आयसिस उत्तरार्ध

आयसिस उत्तरार्ध

 १९२६ साली केमाल पाशानं ऑटोमन खिलाफत बरखास्त केली. त्यानं अधिकृतरित्या राज्य – स्टेट- शरियापासून आणि कुराणापासून मुक्त केलं. अल बगदादी आणि आयसिसला पुन्हा एकदा खिलाफत म्हणजे सर्वंकष धर्मराज्य प्रस्थापित करायचं आहे. आधुनिकता आणि आधुनिक समाज न समजलेल्या इस्लामी लोकांना खिलाफत या कल्पनेचं फार आकर्षण आहे. 
इस्लामचं राज्य असलेल्या पाकिस्तान किवा सौदी अरेबियात इस्लामी माणसं सुखी नाहीत. इस्लामी राज्य नसलेले अमेरिका, युरोप, भारत इत्यादी देशात मुसलमान सुखानं जगत आहेत.
असं असूनही  काही मुसलमानांना वाटतं की त्यांची काल्पनिक दुःखं   खिलाफत स्थापन झाल्यावर लाभणार आहे. त्याना अल बगदादीचं आयसिस  त्यांच्या स्वप्नातलं काल्पनिक खिलाफत देणार आहे असं वाटतंय.
।।
आयसिस म्हणजे इस्लामी स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
आयसिसचं एक स्टेट म्हणजे राज्य तयार झालं आहे. खलिफा म्हणजे अल बगदादी राज्यप्रमुख आहे. त्याचे दोन उपप्रमुख आहेत. उपखालिफा. एक धार्मिक खातं संभाळतो, दुसरा सेक्युलर. त्या खाली मंत्रीमंडळ आहे. मंत्रीमंडळातले लोक विविध खात्यांचे प्रमुख आहेत. राज्यात विविध विभाग, शहरं आहेत. प्रत्येक शहरात शिक्षण, आर्थिक, लष्करी, धार्मिक इत्यादी खाती आहेत. प्रत्येक खात्यात काम करणारे कर्मचारी असतात, कमांडर्स असतात. त्यांना वरून आज्ञा येतात,  आज्ञा पालन केल्यानंतर ते  आपल्या कामाचा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवतात. राज्यामधे धार्मिक आज्ञेचं पालन केलं नाही तर हुदूद कायद्यानुसार शिक्षा केल्या जातात. म्हणजे डोकं उडवणं, हात किंवा पाय कापणे, फटके देणे इत्यादी. इतर कायदे मोडले तर तझीर कायद्यानुसार शिक्षा केल्या जातात. कायदा म्हणजे शरिया. शरियाची काटेकर अमलबजावणी करण्यासाठी शरिया पोलिस असतात आणि शरिया कोर्टं असतात.
शिक्षेच्या घटना चित्रीत केल्या जातात, वेब साईटवर टाकल्या जातात, ऑडियो टेप्स आणि पुस्तिकांच्या रुपात वितरित केल्या जातात.
शिक्षा अशा. सुळावर चढवणं. डोकं उडवणं. बलात्कार करणारे,  बलात्काराचे बळी यांची हृदयं शरीरातून बाहेर काढून छातीवर लटकवणं. समूह हत्या. म्हणजे लोकांना ओळीनं उभं करून मारणं. समलिंगी गुन्हेगारांना उंच इमारतींच्या छतावरून ढकलणं. 
उडवलेली मुंडकी रांगेनं एका लाकडी ओंडक्यावर लावली जातात, त्यांचं प्रदर्शन भरवलं जातं. उडवलेली मुंडकी लाकडाच्या तुकड्यावर रोवून नाचवली जातात, मिरवणुक काढली जाते. मुंडक्यांच्या माळा इत्यादी गोष्टी मुद्दाम मुलांना दाखवल्या जातात. मुंडकी उडवतांना मुलांना हजर ठेवलं जातं, त्यांना जिहादी करण्यासाठी. 
अल कायदाच्या अबु बकर नाजी या तत्वज्ञानं  वरील शिक्षा पद्धतींचं एक मॅन्युअल तयार करून प्रसिद्ध केलं आहे. त्यात शिक्षा पद्धत, शिक्षांचं तात्विक समर्थन इत्यादी गोष्टी दिल्या आहे. या साऱ्या शिक्षा इस्लामला धरून आहेत हे तकी अल दिन इब्न तमिय्या या तेराव्या शतकातल्या इस्लामी विचारवंताचा हवाला देऊन सांगितलं आहे. या मॅन्युअलमधे पहिला खलिफा अबु बकर यानं आपल्या खिलाफतीच्या दोन वर्षाच्या काळात इस्लाम सोडून गेलेल्या लोकांना केलेल्या शिक्षांचे तपशील दिले आहेत.
।।
आयसिसची राजधानी.राक्का. 
सीरिया. इराकच्या हद्दीजवळ.  
आयसिसचा कारभार राक्कामधून चालतो. अल बगदादी इथंच मुक्काम करून असतो असं म्हणतात. म्हणूनच या शहरावर अमेरिकेनं खूप हल्ले केले. अनेक वेळा बगदादी जखमी झाला, बगदादी मेला अशा बातम्या आल्या. बगदादी कदाचित जखमी झाला असेल पण मेल्यासारखा वाटत नाही. राजधानी असल्यानं या शहरात मजबूत लष्करी सिद्धता आहे.
सीरियात बशर असद यांची राजवट आहे. राक्कामधली जनता सामान्यतः असद राजवटीवर खुष असे. कारण इथे बहुसंख्य असलेल्या जमातींना असद राजवटीनं सुखात ठेवलं होतं. यादवी सुरु झाल्यावर २०१३ साली असदविरोधी बंडखोर गटांनी या शहराचा ताबा घेतला. असदविरोध एकसंध नव्हता, त्यात अनेक संघटना होत्या आणि त्या संघटना आपसात सत्तेसाठी भांडत होत्या. प्रत्येक संघटनेला असद सरकार घालवून त्या जागी आपलं एकछत्री राज्य हवं होतं. अहरार अल शाम, जबात अल नुस्र ( अल कायदाची शाखा ), काही छोट्या टोळ्या या  विरोधकांनी  राकात पाय रोवले आणि ते आपसात भांडू लागले. स्थानिक जनता वैतागलेली होती. अशा स्थितीत अल बगदादीच्या आयसिसनं २०१३ च्या ऑगस्टमधे राकात पाऊल ठेवलं. इतर संघटनांची विल्हेवाट लावली आणि एकसंध शासन बसवलं. 
२०१४ च्या जूनमधे अल बगदादीनं तो खलिफा असून त्यानं खिलाफत म्हणजे खलिफाचं इस्लामी राज्य स्थापन झाल्याचं जाहीर केलं. 
राज्य स्थापन झाल्या झाल्या शरिया कायदा लागू करण्यात आला, कायदा मोडणाऱ्याला शरिया कायद्यानुसार शिक्षा होतील असं जाहीर करण्यात आलं. लोकांना जरब बसावी म्हणून सुरवातीलाच मुंडकी उडवून ती बंदुकीच्या टोकावर लावून नाचवण्यात आली. 
राकामधे महापालिका होती. पालिकेतले पूर्वीचे नोकर आयसिसनं जसे होते तसेच टिकवले. त्यांना सांगण्यात आलं की आता ते सीरियन सरकारसाठी नव्हे तर इस्लामी खिलाफतसाठी काम करत आहेत. तेच टेलेफोन व्यवस्थेबाबतही.  शाळा होत्या तशाच ठेवल्या फक्त अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. विज्ञान आणि फ्रेंच हे विषय घालवले, त्या जागी इस्लामी शिक्षण हा विषय सक्तीचा केला. हॉस्पिटलातल्या डॉक्टरना सूचना गेल्या, पुरुषांनी पुरुषांना तपासायचं आणि स्त्री डॉक्टरांनी स्त्रियांनाच तपासायचं. स्त्री पेशंटना पुरुष डॉक्टरांनी  हात लावायचा नाही, पुरुष पेशंटना स्त्री डॉक्टरांनी हात लावायचा नाही.
स्त्रियांचं जग,  बुरखा,चूल,घर आणि नवरा. 
धुम्रपान आणि मद्यपान बंदी. शहरात आयसिसचे पोलिस चाबूक आणि साखळदंड घेऊन हिंडत, कायदा मोडणाऱ्याला जागच्या जागी फटके. 
टी शर्ट घालायला हरकत नाही पण त्यावर चित्र किंवा मजकूर असता कामा नये.
पाच वेळा नमाज. नमाजाच्या वेळी दुकानं, कार्यालयं बंद. नमाजाच्या वेळी कोणी बाहेर हिंडताना दिसला तर फटके.
दुकानदार आपल्या उत्पन्नाच्या २.५ टक्के अधिक ८.३० डॉलर येवढी रक्कम दर महा आयसिसला देतात. हा कर आहे पण आयसिस त्याला जकात असं म्हणतं. जकातचा अर्थ दान, धर्मादाय दान. इस्लाममधे व्याज आणि कर या गोष्टी मान्य नाहीत. माणसानं समाजातल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणून दान, जकात द्यायची असते. इस्लामच्या काळात राज्य, सरकार, आर्थिक विकासासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकी, शाळा, वीज इत्यादी गोष्टी नव्हत्या त्यामुळं सरकारला महसूल गोळा करावा लागत नव्हता. अगदीच प्राथमिकपेक्षाही प्राथमिक अशी अर्थव्यवस्था असल्यानं जकातीवर भागत होतं. 
 टोळी प्रमुख लुटालूट करत असल्यानं लूट हे खरं उत्पन्न होतं. महंमदही लूट करूनच पैसा उभा करत असत. 
प्रत्येक नागरीक महिन्याला सुमारे २ डॉलर टेलेफोन वापरण्यासाठी देतात. टेलेफोन व्यवस्था असद सरकार चालवतं.  पैसे मात्र आयसिस वसूल करतं.
।।
टिक्रीत
२०११-२०१२ चा काळ. इराकमधे यादवी चालली होती. अमेरिकी सैन्याच्या बळावर नुरी अल मलिकीचं इराकी सरकार कार्यरत होतं. इराकी सैन्य बरखास्त झालं होतं. अमरिकेच्या मदतीनं नवी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची खटपट अल मलिकी करत होते. इराकी सरकारात शियांचं वर्चस्व वाढत होतं. अल मलिकी हे इराणचे हस्तक होते. इराकी सैनिक बिनधास्त सुन्नी शहरं, सुन्नी वस्त्यांवर हल्ला करत. सुन्नी माणसं वैतागलेली होती. सरकार होतं, पोलिस होते, सैन्य होतं, कोर्टं होती तरीही इराकमधे अस्थिरता, अशाश्वती, अराजक होतं. या स्पेसमधे आयसिसचा आधीचा अवतार, इस      ( IS ) हातपाय पसरत होता. 
१०१२ सालातला एक दिवस. आदल्याच दिवशी बातमी आली होती की पलिकडचं मोसुल हे इराकमधलं दोन नंबरचं गाव आयसिसनं काबिज केलं आहे. टिक्रीतच्या लोकांचा विश्वासच बसत नव्हता. 
युसुफ याचं आयटीचं दुकान. दुपारी त्याला इस्लामी संघटनेच्या माणसाचा फोन आला. ‘ तुला चांगला धंदा करायचा आहे ना, धंद्यात टिकायचं आहे ना? मग १ लाख  डॉलर पाठवून दे.’ 
युसुफनं विचारलं ‘ तू कोण आहेस, तुझी संघटना कोणती?’ 
पलिकडून आवाज आला ‘ इस्लामी स्टेट. ’
युसुफची चिडचीड झाली. असा अनुभव त्यानं पूर्वी घेतलेला नव्हता. त्यानं नकार दिला. त्याला नंतर कळलं की त्याचा धंदाच नव्हे तर जीवही धोक्यात आहे. त्यानं रदबदली केली. ५० हजार डॉलरवर मांडवळ झाली. त्या माणसानं समारा या गावातल्या एका माणसाला भेटायला सांगितलं. युसुफनं तिथं पैसे पोचवले.
समारा हे अल बगदादीचं गाव.
अशा रीतीनं एकेका माणसाला धरत आयएसनं पैसे गोळा केले. या भानगडीत पोलिस काही करत नाहीत, सरकारी यंत्रणा काही करत नाही हे आयएसनं अनुभवलं. सरकार आयएसला घाबरलं होतं, हातपाय गाळून बसलं होतं. थोडक्यात म्हणजे टिक्रीत हे गाव पोकळ झालं होतं.
२०१४ सालपर्यंत टिक्रीत पिकलेल्या फळासारखं लोंबायला लागलं होतं. जूनमधली गोष्ट. टिक्रीतमधल्या   शाळेत शिकवणारा शिक्षक महमुद, दुपारी दररोजच्या सवयीनुसार जेवायला आणि दुपारची डुलकी घ्यायला घरी गेला. कारनं. जेवण होतं न होतो ते त्याला बगदादमधून फोन आला. ‘ आम्ही ऐकतोय की टिक्रित आयसिसनं काबीज केलंय.’  महमुद म्हणाला ‘ कसं शक्य आहे. आता तर मी आरामात घरी पोचलो. कुठ बंदुकीचा किवा बाँब फेकल्याचा आवाज नाही.’ 
महमुद कारमधे बसून शाळेकडं निघाला.  वाटेत आयसिसच्या गाड्या आरामात फिरताना दिसल्या. त्याला कळलं की फक्त सात गाड्यातल्या तीस आयसिसच्या जिहादींनी टिक्रीत शहर काबीज केलंय. आरामात. सरकारच्या एकाही माणसं किंचतसाही विरोध केला नाही. इराकी सैन्य निव्वळ वितळून गेलं होतं.
 टिक्रीत गावात एका छावणीत इराकी पोलिस आणि सुरक्षा सैनिक होते. त्यांची संख्या ३ हजार होती.   ३ हजार सैनिक  चणे खात होते आणि ३० लोकांनी शहर ताब्यात घेतलं. 
काही वेळानं अबु अजिल या जमातीतले लढवय्ये टँक्स आणि जीप्समधून टिक्रीतमधे पोचले. अबु अजिल ही जमात आयसिसमधे सामिल होती. त्यानी सरकारी सुरक्षा छावणी ताब्यात घेतली. तिथल्या सैनिकांचे वीस वीस लोकांचे गट करून छावणीबाहेर नेले आणि त्यांना गोळया झाडून घाऊक पद्धतीनं  मारलं. 
छावणी गावाबाहेर होती. छावणी लगतचे नागरीक, छावणीपासून अंतरावर असलेल्या उंचवट्यावर रहाणारे नागरीक यांनी शिरकाण पाहिलं. सैनिकांची प्रेतं गोळा करून आयसिसचे लोक शहरात फेकत होते. शेजारच्याच वस्तीत रहाणाऱ्या झैनबच्या कानावर गोळीबाराचे आवाज येत होते. तिच्या कानात ते इतके बसले की अजूनपर्यंत तिला तेच आवाज ऐकायला येतात.
आयसिसनं जाहीर केलं की आता इराकी सरकार संपलं आहे, आयसिसची खिलाफत सुरु झाली आहे. सरकारनं विविध कमिट्या तयार केल्या. शिक्षण, कारभार, न्याय इत्यादी. एक झाली रियल एस्टेट कमिटी. तिनं गावभर फिरून सरकारी इमारती, पोस्ट ऑफिसं, बँका, टाऊन हॉल इत्यादींची पहाणी करून त्या इमारती ताब्यात घेतल्या, तिथं आपल्या कचेऱ्या स्थापल्या. 
एका कमिटीचं नाव पश्चात्ताप कमिटी. इराकच्या सरकारात विविध पदांवर कामं केलेल्या लोकांना त्यांनी केलेल्या कामावर पश्चात्ताप प्रकट करायला सांगण्यात आलं. ज्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला नाही, चालढकल केली त्याना तिथल्या तिथं गोळी घालून मारण्यात आलं. हा इवेंट जाहीरपणे घडला. त्यामुळं नंतर नंतर माणसं थरथरतच येत आणि पश्चात्ताप व्यक्त करत. मग कोणाला दंड भरावा लागे, कोणाला सांगितलेलं काम करावं लागे.
शहरात शरिया कायदा लागू झाला. विद्यापीठातले कायदा, इतिहास आणि जीवशास्त्र हे विभाग बंद करण्यात आले. कला हाही विषय बंद. चित्रं आणि संगित बंद. इराकी झेंडे उतरवण्यात आले, त्या जागी आयसिसचे काळे झेंडे लावण्यात आले. मशिदीतल्या जुन्या इमामांना हाकलण्यात आलं, आयसिसचे नवे इमाम नेमले गेले. स्त्रियांना घराबाहेर पडायला बंदी. बाहेर पडायचं तर डोक्यावर दुपदरी बुरखा हवा आणि सोबत एक पुरुष हवा. बाप किंवा भाऊ किंवा नवरा किंवा मुलगा. इतर कोणी सापडला तर दोघंही जागच्या जागी खलास. संस्कृती-धर्म पोलिसांच्या टोळ्या गावात फिरू लागल्या. स्त्रियाही पोलीस होत्या. धर्म आणि संस्कृतीचं पालन. बुरखा न घेतलेली स्त्री, दाढी न वाढवलेला पुरुष, जीन्स घातलेला माणूस, तोंडाला दारूचा वास. ताबडतोड बाजारात लोकांसमोर शिक्षा. लोकांना लाऊड स्पिकरवरून दवंडी देऊन गोळा केले जात असे आणि त्यांच्यासमोर शिक्षा.  गोळा केलेल्या लोकांच्या लहान मुलं जास्त. त्यांना धाक निर्माण व्हावा,  लहानपणीच त्यांनी जिहादी व्हावं या साठी.
 शिक्षा म्हणजे सामुहिक घाऊक गोळीबार, डोकं उडवणं इत्यादी.
बासिल रमादान. इराकी सैन्यात होता. त्याची चारही मुलं सैनिक होती. आयसिसनं हुकूम दिल्या प्रमाणं त्या सर्वांनी आपल्याजवळच्या बंदुका आयसिसला दिल्या. मग आयसिसनं इराकी सैन्यात नोकरी केल्याच्या गुन्ह्यापोटी प्रत्येकाला  २५०० डॉलर मागितले. सर्वानी दिले. तरीही आयसिसचा संशय शिल्लक होता. त्यांनी एकेका मुलाला चौकीत नेलं आणि ठार मारलं.
 आता एकटा बासिल उरला होता. आपली धडगत नाही हे तो कळून चुकला. त्यानं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा केलं. नाईलाजानं आपण इराक सोडून जाणार आहोत असं सांगितलं. बंदुक घेऊन बाहेर पडला. जवळच्या आयसिसच्या केंद्रात गेला. समोर दिसले तेवढे आयसिसचे जिहादी त्यानं मारून टाकले.   गोळ्या संपल्या. मग आयसिसच्या जिहादीनं त्याला गोळ्या घालून मारलं.
टिक्रीत हे मुळातलं शांत शहर. दोनेक लाख लोकवस्ती. शिया आणि सुन्नी सुखानं एकत्र नांदत होते. टेन्शन नाही. गुन्हेगारीचा मागमूस गावात नव्हता. लोक मस्तपैकी वाईन, व्हिस्की वगैरे पीत असत, इस्लाम काहीही म्हणो. आयसिसनं वर्चस्व स्थापन केल्यावर लोकांनी आपापल्या घरातले वाईनचे आणि व्हिस्कीचे क्रेट्स गावाबाहेर नेऊन फेकून दिले. 
अदेल नावाचा एक तरूण. वांड होता. तो आयसिसच्या दादागिरीकडं दुर्लक्ष करे. समोरच्या मशिदीमधे चाललेली व्याख्यानं तो आपल्या बाल्कनीत व्हिस्कीचे घोट घेत ऐकत असे. त्याचा शेजारी अली वाईनच्या बाटल्या फेकून देतोय हे पाहिल्यावर त्याला काळाचं वळण समजलं. इथं रहाण्यात अर्थ नाही असं म्हणून त्यानं गाव सोडायचं ठरवलं, दारुच्या बाटल्या जमिनीत पुरून तो गावाबाहेर पडला. थोडं अंतर  गेल्यावर त्याला आठवलं की दोन व्हिस्कीच्या बाटल्या टेबलावर शिल्लक होत्या. टरकला. आपलं खरं नाही असं कळल्यावर त्यानं अलीला फोन केला आणि सांगितलं की काहीही करून ताबडतोब त्या बाटल्या फोडून टाक. 
अलीला निरोप दिल्यावर अदेल आणखी वेगानं पळाला, जेणेकरून  आयसिसची माणसं त्याच्या पर्यंत पोचू नयेत.
 शहराची पार धूळधाण उडाली. ज्यांना शक्य होतं ती माणसं परागंदा झाली. ज्यांना अगदीच शक्य नव्हतं तेवढी टिकली. काही हजार माणसं. 
 एके दिवशी अमेरिकेच्या आणि इराणच्या मदतीनं इराकी सैन्यानं टिक्रीतवर हल्ला केला. जिहादी मारले. टिक्रीत पडलं. शहरात नवी व्यवस्था उभी करणं इराकी सरकारला जमलं नाही. गुंडांनी गावाचा ताबा घेतला. आयसिसच्या गुंडांच्या जागी नवे गुंड आले. 
 आपण कधी तरी आपल्या घरात परत येऊ असं वाटणारे टिक्रिती लोक गावात यायला तयार नाहीत. ते आता कायमचे परागंदा आहेत.
।।
आयसिसची अर्थव्यवस्था.
परदेशातून उघड किवा छुपेपणानं माणसं आयसिसला पैसे पाठतात.   आयसिस शियांच्या विरोधात लढत असल्यानं, आयसिस ही सुन्नी संघटना असल्यानं,   सौदी, कतार इत्यादी सुन्नी  देश आयसिसला पैसे देतात. 
आयसिसनं सिरिया आणि इराकमधल्या तेल विहिरींचा ताबा मिळवला आहे. विहिरीतून निघणारं तेल अनधिकृतरीत्या विकलं जातं. 
अपहरण, बँका लुटणं, माल आणि माणसं यांची वाहतुक यावरची  जकात हेही उत्पन्नाचे मार्ग आहेत.
सिरिया आणि इराकमधे पाचेक हजार वर्षांच्या पुरातन वस्तू आहेत. त्या विकणं हाही एक उत्पन्नाचा मोठा मार्ग आहे. ही विक्री काळ्या बाजारात होते. श्रीमंत अमेरिकन, युरोपीय, ब्रिटीश, सौदी इत्यादी लोक बोली लावतात, वस्तू मिळवून पसार होतात.
 आयसिस इस्लामी कर, जकात बसवतं. 
जमा झालेले पैसे, युद्ध व इतर गोष्टींवर खर्च झालेले पैसे याचा हिशोब ठेवला जातो आणि दरवर्षी मार्च महिन्यात तो प्रसिद्ध केला जातो. २०१५ च्या जानेवारीपर्यंत आयसिसचं उत्पन्न २ अब्ज डॉलर होतं आणि २५ कोटी डॉलरची शिलकी रक्कम युद्ध खात्यात जमा केलेली होती.
।।
आयसिसच्या खिलाफतीत किती सक्रीय जिहादी आहेत? 
पश्चिमी माध्यमं आणि सरकारांच्या मते जिहादींची संख्या १ लाख आहे. आयसिसमधे प्रत्यक्ष वावरून बाहेर पडलेल्या अभ्यासकांच्या मते त्यापेक्षा किती तरी जास्त सैनिक आयसिसमधे आहेत. एक तृतियांश सिरिया-इराकी नसलेले म्हणजे बाहेरचे आहेत.  २१ टक्के लिबियन.  १६ टक्के ट्युनिशियन आणि सौदी. ११ टक्के जॉर्डनियन. १० टक्के इजिप्शियन. ८ टक्के लेबॅनीज. तुर्की जिहादींची सख्या सुमारे दोन हजार म्हणजे २ टक्के आहे. ६ टक्के फ्रेंच. ४.५ टक्के ब्रिटिश. २०० ऑस्ट्रेलियन. 
आयसिस आणि जिहादी आपसातले आर्थिक व्यवहार बिट कॉईन्स या फिजिकल अस्तित्व नसलेल्या आभासी चलनात करतात. बिट कॉईन्समधे हिशोब होतो आणि नंतर प्रत्यक्ष डॉलरमधे त्याचं रुपांतर करून व्यवहार केले जातात.
।।
आयसिसच्या प्रचार विभागाचा प्रमुख आहे अबु महंमद अल अदनानी अल शामी, एक सिरियन जिहादी. इलेक्ट्रॉनिक संदेश तयार करण्याची तांत्रिक जबाबदारी एका फ्रेंच जिहादीवर आहे. त्यानं माध्यमाचं आणि माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण मेसॅच्युसेट्स इन्सटिट्यूटमधे ( एमआयटी, अमेरिका ) घेतलं आहे. त्यानं तयार केलेला एक प्रभावी संदेश असा. ” पश्चिमी देशात रहाणाऱ्या एकलकोंड्या जिहादी लांडग्यानो. आयसिसच्या विरोधात लढणाऱ्या देशांमधे रहात असाल तर त्या देशातल्या नागरिकांना मारून टाका, जसं जमेल तसं. हवं तर अंगावर कार घालून. “
प्रचार विभागाकडं शेकडो आयटी विशेषज्ञ आहेत. ते नाना प्रकारचे आयपी पत्ते तयार करतात आणि इंटरनेटवरच्या देखरेख ठेवणाऱ्या संस्थांना मामा बनवतात. २०१४ साली अमेरिकेनं वरील प्रकारचे ४५ हजार संदेश नेटवरून पुसुन टाकले. न पुसता आलेले कित्येक संदेश शिल्लक असतील येवढं सायबर  जिहादी जाळं आहे.
।।
आयसिसचा खलिफा.
अबु बकर अल बगदादी. तो लोकांसमोर येत नाही, टीव्हीवर भाषणं वगैरे करत नाही, शक्यतो दिसण्यापासून दूर रहातो. कधी कधी लोक त्याला अल शबाह म्हणजे अदृश्य शेख म्हणतात. तो आपल्या कमांडरांसमोर भाषण करतो तेव्हां चेहरा मास्कनं झाकून घेतो.
अल बगदादीनं इमामतचं रीतसर शिक्षण घेतलं आहे. बगदाद विद्यापिठातून त्यानं इस्लामी कायदा या विषयावर बीए, एमए आणि पीएचडी केली आहे. या उलट ओसामा बिन लादेननं तसं रीतसर धर्मशिक्षण घेतलेलं नाही. अल बगदादी हा निष्णात लढवय्याही आहे आणि धार्मिक नेताही. खलिफा व्हायला तो लायक आहे. 
खलिफा म्हणजे मुसलमानांचा राजकीय आणि धार्मिक नेता. महंमदांच्या मृत्यूनंतर एकामामागोमाग एक असे खलिफा इस्लामचं साम्राज्य चालवत होते. खलिफा हे पद महंमदांच्याच घराण्यातल्या माणसाला मिळालं पाहिजे असा आग्रह धरणारे शिया. ते पद जाणत्यांनी, शहाण्यांनी, ज्येष्ठांनी विचार करून भरावं, त्या पदावर महंमदांच्याच वंशाचा माणूस असायला हवा असं नाही असं म्हणणारा गट म्हणजे सुन्नी. अल बगदादी थेट महंमदांच्या वंशातला नाही. अल बगदादी बोबाद्री जमातीत जन्मला.  ही जमात कुरेश या जमातीचा एक फुटवा आहे. कुरेश ही महंमदाची जमात.
त्याचं खरं नाव आहे इब्राहिम बिन अव्वाद बिन इब्राहिम अल बद्री अल कुरेशी. त्याचा जन्म इराकमधील समारा गावातला, १९७१ सालचा. एकेकाळी समारा हे गाव अब्बासिद साम्राज्याची राजधानी होतं. 
अल बगदादीच्या घराण्यात अनेक इमाम झाले.  स्वतः अल बगदादी हाही एक इमाम आहे.  इमाम म्हणजे प्रार्थनेचं नेतृत्व करणारा माणूस.  इस्लाममधे पुरोहित, मध्यस्थ नसतात.  देव आणि उपासक यांच्यात थेट संबंध असेल अशी इस्लामची कल्पना आहे. खरं म्हणजे प्रेषित म्हणजे महंमद हेही देव आणि उपासक यांच्या मधे येत नाहीत. प्रेषितांनी इस्लामचा संदेश लोकांपर्यंत पोचवला येवढंच. इस्लामचा अगदी कडक अर्थ लावायचा झाला तर प्रेषिताची पूजा करणं, प्रेषितांचं कथन पवित्र मानणंही धर्मात बसत नाही. असो.  
एकच अल्ला, महंमद हा एकच आणि शेवटला प्रेषित, प्रार्थना, हज, दान आणि श्रद्धा. येवढ्या गोष्टी जाहीर केल्या की माणूस इस्लामी होतो. त्यासाठी कोणाची मध्यस्थी लागत नाही. उपासकानं कुराण वाचावं आणि वरील अटीप्रमाणं वागावं की संपलं. या पैकी प्रार्थना ही सामुहिक गोष्ट आहे. इस्लाममधे दिवसातून पाच वेळा सामुहिक प्रार्थना महत्वाची आहे. घरात मनातल्या मनात किवा घरातल्या घरात प्रार्थना नव्हे तर सामुहिक प्रार्थना. त्या प्रार्थनेचं नेतृत्व एक माणूस करतो. प्रार्थना झाल्यावर तो त्याची काही मतं व्यक्त करतो. ती त्याची व्यक्तिगत मतं असतात, ती उपासकांवर बांधिल असतातच असं नाही. इस्लामच्या रचनेत इमामाचं महत्व मर्यादित आहे.  
 इमाम जाणता असतो, अभ्यासक असतो त्यामुळं एक जाणकार शहाणा या नात्यानं लोक त्याच्याकडं पहातात. परंतू त्याच्यामागं राज्यसत्ता उभी असल्यानं त्याचं महत्व वाढतं. राज्यकर्त्याच्या, सुलतानाच्या वर्तनाला इमाम विरोध करत नाही. विरोध केला तर त्याचं डोकं उडवलं जातं. इमामाची आपल्याला मान्यता आहे असं त्यामुळं राज्यकर्ता बिनधास्त सांगू शकतो. खलिफा म्हणजे इस्लामी समाजाचा प्रमुख हा ऐहिक आणि धार्मिक दोन्ही बाबतीत प्रमुख असतो असं मानण्याची प्रथा महंमदांपासून सुरु झाली. नंतरच्या काळात राजाला समांतर अशी धर्माची, इमामांची सत्ता असली तरी ती सत्ता राजापुढं झुकणारीच असल्यानं इमाम साधारपणपणे राजसत्तेच्या होला हो म्हणतात.
ख्रिश्चॅनिटीनं चर्च नावाची संस्था उभी केली. ती अधिकारी संस्था असते. पोप हा तिचा प्रमुख असतो.   गावापासून ते रोमच्या प्रमुख प्रतिनिधी मंडळापर्यंत अशी निवडलेल्या प्रतिनिधींची एक साखळी यंत्रणा असते. धर्माबाबतचे निर्णय सर्वोच्च मंडळात घेतले जातात, पोप हा अधिकृत नेता असतो. पृथ्वीभोवती जग फिरतं किवा नाही यावर गॅलिलिओ काहीही म्हणो, पोपचा निर्णय   अंतिम मानला जातो.  स्टेम सेलचा वापर संशोधनासाठी, उपचारासाठी करायचा की नाही याबाबत पोपचा निर्णय अंतिम मानतात, वैज्ञानिकांचा निर्णय मानत नाहीत. मग भले पोपची मतं अवैज्ञानिक कां असेनात.  
इस्साममधे चर्च नाही पोप नाही. इस्लाममधे कुराण आणि प्रेषितांची वचनं व वर्तन याच गोष्टी मार्गदर्शक असतात आणि त्याचा कोणताही अर्थ काढायला कोणीही माणूस मोकळा असतो. तत्वतः. व्यवहारात मात्र ज्याच्या हाती तलवार, ताकद, सत्ता त्याचंच म्हणणं इस्लामी समाज मान्य करतो.
हिंदू धर्मात तर मजाच मजा. देव नाही मानला तरी बिघडत नाही. राजा हा देवाचा अंश असतो असं मानलं तरी हरकत नाही. (शिवाजीनं  ब्राह्मण पुरोहितांकडून राज्याभिषेक करवून घेतला.)  राजा देवाला जबाबदार असतो, देवानं सांगितलेल्या गोष्टी त्याला पार पाडायच्या असतात. परंतू राजा सांगेल ते ऐकायला खालचे लोक बांधिल असतातच असं नाही. राजाचंही ऐकत नाहीत आणि राजपुरोहिताचं तर नाहीच नाही. शिवाजीविरोधात हिंदू सरदारच बंड करत असत. हिंदू शिवाजी विरोधात हिंदू सरदार. थोडक्यात म्हणजे माणसाचं धर्मासंबंधीचं वागणं ठरवण्याचा अधिकार हिंदू परंपपरांत कोणालाही नाही आणि सर्वानाच आहे. अंगाला राख फासलेले, भगवे कपडे घालणारे, पौरोहित्य करणारे, शास्त्रार्थ सांगणारे इत्यादी लोक त्यांना सांगायचं ते सांगतात. लोक त्यांना हवं ते करतात, वरील लोकांचं ऐकण्याचं बंधन त्यांच्यावर नाही. त्यामुळं हिंदू धर्मात धार्मिक आज्ञा कोणी देत नाही, दिल्या तरी त्या स्वीकारण्याचं बंधन कोणावरही नाही. अर्थात असे अधिकार नसतांनाही धर्माच्या नावानं कोणीही गुंडगिरी करू शकतो.
 धर्म आणि देव न मानणाराही हिंदूच असतो. 
   धर्माचा गैर वापर करण्याची वाट   हिंदू आणि इस्लाम दोघांमधेही मोकळी आहे. ख्रिश्चॅनिटीत धर्माचा वापर गुंडगिरीसाठी करायचा असेल तर त्याला पोपची अधिकृत परवानगी लागते येवढंच. पोपला मॅनिप्युलेट करता येतं असा इतिहासाचा दाखला आहे. बेकायदेशीर, अनैतिक उद्योग करणारे पोपही होऊन गेले.
।।
२००३ मधे जॉर्ज बुशनी इराकमधे सैन्य घुसवलं. सद्दाम हुसेन राजवट संपवण्यासाठी. इराकवर आक्रमण करण्यासाठी  अमेरिकेतले ट्विन टॉवर्स नष्ट करणाऱ्या अल कायदाचा मुक्काम इराकमधे आहे हे कारण बुशनं पुढं केलं. परंतू लवकर जगजाहीर झालं की अल कायदा तिथं नाहीये, उलट सद्दाम हुसेन हा अल कायदाचा प्रखर विरोधक आहे. मग बुशनी दुसरं कारण पुढं केलं. इराककडं महासंहारक शस्त्रं आहेत. तेही खोटं निघालं.  एकेक सबब खोट्या  ठरेपर्यंत लाखो अमेरिकन सैनिक इराकमधे घुसले होते. अमेरिकेनं सद्दामला फाशी दिली. इराकी सैन्य बरखास्त केलं. तीनेक लाख इराकी सैनिक बेकार झाले. कित्येक इराकी सैन्याधिकाऱ्यांना, जनरल्सना अमेरिकेनं कँप बक्का या छळछावणीत पाठवलं. 
अनेक इराकी जनरल  अमेरिकन लष्कर प्रमुखाना भेटले आणि म्हणाले ” सैन्य बरखास्त करू नका. सैनिक शस्त्रांसकट देशोधडीला लागतील आणि काय वाट्टेल ते करत सुटतील. सैन्य ठेवा, हवं तर तुम्हाला नको असलेल्या माणसांना काढून टाका. पण लष्कर शिल्लक ठेवा.”
बुशचे सल्लागार बेकार होते. बंडल सल्ले देण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सेनाधिकाऱ्यांचं ऐकलं नाही. सैन्य बरखास्त करून अधिकाऱ्याना छळछावण्यात डांबलं. त्यातली बक्का छळछावणी  जिहादी विद्यापीठ बनली. अबु मुस्लीम अल तुर्कमानी हा जनरल सद्दामच्या क्रूर इंटेलिजन्सचा प्रमुख आणि  अबु अली अल अनबारी इराकी सैन्यात मेजर जनरल होता.  दोघंही बक्का छावणीत एकत्र आले, त्यांनी सैनिकांची संघटना बांधली आणि नेटवर्किंग करून इराकभर सैनिकांचं जाळ उभारलं. तुरुंगात असतानाच. वेळ आल्यावर ही प्रशिक्षित आणि सशस्त्र मंडळी अल बगदादीला सामिल झाली. वरील दोन्ही जनरल्स आज आयसिसच्या सैन्यात आणि कारभारात दोन नंबरवर आहेत.
     २०११ पर्यंत इराकमधे अमेरिकन सैन्य होतं पण तळातली परिस्थिती अमेरिका विरोधी होती. अल बगदादी सीरियात घुसला, असदशी भांडू लागला. तिथं त्याला जागा मिळाली. अल कायदा तिथं नव्हतं. २०१३ पर्यंत तिथं त्यानं माणसं गोळा केली. त्यात त्याला सौदी, कतार यांची मदत मिळाली. २००४ मधलं आयएस २०१४ मधे आयसिस झालं, इस्लामी स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. २०१४ मधे तो इराकमधे घुसला. तोवर अमेरिकन सैन्य ना मलिकीला हवं होतं ना ओबामाची रहायची इच्छा होती. ओबामा गोंधळात. त्यांना परिस्थितीचा नेमका अंदाज नाही. त्यांनी सैन्य बाहेर काढलं. आयसिसला अनेक जुने इराकी सैनिक हाताशी मिळाले. इब्राहिम इझ्झत अल दुरी हा सद्दामचा ज्येष्ठ अधिकारी बगदादीला सामिल झाला.  
   २००१ पासून अबु मुसाब अल झरकावी हा मुल्ला इराकमधे सक्रीय होता. त्याला ओसामा बिन लादेननं वाढवलं, अल कायदाची एक शाखा म्हणून.  झरकावी उस्ताद होता, त्याचा अजेंडा वेगळाच होता. त्याला अल कायदासारखं अख्ख्या जगामधे इस्लामी राज्य स्थापन करायचं नव्हतं. त्याची खिलाफत इराक आणि सिरियापुरतीच मर्यादित होती. त्यानं दोन्ही देशातल्या शियांच्या विरोधात युद्ध पुकारलं. शिया मशिदी, शिया वस्त्यांवर तो आत्मघाती हल्ले करत असे. अगदी एकेकट्या शियालाही गाठून मारलं जाई. शुद्द अरबी इस्लाम, वहाबी पंथाचा, त्यानं अंगिकारला. ओसामा बिन लादेनच्या गणितात तो बसेना. एक तर तो स्वतंत्र होणं ओसामाला मान्य नव्हतं. दुसरं म्हणजे त्याचा इस्लाम विभागीय होता. आश्चर्य म्हणजे त्याचे मार्ग ओसामाच्या मते फार क्रूर होते. ओसामाचे हल्ले सामुहिक असत.  मग त्यात कोणीही माणसं मेली तरी चालतील. व्यक्तिगत पातळीवर मुंडकी उडवणं  वगैरे गोष्टींना  ओसामा प्रोत्साहन देत नसे. 
 झरकावीनं सौदी सुन्नींचा पाठिंबा मिळवला. त्यानं उभारलेली संघटना आणि सामग्री त्याच्या मृत्यूनंतर अलगद अल बगदादीच्या हातात पडली.  
।।
राजकारण कसं असतं पहा.
सीरियात असद यांची हुकुमशाही राजवट आहे. असद हे अलवाईट शिया आहेत. २०११ साली अरब स्प्रिंग हा लोकशाहीवादी उठाव अरब जगात झाला तेव्हां सीरियातल्या तरूणानी आणि सेक्युलर राजकीय गटांनी निवडणुकीची मागणी केली. असदनं त्याना हं हं म्हणत झुलवलं आणि चेपलं. तिथून सीरियात यादवी सुरु झाली. नाना प्रकारच्या असद विरोधकांनी आघाड्या उभ्या केल्या. आघाड्या आणि असद यांच्यात जुंपली. असदला या आघाड्या निकाली काढायच्या आहेत. आयसिसलाही या आघाड्या नाहिशा करून सीरियाचा ताबा मिळवायचा आहे. त्यामुळं असदचा आयसिसला छुपा पाठिंबा आहे. त्याचं आणखी एक कारण असं की असद यांच्यावर अमेरिकेनं आर्थिक निर्बंध ( सँक्शन्स ) लादल्यानं असदला बाजारातून तेल विकत घेता येत नाही. आयसिस असदला आपल्या हातातलं तेल विकतं. गंमत म्हणजे यातलं बरंचसं तेल सीरियातल्या तेल विहिरीत निघतं. म्हणजे सीरियाचं अधिकृत तेल आयसिस चोरतं आणि ते पुन्हा सिरियन सरकारला देतं. 
विरोधकांचा पूर्ण खातमा होत नाही तोवर असदला आयसिस हवं आहे.
यात आणखी एक उपगोची आहे. असद हे अलवाईट शिया असल्यानं त्यांना शिया इराणचा छुपा पाठिंबा आहे. पलिकडच्या बाजूला आयसिस ही सुन्नी संघटना असल्यानं तिला सौदी-कतार इत्यादी सुन्नी सरकारांचा छुपा पाठिंबा आहे. तरीही आतल्या आत असद आणि आयसिस यांच्यात छुपे संबंध आहेत.
।।

अमेरिका आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखालील वीस देशांनी आयसिसला खतम करण्याचा विडा उचलला आहे. अमेरिकी किवा युरोपीय सैनिक मैदानात उतरवायची त्या देशांची इच्छा नाहीये. तसं केलं तर हज्जारो अमेरिकन-युरोपीय सैनिक मारले जाणारेत. अमेरिकी-पश्चिमी लोकांना त्यांच्या मुलांची प्रेतं घरी यायला नकोयत. इराकी, सिरियन, कुर्ड सैनिकांनी जमिनीवर लढाई करुन प्रदेशाचा ताबा घ्यावा आणि पश्चिमी लोकांनी हवाई हल्ले आणि इंटेलिजन्सची मदत करावी अशी पश्चिमी सरकारांची व्यूह रचना आहे. सीरिया, इराक, तुर्कस्तानातले लोक आपला जीव धोक्यात घालायला तयार नाहीयेत. कोंडी झालीय. पश्चिमी विमानं बाँब फेक करतात, आयसिसच्या नेत्याना एकेकटे गाठून ड्रोनच्या सहाय्यानं मारतात. पण त्याचा पाच पैसेही परिणाम आयसिसच्या विस्तारावर होत नाहीये. आयसिस पसरत चाललंय. केवळ सीरिया-इराकमधेच नव्हे तर खुद्द अरबस्तानातही. सौदी, बहारीन इत्यादी ठिकाणच्या शिया मशिदी ते खतम करू लागलेत, तिथल्या शियांना  मारू लागलेत.
स्वतः तयार केलेला भस्मासूर सौदी अरेबिया आणि इतर सुनी देशांवर उलटलाय.

8 thoughts on “आयसिस उत्तरार्ध

  1. There is no quick fix forr this problem. However, I believe, peaceful solutions can come only from moderate Muslims(MM). They only can, possibly, prevent and reverse radicalisation of Muslim youth. Unfortunately, we do not see MM in action. It could be because they are in hopeless minority amongst Muslims and -or afraid of physical harm. Politicians(From Barak Obama to Hollande to UN spokesperson to Mani Iyer) are doing disservice by talking politically correct language rather than plainly to garner votes. This politically correct language refuses to acknowledge the problem itself. So finding solutions does not even begin.

  2. नमस्कार सर आपल्या प्रदिर्घ अभ्यासपूर्ण लेखाने या आयसीस या भस्मारुपाची तोंडओळख झाली. हे सर्व वाचून येणाऱ्या भविष्याच्या पोटात काय दडलयं याचा विचार करून थरकाप होतो. त्याचप्रमाणे अमेरिकेसारख्या अनंतकोटीब्रम्हांडनायक देशाचा अध्यक्ष (तेव्हाचे धाकटे बूश) मनमानी करून करून किंवा बदसल्ल्याच्या आहारी जाऊन संपूर्ण जागतिक शांततेला कसा सुरुंग लावतात ते ही स्पष्ट झाले. येथे भारतात बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावर आपण म्हणतो की बिहारच्या "अज्ञानी" लोकांनी भाजपला हरवून चाराचोरांचं राज्य आणलं असे काही म्हणतात मग त्याच न्यायाने विचारावेसे वाटते की, अमेरिकन जनतेने ह्या बूश साहेबाला कसं निवडलं ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *