुराण हे एक पुस्तक आहे. ते एका महंमद नावाच्या माणसानं एका विशिष्ट परिस्थितीत जगाला सांगितलं आहे. ते माणसानं निर्माण केलेलं पुस्तक असल्यानं त्यातल्या कित्येक गोष्टी कालबाह्य आहेत, अयोग्य आहेत (जिहाद, हुदूद कायदे, स्त्रीला दिली जाणारी वागणूक). पारलौकिक नव्हे तर या जगात कसं जगावं याचा विचार करणं आवश्यक आहे.’
इस्लाममधे आमूलाग्र बदल,सुधारणा व्हाव्यात असं अयानचं म्हणणं आहे. ख्रिस्ती धर्मात मार्टिन लूथर यांनी केलेल्या सुधारणेचे उदाहरण अयान देतात. इस्लाममधेही अशा बदलांची मागणी केलेल्या विचारवंतांचे दाखले अयान देतात.   अशी मागणी करणाऱ्यांना मारून तरी टाकलं जातं नाही तर त्यांना अज्ञातवासात जावं लागतं असे इतिहासाचे दाखले अयान देतात.
या पुस्तकात त्यांनी स्त्रियांना इस्लामी समाजात काय सोसावं लागतं याचे काही ओझरते उल्लेख केले आहेत. स्त्रीला भयानक वागणूक देणं हा व्यवहार कुराणातल्या तरतुदींमुळंच झालेला आहे असं अयान लिहितात.अयान उदारणांनिशी सांगतात की जिहादमधे हिंसेला चिथावणीच आहे असं नव्हे तर जिहाद करणं हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्यच आहे; कुराणात सांगितलेल्या गोष्टी न करणारा माणूस धर्मबाह्य असल्यानं त्याला देहांताची शिक्षा आहे. अयान म्हणतात की कुराणाची मांडणी गोंधळाची आहे.  अनेक परस्पर विरोधी विधानं कुराणात आहेत. परधर्मियांना सांभाळून घ्या,  त्यांना दुय्यम नागरीक ठरवून त्यांच्याकडून कर गोळा करा, त्यांना मारून टाका अशा आशयाची  परस्पर विसंगत  विधानं कुराणात सापडतात.
||||
अयान हिरसी अली अमेरिकेत अत्यंत कडक सुरक्षेत रहातात. त्यांना जिवे मारण्याचा फतवा निघालेला आहे.हा फतवा व्हॅन गॉग या चित्रपट निर्मात्याच्या रक्त बंबाळ शवावर दहशतवाद्यांनी लिहून ठेवला होता. व्हॅन गॉग यांनी नेदरलँडमधे तयार केलेल्या एका चित्रपटावर इस्लामी माणसं आणि दहशवाद्यांचा राग होता. अयाननी व्हॅन गॉगला हा सिनेमा काढण्यात सहकार्य केल्यानं ‘आता तुझा नंबर आहे’ अशी धमकी अयानला उद्देशून देण्यात आलीय.
अयान हिरसी अली ही सोमालियन स्त्री. योनी शिवण्याचा अघोरी प्रकार सोमालियात केला जातो. त्याला अयाननं नकार दिला. तिच्या इच्छेविरोधात तिचं लग्न ठरवलं. अयान पळाली. युरोपमधे गेली. तिथं शिकली. नेदरलँडमधे ती संसदेतही पोचली. तिथं यथावकाश तिच्यावर फतवा निघाल्यानंतर ती अमेरिकेत गेली. नियाल फर्गसन या अमेरिकन लेखकाबरोबर तिनं लग्न केलं. या आधी त्यांनी Nomad आणि Infidel या पुस्तकातून आपली कहाणी सांगितली आहे. अयाननी इस्लामचाही त्याग केला आहे. इस्लाममधे वाढल्यानं, इस्लामचं चटके खाल्ल्यानं इस्लामचा विचार त्यांना सोडवत नाही.
||||
अयान यांचे विचार स्फोटक आहेत. बहुतांश मुस्लीम समाजाला ते मान्य होण्यासारखे नाहीत. त्यांचे विचार मुस्लीम समाज स्वीकारेल असं वाटत नाही. अयानची इच्छा आहे की कुराण नव्यानं लिहावं, त्यात सुधारणा कराव्यात. नवं कुराण आणि नवा इस्लाम मुसलमानानी स्वीकारावा. तसं घडेल अशी शक्यता दिसत नाही. इस्लामी समाजानं स्वतःहून स्विकारलेली कोंडी इस्लामी समाज फोडेल असं दिसत नाही.
 सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मुल्ला यांच्या दबावाखाली इस्लामी समाज वावरत आला आहे. बलवान सत्ताधाऱ्यानं   केलेले/लादलेले बदल मुस्लीम समाज स्वीकारतो असं काही ऑटोमन सुलतानांच्या राजवटीत दिसतं. केमाल पाशानं कुराण नाकारून आधुनिक कायदा तुर्कस्तानमधे लागू केला. तुर्की समाजानं ते मान्य केलं कारण केमाल पाशा लष्करी प्रशासक होता, सैन्याची ताकद त्याच्या हाताशी होती. मुल्लांचा विरोध त्यानं बळाचा वापर करून मोडून टाकला, मुल्ला मंडळी गप्प झाली. आजही इजिप्तमधे लष्करी हुकूमशहा (मुबारक आणि एल सिसी) मुस्लीम ब्रदरहूडला काबूत ठेवतात.
दुसरा अनुभव अमेरिकेतला. अमेरिकेत मुस्लीम पुरुषांनी स्त्रीवर अत्याचार केले आणि शरियाचे दाखले देऊन अत्याचाराचं समर्थन केलं.  अमेरिकन न्यायालयानं  शरीया मान्य न करता अमेरिकन कायद्यांचा वापर करून अत्याचार करणाऱ्यांना पंधरा ते पंचवीस वर्षाच्या कारावासाच्या शिक्षा दिल्या. अमेरिकेत कोणी कोणाचा जीव घेतला (जिहाद करण्यासाठी, काफिरांना मारणं हे धर्मकर्तव्य आहे असं सांगून) तर त्याला अमेरिकेत फासावर लटकावलं जातं, त्याला हुतात्मा म्हटलं जात नाही.
  सौदी, इराण, सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी देशातली सगळी जनता मुसलमान आहे. त्यांचं त्यांचं स्वतंत्र राजकारण आहे. त्या देशातली जनता इस्लाममधे सुधारणा करेल असं वाटत नाही.
इंडोनेशिया, मलेशिया या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत.  तिथल्या शासकांनी दहशतवाद, अतिरेक यांना थारा दिला नाही. इस्लाम आटोक्यात ठेवून तिथल्या सरकारांनी आधुनिक ‘सेक्युलर’ कारभार केला.
अमेरिका, युरोपिय देश, भारत, लंका, ब्रह्मदेश, द. अमेरिका इत्यादी ठिकाणी मुसलमान बहुसंख्य नाहीत, ते तिथल्या इतर धर्मीय-संस्कृतीच्या लोकांसमवेत रहातात. तिथं, तिथल्या देशांनी आपापले सेक्युलर कायदे नीट अमलात आणले तर इस्लामी समाज निदान व्यवहारात तरी सुधारित इस्लाम अमलात आणेल. कदाचित तिथंच अयान यांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा अमलात येऊ शकतील.
भारत ही सुधारणांसाठी पोषक भूमी आहे. हिंदू समाजात कर्मठता आहे, धर्मांधता आहे, त्याच बरोबर मोकळेपणा आणि सहिष्णुताही आहे. घोडेचष्मा आणि मोकळे डोळे अशा दोन परस्परविरोधी प्रेरणा हिंदू समाजात एकत्र नांदत आल्या आहेत. हिंदू समाज कधी मूळ गाभ्यात सुधारणा करतो, कधी मूळ गाभा शिल्लक ठेवून वर्तणुकीत सुधारणा करतो. तणाव आणि ग्रह बाळगून वेगळ्या समाजगटाबरोबर सहजीवनाची सवय हिंदू समाजाला आहे. हिंदूच्या सहवासात राहिल्यामुळं भारतातले मुसलमान  इस्लामी विचार आणि परंपरेला मान्य नसलेल्या कित्येक गोष्टी करत असतात. भारतातल्या मुसलमानांना अरब लोक ‘हिंदू’ म्हणून हिणवतात. कालसुसंगत होण्याचा प्रयत्न हिंदू समाज करत आला, आजही करू पहात आहे. मुस्लीम समाजही त्या प्रवाहात भारतात सामिल होऊ शकतो.त्यासाठी  हिंदूनी कालसंगत होणं  आणि मुसलमानांना सोबत ठेवणं आवश्यक आहे.
००

One thought on “इस्लाम आमूलाग्र बदलायला हवा, अयान हिरसी अली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *