मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता कमी

नरेंद्र मोदी पंतप्रधान न होण्याच्या
शक्यता
भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा
मिळतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं माध्यमं एकत्रितपणे सांगत आहेत.
भाजपला जास्त जागा मिळण्याला मोदी यांची प्रतिमा आणि कर्तृत्व कारणीभूत आहे, मोदी
खूप लोकप्रिय असून एक लाट आहे असं माध्यमं सांगत आहेत.  
माध्यमातून दिसतय की  मोदी हा एकांडा शिलेदार रथ घेऊन निघाला आहे. भाजपमधले
फारच कमी लोक त्यांच्याबाजूनं प्रचार करताना, भाषणं करताना दिसतात. उलटपक्षी
भाजपमधले काही नेते त्यांच्या बाजूचे नाहीत असं माध्यमं दाखवत आहेत. खुद्द संघही
हातचं राखूनच बोलत आहे, मोंदींचं गुणगान करायची संघाची तयारी नाही.
 देश कसा चालेल, व्यापक आर्थिक वा परराष्ट्रीय
धोरण कसं असेल याचा उलगडा मोदींच्या भाषणांतून होत नाही, पत्रकार परिषदा किंवा
गंभीर विचार करणाऱ्या लोकांशी चर्चा करून वरील मुद्दे मोदींनी मांडलेले नाहीत. देश
चालवायचा तर वरील विषयाचे जाणकार सल्लागार हाताशी असावे लागतात, ते दिसत नाहीत.
 मोदी आजवर फक्त गुजरातमधेच कार्यरत होते, अगदी
आताही. देशात हिंडले  आहेत, तिथल्या
स्वतःच्या पक्षाच्या किवा इतर पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले वा घनिष्ट
संबंध आहेत असं आजवर दिसलेलं नाही. माध्यमं म्हणतात त्या प्रमाणं दहा वीस तरी
बारीक सारीक पक्षांना बरोबर घेऊन मोदी पंतप्रधान होऊ शकतात. इतक्या नाना
प्रकारच्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी विकसित केल्याचं दिसत नाही.
उलटपक्षी त्यांचं वागणं टोकाचं एकांगी, हेकेखोर, हट्टी असल्याचं दिसत. माध्यमातून
ते एक ताठर, आपल्यातच रमलेले गृहस्थ दिसतात. पटकन फोन उचलला आणि उत्तर प्रदेश,
आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र अशा कुठंही पाच दहा महत्वाच्या माणसाशी पटकन  संवाद ते करू शकतील  असं त्यांच्या गेल्या काही वर्षातल्या
वागण्यावरून दिसत नाही. त्यामुळं निवडणुक पार पडल्यावर ते नाना राज्यातल्या नाना
पक्षांशी कसे बोलतील ते कळत नाही.  
नाना पक्षांच्या बरोबर सरकार स्थापन
होतं तेव्हां त्या त्या पक्षांची माणसं मंत्रीमंडळात येतात. ते पक्ष आणि मंत्री
आपापला पक्ष आणि मतदार संघ यांना फायदा व्हावा या दिशेनं आपल्या खात्याचा वापर
करतात. त्यामुळं प्रचंड ओढाताण आणि विसंवाद निर्माण होतो. एका पक्षाचं सरकार आलं
तरीही ती परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी समंजस, परिपक्व पंतप्रधान असला तर तो
कुशलतेनं वाट काढतो. हेकेखोर माणसाला ते जमत नाही.  
सरकारातले पक्ष कोणतेही असोत, सरकारात
नाना खाती असतात. या खात्यांमधे आपसात मारामाऱ्या चाललेल्या असतात. प्रत्येक खातं
जास्तीत जास्त पैसे ओढण्यात मग्न असतं, दुसऱ्या खात्याची अडवणुक करत असतं. हे अगदी
नेहमी घडत असतं. या सर्वाची उत्तम जाण असणारा माणूस असेल तरच सर्वांना कौशल्यानं
सांभाळून सरकार चालवलं जातं. मोदींबद्दल माहित असलेल्या गोष्टी त्यांच्याकडं वरील
गुण आहेत असं दाखवत नाहीत.गुजरातेतही एकतरफी , धाकानं ते सरकार चालवतात असं कळतं.
वाजपेयी हे एक पंतप्रधानपदाचं आदर्श
उदाहरण आहे. अडवाणींकडंही ते गुण आहेत. देशाच्या पातळीवर समंजसपणे काम करणारी इतर
कितीशी माणसं भाजपत आहेत माहीत नाही. कदाचित यशवंत सिन्हा तसे असू शकतील.
भाजपबाहेर जॉर्ज फर्नांडिस, ज्योती बसू यांच्याकडं ते गुण होते. काँग्रेसमधे
परवापरवापर्यंत काही  माणसं हे साधू शकत
होती. राजकारणी नसूनही मनमोहन सिंग ते काम पार पाडू शकले.  पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्याकडं ते
गुण आहेत.
निवडणुक पार पडल्यानंतर
संख्याबळानुसार भाजपला सरकारात जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल. मोदी पंतप्रधान नको
असं वाटणारे गट भाजप-संघात आहेत. त्यात केवळ सत्तास्पर्धेचा भाग म्हणून काही लोक
असतील आणि केवळ शहाणपणाचा भाग म्हणूनही तसं वाटणारे लोक असतील. मोदी पंतप्रधान
झाले तर सरकार स्थापन होणं, नंतर ते नीटपणे चालणं दोन्ही गोष्टी कठीण दिसतात.
कदाचित त्यातून भाजपवर अधिक विपरित परिणाम होऊन भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल आणि
एक नैराश्यही पक्षात पसरेल.
अडवाणी किवा एकादा आश्चर्यकारक नवा
चेहरा पुढं येईल.
सरकारात जाऊच नये, विरोधी पक्ष
म्हणूनच काम करावं. कठीण परिस्थितीचा सामना करण्याचं संकट काँग्रेस किंवा इतरावर
टाकून सुखी व्हावं असाही निर्णय घेतला जाईल.
 माध्यमांमधून दिसणारं  चित्रं मोदी यांना उपकारक दिसत नाही.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *