नवी कादंबरी, माओ ते तिएनानमेन काळाचं चित्रण

नवी कादंबरी, माओ ते तिएनानमेन काळाचं चित्रण

 Do Not Say We Have Nothing
Madeliene Thien.
||
यंदाच्या मॅन बूकर पारितोषिकासाठी सहा पुस्तकं निवडली गेली. मेडलीन थियेनची ‘ डू नॉट से वुई हॅव नथिंग ‘ ही कादंबरी त्या निवडीत होती. समीक्षकांना या कादंबरीला बक्षीस मिळेल असं वाटत होतं. पॉल बीटी याच्या ‘ दी सेल आऊट ‘ या कादंबरीची निवड झाल्यानं मेडेलिनचं बक्षिस हुकलं.
‘ डू नॉट से वुई हॅव नथिंग ‘ या ४७२ पानांच्या कादंबरीत लेखिका मेडलीन थियेन यांनी सुमारे पन्नास  वर्षाचा चीनचा तुंबळ इतिहास चितारला आहे. माओ झेडॉंग यांची कम्युनिष्ट क्रांती नंतर मोठ्ठी उडी ( दी ग्रेट लीप फॉरवर्ड) नंतर सांस्कृतीक क्रांती आणि नंतरची १९८९ सालची तिएनानमेन चौक घटना कादंबरीच्या नेपथ्यात आहेत.
 लि लिंग आणि आय मिंग या दोन मुलींचे वडील आणि आजोबा-पणज्यांचं जीवन या कादंबरीत आहे. मुलींच्या आधीच्या पिढ्या गाणाऱ्या, वाजवणाऱ्या, लोककथा सांगणाऱ्या. मुलींचे वडील अभिजात संगितकार. बीथोवन, मोझार्ट यांच्या रचना ते वाजवत, सादर करत. आज्ज्या चहाच्या दुकानात लोकगीतं गात आणि गावात चावडीवर लोककथा सांगत. माओनं या मंडळींना देशोधडीला लावलं. त्यांच्या जमिनी आणि घरं जप्त केली. त्यांचे अनन्वीत हाल केले. अख्ख्या गावासमोर त्यांच्या थोबाडात मारायला लावून, नाकदुऱ्या काढून अपमानित केलं. शांघायमधल्या संगीत शाळा बंद करून, तिथले पियानो आणि व्हायोलिन मोडून जाळून वडिलांना छळछावणीत लोटलं. हे सारं सारं हळुवारपणे या कादंबरीत लेखिकेनं सांगितलेलं आहे. छळाची वर्णनं मोजकी, आकारानं लहान आणि न रंगवता, ओकाबोक न करता मांडलेली आहेत. 
आय मिंग ही टीनएजर तिएनानमेन चौक घटनेनंतर चीनमधून पळते आणि कॅनडात येते. ली मिंगच्या घरी पोचते. तिथून त्या दोघींची दोस्ती होते. दोघी एकमेकांच्या वाड वडिलांबद्दल बोलायला लागतात. तिथून कादंबरी,  कथानक उलगडत जातं. 
कित्येक शतकांचा चीनचा अनुभव  आहे की राज्यकर्ते कहर माजवतात. जनतेला पिळतात. लोकांनी सोसलेला त्रास, छळ    लोकगीतं-लोककथांच्या द्वारे कलाकार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, एका गावातून दुसऱ्या गावात पोचवतात. राज्यकर्त्यांचा राग आणि वरवंटा टाळण्यासाठी त्यांना कथा-कादंबरीचं रूप  दिलं जातं. या कथा म्हणजे एका वेगळ्या रुपात लिहिलेला इतिहास असतो. हा इतिहास सरकारच्या नजरेस येणार नाही अशा रीतीनं लिहिला जातो, त्याच्या नकला हातानं लिहून काढल्या जातात, या नकला गुपचुप हातोहात या गावातून त्या गावात जातात. घरांमधे त्या लपवल्या जातात, खड्डे खणून पुरल्या जातात. मेडलिन थियेन यांनी ती शैली वापरून १९५० ते १९९० पर्यंतचा चाळीस वर्षाचा काळ या कादंबरीत चितारला आहे. 
आई मिंगची आज्जी शांघायमधून आपल्या बिंगपाई या गावात पोचते  तेव्हां तिला गावाचा सत्यानाश झालेला दिसतो. तिथं घर उध्वस्थ झालेलं असतं. घरातल्या वस्तू नाहिशा झालेल्या असतात, घराचे दरवाजे-कमानीही नाहिशा झालेल्या असतात. जनावरांचा पत्ता नसतो. सारा गावच उध्वस्थ झालेला असतो.
आज्जीला बिंगपाई गावात  शिल्लक असलेली मावसबहीण गावात घडलेल्या घटना सांगते. शहरातून आलेले कम्युनिष्ट पार्टीचे नेते शाळेत बैठक भरवतात. गावातल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना गोळा केलं जातं. मुलं, आई बाप, आजी आजोबा अशी सर्व माणसं. नेत्याच्या सांगण्यावरून गोळा झालेले गावकरी शेतकऱ्यांच्या थोबाडात मारतात, त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांनी आपणहून कबूलीजबाब द्यावा यासाठी बळजोरी केली जाते. म्हणा –  मी शोषक आहे, मी समाजाचं नुकसान केलं आहे, मी समाजाला लुटलं आहे, मला शिक्षा झाली पाहिजे. नाही म्हटलं तरी शिक्षा आणि म्हटलं तरीही शिक्षा. कारण ही माणसं गुन्हेगार आहेत असं पक्षानं आधीच ठरवलेलं असतं. 
प्राध्यापक, अर्थशास्त्री, वकील, डॉक्टर, संगितकार इत्यादी लोकांना दूरवर खेड्यात पाठवलं जातं. खेडी अशी की तिथून पळून जाणं शक्य होणार नाही. खड्डे खणा, डुकरं पाळा, शेती करा, खडी फोडा इत्यादी कामं करायला लावली जात. धान्याची पोती जशी इकडून तिकडं हलवतात तसं या माणसांना हलवलं जायचं. अनेकांना कोळशाच्या, लोखंडाच्या खाणीत पाठवलं गेलं. या कामांची सवय नसल्यानं बहुतेक माणसं मेली. सतत स्वतःवर टीका करायची, स्वतःचं आत्मपरिक्षण करायचं,  आपण किती वाईट आहोत ते बोलत रहायचं. त्या बरोबरच सतत माओ आणि कम्युनिष्ट पार्टीचं गुणवर्णन करत रहायचं.
(कोणीही माणूस समोर दिसला की अल्ला हो अकबर अशी घोषणा दहशतवादी करतात. तसंच हे कम्युनिष्ट लोक एकमेकाला भेटले की चेयरमन माओ झिंदाबाद, झाऊ एन लाय झिंदाबाद, लिन बियाओ झिंदाबाद, कम्युनिष्ट क्रांती झिंदाबाद अशा घोषणा देऊन एकमेकांचं स्वागत करायचे, संवाद सुरु करायचे.)
माओनं आधी आर्थिक क्रांती केली. शेतीचा वाट लावली, उद्योगांची वाट  लावली. नंतर सांस्कृतीक क्रांती केली.  संगित, कला, साहित्य इत्यादी गोष्टी नष्ट-विकृत केल्या.
कादंबरीत या घटनांची हाडीमाशी वर्णनं आहेत. 
मेडलीन थियेनचे आई वडील हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि कॅनडात वाढले. ते चीनमधे कधीच गेले नव्हते. आईच्या आग्रहाखातर मेडलीन चीनमधे एक धरण पहायला गेल्या, तिथे त्यांनी चीनच्या इतिहासाचा अभ्यासाला सुरवात केली.मेडलीन कॅनडात जन्मल्या, तिथंच स्थाईक झाल्या आहेत. कादंबरी व्हायला पाच वर्षं लागली. ही त्यांची तिसरी कादंबरी.
कादंबरी दीर्घ आहे. कादंबरीत अनेक उपकथानकं आहेत. कादंबरीत तीन पिढ्या, प्रत्येक पिढीतली सुमारे चार ते पाच माणसं असा माणसांचा पसारा आहे. चार साडेचारशे पानांच्या पसाऱ्यात या माणसांचा माग ठेवतांना तारांबळ उडते. कादंबरीत अनेक गीतं, कविता आहेत. त्यात निसर्ग आणि जीवनविषयक विचार आहेत. कादंबरीतली मुख्य पात्रं सांगितीक असल्यानं संगीत हा कादंबरीतला एक महत्वाचा धागा आहे. बाख, बीथोवन, मोझार्ट  यांच्या संगित रचनांचे उल्लेख कादंबरीत येतात. संगिताचं अंग असणाऱ्या वाचकांना ही कादंबरी एक वेगळा आनंद देईल.
कम्युनिष्ट राजवटीत संगीत ही एक मोठ्ठी गोची असते. स्टालिन असो की माओ, त्यांना संगिताची भीती वाटत असावी. संगीत माणसाला विचारांपासून, तर्कापासून दूर नेतं असं त्यांना वाटत असावं. त्यामुळं दोघेही अभिजात संगित दडपण्याचा प्रयत्न करत, संगीताची व्याख्या नव्यानं करून संगीत कम्यूनिझममधे घुसवण्याचा प्रयत्न करत. पुरोगामी संगित, क्रांतीकारी संगित, समाजवादी संगित, प्रतिगामी संगिताची वर्गवारी माओनं केली होती. माओच्या मते मोझार्ट, बीथोवन यांचं संगीत समाजवादविरोधी होतं.  
प्रतिगामी संगित वाजवणारे शांघायमधले संगिताचे जलसे, संगित घरं बंद करण्यात आली. पियानो, व्हायोलिन इत्यादी वाद्यं जाळून टाकण्यात आली. कारण अभिजात संगित कम्युनिझममधे बसत नव्हतं. लोकांनी व्हायोलिन खड्यात लपवून ठेवली.
या कादंबरीमधे चिनी भाषेची ओझरती ओळख होते. इतर भाषांप्रमाणं मुळाक्षरं, मुळाक्षरांचा शब्द आणि अनेक शब्दांची गुंफण करून कथन अशी चिनी भाषेची रचना नाही. अनेक रेषा, त्या रेषांची जाडी आणि लांबी, रेषांना जोडलेल्या रेषा, रेषांची वळणं अशा नाना रचना वापरून एक अक्षरचित्र तयार होतं. 
प्रत्येक अक्षरचित्र हे एक मूळ चिन्ह (radical) असतं. अनेक चिन्ह एकाखालोखाल लिहिल्यानंतर त्यांचा एक अर्थ निघतो. 
एक अक्षरचित्र असतं ‘दार’. दुसरं अक्षरचित्र असतं माणसाचं तोंड म्हणजे माणूस. तिसरं अक्षरचित्र असतं कुत्रा. दार या  चित्राच्या आतमधे तोंड आणि कुत्रा ही  चित्रं गुंफली की घरात शांतता आहे असा शब्द तयार होतो. यात गंमत अशी की कुत्रा हे चित्र कोणीही चार पायाचा प्राणी असाही अर्थ संदर्भानुसार घेतला जातो.
दार या अक्षरचित्रात सूर्यप्रकाश हे अक्षरचित्र गुंफलं की दारातून सूर्यप्रकाश येतो असा अर्थ घेतला जातो. 
एक झाड म्हणजे झाड. दोन झाडं म्हणजे विरळ जंगल आणि तीन झाडं म्हणजे दाट जंगल.
एक स्त्री म्हणजे स्त्रीचं चित्र. दोन स्त्रियांची चित्रं एकत्र केली गोंगाट असा अर्थ घेतला जातो. (असं चिनी लोकांचं म्हणणं आहे!)
आय मिंग प्रवासात असेल, घरी पोचली नसेल तर पूर्ण वाढ न झालेलं झाड असं अक्षरचित्र वापरलं जातं. 
बिग मदर एका गावातल्या स्त्रीला विचारते- पूर्वी या गावात राहिलेल्या लोकांना मला भेटायचंय, ती कुठं सापडतील.
चिनी भाषेत तिनं जे शब्द उच्चारले त्याचे दोन अर्थ होते, प्रवास झालाय, ठार मारले गेलेत. दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे होते पण त्यांची चित्राक्षरं वेगळी होती.
संदर्भानुसार अर्थ घ्यायचा. माणसं निघून गेलीत किंवा माणसं ठार झाल्यानं इथं हजर नाहीत.
कादंबरीत काही ठिकाणी चिनी चित्राक्षरं काढून संभाषणं दिली आहेत. त्यांतून चिनी भाषेबद्दल उत्सुकता वाढते. चिनी समाज, चिनी माणूस आणि चिनी भाषा यांच्यात एक समान धागा दिसतो. गूढतेचा. चिनी माणसाचं बोलणं आणि लिहिणं समजून घेणं हे काम कठीण. चिनी राजकारण, चिनी माणसांचं त्यांच्या देशातलं आणि जगातलं वागणं,   साराच कठीण मामला.
जवळ जवळ दुसऱ्या महायुद्धापर्यंत चिनी भाषा आणि चीनचं जगापासून तुटलेपण यामुळं जगाला चीनबद्दल फार कमी माहिती होती. माहितीच्या अभावी चीन म्हणजे एक चमत्कारिक रहस्य आहे असं लोकांना वाटे. पर्ल बक यांच्या दी गुड अर्थ या कादंबरीनं चीनच्या खिडक्या उघडल्या.  तरीही चीनभोवती एक बांबूचा पडदा होताच. चीनमधे भीषण दुष्काळ झाले, जगाला त्या बद्दल काही कळलं नाही. माओनं चीनमधे कम्युनिष्ट राजवट आणली, सांस्कृतीक आणि आर्थिक उलथापालथ केली. त्यात साडेतीन ते चार कोटी माणसं मारली गेली. जगाला ते कळलं नाही. माओच्या मृत्यूनंतर डेंग यांच्या राजवटीत चीन आणि जग यांच्यात व्यापारी-शैक्षणिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर चीनबद्दल जगाला माहिती होऊ लागली, चीनवर संशोधनपर पुस्तकं लिहिली गेली.
युंग चान यांनी १९९१ मधे वाईल्ड स्वान्स या पुस्तकात स्वतःचा, आईचा आणि आजीचा इतिहास लिहिला. चीनचं एक भीषण चित्र त्यातून उभ रहातं. विशेषतः चीनमधे स्त्रीला काय स्थान आहे ते या पुस्तकातून कळतं. स्त्रीची पावलं छोटी असणं हे सौंदर्याचं लक्षण चिनी समाजानं ठरवलं होतं. पावलं छोटी राहावीत यासाठी वर्षानुवर्ष ती घट्ट बांधून ठेवली जात. त्यामुळं पावलं सुजत, सडत, पू होत असे, दुर्गंधी येत असे. स्त्रीला ते सारं जन्मभर सहन करावं लागे. माओच्या क्रांतीच्या काळात क्रांतीकारक पुरुष पुढारी जीपमधून हिंडे आणि त्याची पत्नी जीपच्या पाठी पायी पायी प्रवास करत असे. निसर्गानं दिलेलं सारं स्त्रीनं सहन केलं पाहिजे असं माओ म्हणत असे.  बाळंतपणासाठी इस्पितळात जायलाही माओची मनाई असे. स्त्रिया उन्हातान्हात, रस्त्यावर, शेतात बाळंत होतं, त्यांचे गर्भपात होत. युंग चानचं पुस्तक अंगावर काटा उभा करतं. या पुस्तकाची ३७ भाषांत भाषांतरं झाली होती.
 १९५८ चा दुष्काळ  या विषयावर आता खूप पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत.
 एका अभ्यासकानं दुष्काळात चीनमधल्या पोष्टांत पडून राहिलेली पत्रं गोळा केली. हज्जारो पत्रं. ती एकत्र करून एक पुस्तक लिहिलं. पत्रं पडून होती कारण पत्रं न्यायला पोष्टमन शिल्लक नव्हते. दुसरं म्हणजे माओच्या सरकारनं लोकांना आपसात संपर्क करायला मनाई केली होती. आपण आणि क्रांती बदनाम होईल अशी भीती माओला वाटत होती.
  म्हातारी माणसं पत्रांतून आपल्या दुरवरच्या नातेवाईकांकडं मदत मागत होती. “अन्न पाठवा, पाणी पाठवा, आम्हाला इथून घेऊन जा.” गावातली तरूण माणसं गाव सोडून निघून गेली होती. ” अन्नाचा कणही गावात शिल्लक नाही. कोणतीही हालचाल करणारी गोष्ट म्हणजे प्राणी माणसांनी खाल्लेत. गाई गुरं खाऊन झाली, कुत्रे खाऊन झाले, किडे खाऊन झाले, पक्षी खाऊन झाले. पानं खाऊन झाली. गाव उजाड झालंय. आम्हाला इथून न्या ” असा मजकूर पत्रांत असे.
गावठी पद्धतीनं पोलाद तयार करून औद्योगीकरण करायच्या धोरणापायी घरातली धातूची भांडी वितळवली गेली. भट्टी तयार करण्यासाठी घरातलं फर्निचर, दरवाजाच्या चौकटी, झाडं, लाकूडफाटा सारं सारं जाळून फस्त करण्यात आलं. पोलाद तर झालं नाहीच पण दुष्काळ पडला. 
कादंबरीचा विषय भेदक असला तरी लेखिकेनं कादंबरी प्रक्षोभक केलेली नाही.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *