यंदाच्या निवडणुकीबाबतची काही निरीक्षणं.
राजकीय पक्षांनी मतदारांचं रूपांतर
जात-धर्माच्या मतपेढ्यांत करून टाकलं आहे. मतदारही ( अल्पांश अपवाद ) जात वा धर्म
या समूहमानसानंच मतदान केलं. या निवडणुकीपुरतं तरी म्हणता येईल की माणूस समूहात
विरघळला आहे. मतदान करतांना, राजकीय निर्णय घेताना तो समूहमनानं विचार करतो,
व्यक्ति म्हणून निर्णय घेत नाही.
आर्थिक प्रश्नाबाबत राजकीय पक्ष विचार
करायला तयार नाहीत, मतदारही त्याना आर्थिक प्रश्नावर बोला असं ठामपणे बोलले नाहीत.
आर्थिक प्रश्न महत्वाचे अशासाठी की आपल्याला कोणता अर्थविचार हवा आहे याचा विचार
राजकीय पक्ष आणि मतदारांनी करायला हवा. आजघडीला सरकारकेंद्री, काळ आणि पुस्तक यात
अडकलेली समाजवादी, विद्यमान जागतीक वास्वव नजरेआड करणारी, मार्केट आणि तंत्रज्ञान
या घटकांकडं दुर्लक्ष करणारी अर्थव्यवस्था काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी
बाळगली आहे. डावेही तसाच विचार करतात. त्यात बदल होण्याची आवश्यकता आहे.
सामाजिक इतिहास आणि वास्तव यांचं कोडं
भारताला कधी सोडवता आलं नाही. आर्थिक विकास ही गोष्ट जात, धर्म  आणि संस्कृती यांचं स्थान निश्चित करून साधावी
लागेल. त्या बाबत भारतातल्या सर्व पक्षांत गोंधळ आहे. आर्थिक विकासाचा विचार
करताना शिक्षण-आरोग्य-खात्री हे तीन घटक महत्वाचे असतात.तिकडं दुर्लक्ष आहे. जात,
धर्म, भाषा, संस्कृती इत्यादी गोष्टींना राजकीय पक्ष आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व
देतात. यातून वाट काढायची तयारी राजकीय पक्ष दाखवत नाहीत.
अनेकानेक अंगांनी आधुनिक झाल्याशिवाय
गत्यंतर नाही अशी स्थिती आहे. भारतीय मन आणि राजकीय पक्ष आधुनिकतेच्या गोष्टी
करतात पण ती टाळणं, शक्य तर पुढं ढकलणं याकडं त्यांचा कल  आहे.
थोडक्यात असं की देशाला चांगलं जगायचं
असेल तर अत्यंत तातडीनं विचारबदल करायला हवा. तिकडं या निवडणुकीत दुर्लक्ष
झाल्यासारखं दिसतंय.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *