फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

  पेरू या दक्षिण अमेरिकेतील देशात  पिरहा (Piraha) या १० ते१५ हजार वर्षांपासून रहाणाऱ्या आदिवासी जमातीची आता जेमतेम ३२० माणसं शिल्लक आहेत. Maici या अॅमेझॉनच्या उपनदीच्या काठावरच्या एका जंगलात ते रहातात. ही जमात टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभ्यासकांना पिरहांच्या भाषेचा अभ्यास करतांना भाषा शास्त्रातल्या प्रचलित सिद्धांताला धक्का देणाऱ्या गोष्टी आढळल्या. सापडलेल्या वास्तवामुळं भाषा शास्त्रात एक नवीच खळबळ उडाली.
पिरहा भाषेत संख्या नाही. म्हणजे एक, दोन, पन्नास असे आकडे, मोजदाद नाही. 
पिरहा भाषा केवळ आठ व्यंजनं आणि तीन स्वर आहेत. इतक्या मोजक्या साधनांनिशी बोलत असल्यानं केवळ आवाजातले चढ उतार आणि स्वराची तीव्रता यात बदल करून ते वेगवेगळ्या अर्थांचे शब्द तयार करतात. शब्दातलं शेवटचं अक्षर किती लांबवलं यावरून त्याचा अर्थ बदलतो. मित्र असा शब्द असेल आणि त्याचं शेवटलं अक्षरं लांबवलं की त्याचा अर्थ शत्रू असा होतो. 
पिरहा भाषेतली वाक्यरचना सरळ असते, एकात एक गुंतवलेलं वाक्य त्या भाषेत नाही. म्हातारा आणि काठी. ” घरून निघालेला एक म्हातारा हातात काठी घेऊन बाजारात जात आहे ” असं वाक्य पिरहा वापरत नाहीत. मोजकी नामं. नामांना  जोडण्यासाठी अव्ययं नसल्यानं पिरहा तुटक तुटक बोलतो. त्यांचं बोलणं फक्त त्यांनाच समजतं. बरेच वेळा ते  शीळ वाजवतात, गाण्यासारखं गुणगुणतात, तेच त्यांचं बोलणं. बहुतांश खेळ शब्दांचा नव्हे, स्वरांचा, सुरांचा.
पिरहा भाषेत रंगाला शब्द नाही. लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा अशा संज्ञा वापरून ते रंगाचं वर्णन करू शकत नाहीत. त्यांच्या लेखी रक्त म्हणजे लाल. एक फळ दाखवून त्याला ते नारंगी म्हणतात.
भाषेबाबत नोएम चॉम्स्की यांचा सिद्धांत प्रमाण मानला जातो.  भाषेचं व्याकरण माणसात जन्मजात असतं असा तो सिद्दांत. मूल जन्मतं.  कुठल्याही भूभागात. कुठल्याही संस्कृतीत. कुठल्याही धर्मात. ते व्याकरण घेऊनच जन्माला येतं. त्याला व्याकरण शिकवावं लागत नाही. 
चॉम्स्कींच्या म्हणण्याचा अर्थ असा की सभोवतालातून माणूस व्याकरण शिकत नाही, ते त्याला जन्मजात मिळतं. परिसर, सहवास याचा व्याकरणाशी संबंध नाही असा त्यांच्या सिद्धांताचा अर्थ.
पिरहांच्या बाबतीत प्रश्न असा पडला की त्यांच्या भाषेचं व्याकरण कां तयार झालं नाही, जगभरच्या इतर भाषांसारखी शब्द आणि व्याक्य निर्मिती त्या भाषेत कां निर्माण झाली नाही. चॉम्सकी यांच्या सिद्धांतानुसार त्यांच्याकडं जन्मजात व्याकरण असायला हवं होतं.
पिरहा जमातीचं जगणं आणि भाषा यातल्या संबंघांचं आता पाहू.
पिरहा १०- १५ हजार वर्षं प्राचीन असले, चौदाव्या शतकापासून अॅमेझॉनमधली संस्कृती बदलत गेली तरी त्या संस्कृतीचा परिणाम पिरहांवर झाला नाही. पिरहा भाषेमधे अव्ययं नाही, संख्या नाही, गुंत्याची वाक्यरचना नाही, नेमकेपणानं एकादा भाव वा ज्ञान व्यक्त करणारे शब्द नाहीत याचं कारण पिरहा माणसांनी सभोवतालच्या समाजात मिसळायला नकार दिला. पिरहांनी बाहेरचं जग नाकारलं.
अॅमेझॉनच्या खोऱ्यात पोर्तुगीझ वसाहतवादी शिरले तेव्हां १७०० सालाच्या सुमारास त्यांना पिरहा जमात दिसली. पोर्तुगिझांना शेती करायची होती, उद्योग उभारायचे होते. त्यासाठी नदीकाठचे भूभाग त्यानी हस्तगत केले. तिथल्या पिरहांचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आला. जगात सर्वत्र घडलं तेच अॅमेझॉन खोऱ्यात घडलं. ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणी स्थानिक आदिवासींना हाकलून देण्यात आलं आणि ज्यांनी जायला नकार दिला त्यांना मारून टाकलं. पिरहा नदीच्या काठावून दाट जंगलात गेले. 
पेरू, ब्राझील या देशांत आधुनिक कसोट्यांवर विकास होत गेला. जंगलं तुटली, शहरं वसली, उद्योग उभे राहिले.काही हजारांची संख्या असलेली  पिरहा माणसं  जंगलातून हे सारं पहात होतं. कधी कधी जंगलाच्या काठावर येऊन बाहेरच्या जगात काय चाललंय ते पहात होती.
पिरहांना शेती करता येत नाही. ते बाण आणि दगडफेक करून मासे मारतात, प्राणी आणि पक्षी मारतात. कंदमुळं खातात. वनस्पती किकंदमुळं किंवा प्राणी शिजवणं, सुकवणं, अन्नाची साठवण करणं या भानगडीत पिरहा पडत नाहीत. भूक लागली की प्राणी खाऊन फस्त करायचे. भूक भागली नाही तर आणखी प्राणी मारायचे. भूक भागली की पुरे. आणखी प्राणी मारायचा नाही, कठीण काळासाठी प्राणी शिजवून-मसाले लावून साठवायचा नाही. 
वीस तीस हजार वर्षांपूर्वीचे व्यवहार पिरहांनी जपले. ते चित्रं काढत नाहीत. ते कपडे वापरत नाहीत. (आत्ता आत्ता ते बाहेरून आलेले टी शर्ट वापरतात. आता आता ते केळीचं झाड लावून केळी खायला शिकले आहेत.). ते दागिने तयार करत नाहीत. बिया आणि प्राण्यांचे दात यांच्या माळा करून ते वापरतात. अलंकरण त्यांना माहित नाही. त्यांच्याच  नृत्य नाही. ते चेहरे रंगवत नाहीत. 
 वस्तू मर्यादित,  व्यवहार मर्यादित, प्रक्रिया मर्यादित. त्यामुळं त्यांचं वर्णन करणारे शब्द मर्यादित. व्यवहारांत सरळपणा असल्यानं काँप्लेक्स वाक्य करायचीही आवश्यकता नाही. 
सोळाव्या शतकापासून सभोवताली एक वेगळं जगणं दिसू लागलं. पिरहा माणसं त्या जगण्यापासून दूर पळून गेली, ते जगणं स्विकारलं नाही, त्या जगण्यातल्या हव्यानकोचा विचार केला नाही. अधिकाधीक खोलवर जंगलात जात राहिली. या त्यांच्या व्यवहाराचा परिणाम म्हणून माणसं कमी जगत, लोकसंख्या कमी झाली, जमात नाहिशी होण्याच्या उंबरठ्यावर पोचली.
परसराशी संपर्क नसल्यानं व्याकरण तयार झाल नाही हा अभ्यासकांचा निष्कर्ष तयार झाल्यावर भाषाशास्त्रात खळबळ उडणं साहजिक होतं. स्टीवन पिंकर या भाषाशास्त्रज्ञानं हा अभ्यास प्रसिद्ध झाल्यावर म्हटलं की अभ्यासकांनी एक बाँब गोळाच टाकलाय.
परिसर आणि भाषा या दोन गोष्टींचा संबंध जेनेटिक्स विज्ञानातल्या सिद्दांतांना समांतर मानायला हवा. जेनेटिक्सची सुरवातीची माहिती अशी होती – जीव-वनस्पतीच्या मुळात गुणसूत्र असतात, जीन्स असतात. ही जीन्स जीव-वनस्पतीचं जगणं ठरवतात. ही गुणसूत्रं त्यांना आईवडिलांकडून मिळतात. कालांतरानं अभ्यास पुढं सरकल्यावर असं कळलं की माणूस काय खातो, कसा वागतो, कसा वावरतो, त्याच्या परिसरात कोणती रसायनं असतात यावरही गुणसूत्रांचं घडणं अवलंबून असतं. सौंदर्य प्रसाधनातली रसायनं हार्मोन्ससारखी वागत असल्यानं जास्त प्रसाधनं वापणाऱ्या माणसांची गुणसूत्रं बदलतात. भरमसाठ कॅलरीज खाणाऱ्या माणसांचीही गुणसूत्र बदलतात हे अभ्यासांनी सिद्ध केलं. 
तसंच भाषेच्या बाबतीत घडत असावं असा पिरहा भाषेचा अभ्यास सुचवतो. ज्या समाजात खूप आणि काँप्लेक्स घटना घडतात त्या भागातल्या लोकांचं व्याकरण अधिक संस्कारित, अर्थवाही, काँप्लेक्स असतं, भाषा अधिक काँप्लेक्स असते. सिंधू, गंगा, तैग्रिस युफ्राटिस, नाईल खोऱ्यातील समाजात, रोम आणि लंडनभोवतालच्या समाजात व्याकरण विकसित झालं. अॅमेझॉनच्या खोऱ्यात पिरहांच्या बाबतीत ते घडलं नाही.
 पिरहांना जन्मतः व्याकरण नव्हतं, ते त्यांनी बाहेरच्या जगातून शिकायलाही नकार दिला.
आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झालीय. 
पिरहांचं काय करायचं? 
ते आहेत तसंच त्यांना टिकवून ठेवायचं? 
त्यांना समाजाच्या आधुनिक प्रवाहात आणायचं? 
समजा त्यांना आहेत तसंच राहू द्यायचं असेल तरीही अभ्यासासाठी त्यांच्याशी संपर्क करावाच लागेल आणि संपर्क केला रे केला की त्यांचं आदिम जीवन बदलेलच. अलिकडं ते केळी खायला शिकले आहेत. परंतू केळ्याची लागवड त्याना माहित नाही. ते शिकवलं म्हणजेच शेती शिकवली की मुळातले पिरहा शिल्लक रहाणार नाहीत.
काय करायचं? 
पिरहांच्या भाषेचा अभ्यास करताना मानवी समाजाच्या विकासाची प्रक्रिया समजली. हा एक मोठाच फायदा झाला. भाषेमधे,व्याकरणामधे दडलेली सत्यं बाहेर येऊन मानवी ज्ञान समृद्ध झालं. पण त्यातून नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समाजांना आहेत तसंच मरू द्यायचं की त्यांना आधुनिक करायचं.

आज काही माणसं म्हणतात की आदिवासींचं जीवन निसर्गाशी एकरूप झाल्यानं उत्तम होतं. आदिवासी जीवन आदर्श आहे असा या लोकांच्या म्हणण्याचा सूर असतो. आधुनिकता पर्यावरणाचा नाश करत असल्यानं आदिवासी भागात आधुनिक विकास होऊ नये असंही त्यांचं म्हणणं असतं. काही माणसं म्हणतात की त्यांना आधुनिक करावं पण सावकाशीनं. 
आधुनिकता म्हणजे काय यावरही अनेकांच्या विचारांत गोंधळ आहेत.
अशा परिस्थितीत पेरू आणि ब्राझिल या देशातल्या सरकारांनी विशेष विभाग तयार करून पिरहा इत्यादी आदिवासींना शेती शिकवणं, उद्योगात रोजगार देणं असे प्रयत्न सुरु केले आहेत. एकेकाळी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी तसे प्रयत्न केले होते. आदिवासी हे ख्रिस्ती नसल्यानं त्यांना मुक्ती मिळत नाही असं परस्पर ठरवून मिशनऱ्यांनी त्यांना ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. चारेकशे वर्षं. पिरहांनी तो प्रयत्नही धुडकावून लावला.आता अद्यात्मिक मिशनऱ्यांची जागा आर्थिक मिशनऱ्यांनी घेतली आहे. त्यांना जमीन हवीय, जंगलं हवीयत, पाणी हवंय. त्यासाठीच पिरहा सारख्या जमातींची व्यवस्था लावायची त्यांची इच्छा आहे.
काळाला एकच दिशा आहे. काळ पुढं सरकत असतो, मागं वळत नसतो. माणसाचं मन मात्र  मागल्या काळात रमतं. तो काळ त्याला खुणावतो. कला, ज्ञान, इतिहास इत्यादी साधनांचा वापर करून माणूस मागल्या काळात रमतो. पण प्रत्यक्ष जगतांना पुढंच जातो. 
पिरहांनी पुढं जाणं नाकारलं. ते त्यांना जमलं.त्याची किमतही त्यानी मोजली.
आता पहायचं काय होतंय ते.
( डॅन एव्हरेट हे भाषज्ञ गेली तीसेक वर्षं पिरहा भाषेचा अभ्यास करत आहेत. बराच काळ ते पिरहांच्या काठावर वास्तव्य करतात. भाषाशास्त्र आणि आदिवासींचं जीवन या विषयावर उडालेली खळबळ त्यांच्याच अभ्यासामुळं निर्माण झालीय. )

।।



One thought on “फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

  1. Dear Sir,
    As usual a great which keeps you thinking for days together..
    Also read your books "Avghad Afghanistan" and "Istambul te Cairo".
    Wrote an email to you after reading books but didn't receive a reply.
    I hope it reached you.
    Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *