बानू मुश्ताकना बूकर पारितोषिक

बानू मुश्ताकना बूकर पारितोषिक

 बानू मुश्ताक यांच्या कथासंग्रहाला २०२५ सालचं बूकर पारितोषिक मिळालं आहे. मूळ कथा कन्नड भाषेत आहेत, भाषांतर Heary Lamp या शीर्षकानं प्रसिद्ध झालं आहे.

पुस्तकात मुस्लीम स्त्रियांच्या कहाण्या आहेत. बानू वकील आहेत, कार्यकर्त्या आहेत. वकिली करताना त्या मुस्लीम स्त्रियांवरील अत्याचाराच्या केसेस लढल्या. बानू सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न घेऊन त्या आंदोलनं करतात. उदा. मुस्लीम स्त्रियांना मशिदीत प्रार्थनेची परवानगी नव्हती. बानू लढल्या. त्यांना मुस्लीम समाजाचा रोष आणि छळ सहन करावा लागला. बानू लेखकही आहेत. कर्नाटकात बंडखोर लेखक या नावाची एक संघटना आहे. विविध प्रश्नांवर बंडखोरी लिखाण करणारे लोक या संघटनेत सक्रीय असतात. बानू त्या संघटनेच्या सदस्य आहेत.

बानू स्वतः मुस्लीम आहेत. एकूणात त्यांना पन्नासेक वर्षाचा मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नाचा धगधगीत परिचय आहे. तो त्यांच्या साहित्यातून येत असतो.

बानू यांच्या एका कथेतली स्त्री म्हणते ‘देवा, एकदा स्त्रीचा जन्म घेऊन पहा.’ एक कथा एका तरूण मुलीवर आहे. तिला शिकायचं असतं. पण समाज शिकू देत नाहीत. भावंडांचं शिक्षण, घराची जबाबदारी यातच ती अडकलेली रहाते. एक स्त्री मुलंबाळं आणि संसार सांभाळण्यात पिचलेली असते, मुल्ला लोक नुसते उपदेश करतात, चूल आणि मूल हेच तुझं कर्तव्य आहे असं सांगतात, पण तिला सोसाव्या लागणाऱ्या त्रासातून मार्ग काढायला मुल्ला मदत करत नाही. एका स्त्रीनं मुलं होणं थांबवण्याची शस्त्रक्रिया करून घेतली, तिला सहा मुलं आहेत. तिचं हे धाडस समाजाला पसंत नाहीये, समाज तिला त्रास देतो.

बानू यांच्या लेखी श्रद्धा हा खलनायक नाहीये की आधार नाहीये. श्रद्धाळू माणसं स्त्रियांशी कसं वागतात येवढंच बानू दाखवतात. साहित्यात बरेचवेळा स्त्रिया हे सामाजिक प्रश्नांचं उदाहरण किंवा प्रतिक म्हणून निवडल्या जातात आणि त्या आडून लेखक त्याचे विचार मांडतात. बानू यांच्या कथेचं वैशिष्ट्यं असं की स्त्रिया जशा आहेत तशा दिसतात, जशा घरात असतात, जशा स्वयंपाकघरात वावरतात, जशा प्रार्थना करताना दिसतात, जशा सडकेवर वावरत असतात.

स्त्रियांवर अन्याय कोण करतं? अर्थात पुरुषच. अनेक पुरुष पात्रं बानू मुश्ताक यांच्या कथात आहेत. काही पुरुषांचा थांग लागत नाही, काही पुरुष मारहाण करतात, काही पुरुष चांगलंही वागतात, काही पुरुष भाऊ असतात, काही पुरुष नवरे असतात, काही पुरुष मुल्ला असतात. काही पुरुष ‘शेपूट नसलेली माकडं’ असतात.

बक्षीस स्वीकारताना बानू मुश्ताकनी अगदी स्पष्टपणे त्यांची मतं मांडली. ‘मुस्लीम स्त्रियांनी कसं वागावं, काय करावं, काय करू नये इत्यादी गोष्टी त्यांना धर्म, सरकार, समाज सांगत असतो. तिला ना अधिकार ना स्वातंत्र्य. समाज तिला पिळत असतो.’ 

बानूंचं  म्हणणं भारतातल्या इतर स्त्रियांनाही लागू नाही काय? जातीबाहेर प्रेम/ लग्न केलेल्या तरुणींच्या हालाच्या आणि खुनाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. स्त्रियांवरच्या अत्याचाराच्याही बातम्या आता सवयीच्या झाल्यासारख्या आहेत.

बूकर हे जगातलं एक  प्रतिष्ठित पारितोषिक आहे. इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या साहित्याला हे बक्षीस दिलं जातं. जगातल्या कुठल्याही देशातल्या, कुठल्याही भाषेतल्या साहित्याची निवड होते, फक्त ते इंग्रजीत प्रसिद्द झालेलं असायला पाहिजे अशी अट असते. बक्षीस म्हणून ५० हजार पाउंड दिले जातात. शॉर्ट लिस्ट झालेल्या लेखकांना प्रत्येकी २५०० पाऊंड दिले जातात. लेखकानं किंवा प्रकाशकानं प्रवेशिका भरायची नसते, परीक्षक मंडळ आपणहून पुस्तकं निवडतं. एक पुस्तक बक्षिसासाठी निवडलं जातं,  एकूण साहित्यिक कर्तबगारी असा विषय नसतो.

दर वर्षी पाच जणांचं परीक्षण मंडळ निवडलं जातं. ते सुमारे ८ महिने काम करतं. परीक्षक मंडळात साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, प्रकाशक इत्यादी असतात. २०२३ साली परीक्षकांनी पहिल्या फेरीत १६३ पुस्तकं निवडली, वाचली. प्रत्येक परिक्षकानं प्रत्येक पुस्तक वाचलं. नंतर त्यातून १२ पुस्तकं निवडली. ती पुन्हा सर्वानी वाचली. त्यानंतर ६ पुस्तकं अंतिमसाठी निवडली. तीही सर्वानी वाचली. आणि त्यातून शेवटी एका पुस्तकाची निवड करण्यात आली.

भारतीय लेखकांना आतापर्यंत मिळालेली बूकर अशी. १९९७ साली अरुंधती रॉय (दी गॉड ऑफ ऑल थिंग्ज). २००६ किरण देसाई (दी इनहेरिटन्स ऑफ लॉस).२००८ अरविंद अडिगा (दी व्हाईट टायगर). २०२२ गीतांजरी श्री (टूंब ऑफ सँड). यू आर अनंत मूर्ती (कन्नड) यांना २०१३ साली  नामांकन मिळालं होतं.

कथांचं इंग्रजी रुपांतर दीपा Bhasthi यांनी केलंय. परीक्षकांनी अनुवादाचं खूप कौतुक केलंय, अनुवादातली भाषा इंग्रजीचं भाषा वैविध्य वाढवतात, इंग्रजी वाचकाला एक वेगळ्या प्रत्ययकारी इंग्रजीची ओळख करून देतात असं परीक्षकांनी म्हटलंय.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पन्नासच्या दशकात कन्नड नव साहित्याचा उदय झाला असं मानलं जातं. तोवर वंचित, दुर्लक्षित असलेल्या समाज घटकांचं जगणं नव्या साहित्यात प्रकटलं. नव्या प्रवाहात स्त्री लेखकांचा वाटा मोठा आहे. सारा अबूबकर, गीता नघभूषण, वैदेही, कमला हम्पना, त्रिवेणी, कोडगीना कवेरम्मा सारख्या लेखकांनी महिलांच्या भावना आणि तिच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला. पण त्यांचं लेखन केवळ स्त्रीपुरतंच मर्यादित नव्हतं, समाजातले सर्व प्रवाह त्यांच्या लेखनात आले. 

आतापर्यंत सर्वात जास्त ज्ञानपीठ पारितोषिकं हिंदीला, ११, मिळाली आहेत. हिंदी भाषकांची संख्या पहाता ते समजण्यासारखं आहे. त्या खालोखाल कन्नड साहित्याचा नंबर लागतो, ८ कन्नड साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळालं आहे. कन्नड भाषक चांगले वाचक आहेत, पुस्तकांचा खप त्या भाषेत लक्षणीय आहे.

।।

Comments are closed.