नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

ब्रॅड पिटची दी वॉर मशीन नावाची फिल्म नुकतीच प्रदर्शित झाली. नेटफ्लिक्सवर. अमेरिकन  जनरल मॅकक्रिस्टल यांना जनरल पदावरून हाकलणं या घटनेवर आधारलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. ब्रॅड पिटनं जनरल मॅकमोहनची भूमिका केलीय. मॅकमोहनला अफगाणिस्तानात पाठवलं जातं. मॅकमोहन म्हणतो की त्याला युद्ध करायचं नाहीये, त्याला अफगाणिस्तानची नव्यानं बांधणी करायची आहे. अफगाणिस्तानातली अफूची शेती बंद करून कापूस पिकवायची व्यवस्था मॅकमोहनला करायची आहे. त्याला शाळा काढायच्या आहेत. वगैरे. हे सारं हेलमांड प्रांतातल्या अफगाणांना सांगायला मॅकमोहन जातो तो प्रचंड शस्त्रं घेऊन. त्याच्या भोवताली रणगाडे, विमानं, अत्याधुनिक बंदुका असतात. समोर बसलेले अफगाण निःशस्त्र असतात. ते सारं ऐकून घेतात आणि म्हणतात ” तुम्ही येवढंच करा, तुम्ही अफगाणिस्तान सोडून जा, आमचं आम्ही पाहून घेऊत.”

मॅकमोहन म्हणतो ” तालिबानचा बंदोबस्त आम्हाला करू द्या, मगच तुम्हाला शांतता लाभेल.”

अफगाण सांगतात ” आमचं आम्ही पाहून घेऊत. तुम्ही गेल्यावर आमचं आम्ही सांभाळू. तुम्ही आधी जा.”

सिनेमात अमेरिकेची लष्करी ताकद पदोपदी दाखवली आहे. भय वाटावं असे रणगाडे, प्रत्येक सैनिकाजवळ असलेली अत्याधुनिक शस्त्रसामुग्री, अत्याधुनिक हेलेकॉप्टर्स आणि ड्रोन. सायन्स फिल्ममधे शोभावा असा एकूण  प्रकार. आणि दुसऱ्या बाजूला अगदीच खेडवळ हत्यारं घेतलेले अफगाण.

मॅकमोहन हेलमांड घेण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात काही मुलकी अफगाण मारले जातात. बोंब होते. मॅकमोहनला अध्यक्ष बराक ओबामा परत बोलावतात.

अमेरिकेच्या एकूण अफगाण विषयक आणि परदेश धोरणावर सिनेमा मत मांडतो. शस्त्रांचा वापर करून एकादा देश जिंकणं, आटोक्यात ठेवणं, सुधारणं अशी अमेरिकेची परदेश नीती दिसते. त्यासाठी अमेरिका अधिकाधीक शस्त्रं निर्माण करतं, शस्त्रांवरचं संशोधन आणि निर्मितीवर अधिकाधीक पैसा खर्च करतं. सैनिकांची संख्या, प्रशिक्षण, त्यांचं सुख यावर सरकार पैसे खर्च करतं. सरकार अमेरिकन विद्याशाळा आणि उद्योगाना या कामी लावतं, त्यावर खर्च करतं, त्यांना अनुदान देतं.

येवढं करून, दीडेक लाख सैन्य आणि अब्जावधी डॉलरचा खर्च करूनही अफगाणिस्तानातल्या स्थितीवर अमेरिका तसूभरही प्रभाव टाकू शकत नाही. तालिबानचे आत्मघाती सैनिक दर आठवड्याला चारदोनशे माणसं मारतात. मध्यंतरी हजारो पाऊंडांचा एक महाबाँब अमेरिकेनं तालिबानच्या अड्ड्यावर टाकला. फार माणसं मेली नाहीत कारण तिथं माणसं नव्हतीच, पळून गेली होती. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर तालिबाननं चारपाचशे माणसं मारली.

दुसऱ्या महायुद्दात अमेरिकन शस्त्रं आणि लढाई यशस्वी झाल्या. पण नंतरच्या वियेतनाममधे अमेरिकेला फारच दारूण अपयश पत्करावं लागलं, त्यांची छीथू झाली, त्यांचं हसं झालं. त्यानंतर अलिकडं इराक आणि अफगाणिस्तानात महाग यश अमेरिकेच्या पदरी पडतय. दीड दीड लाखाचं सैन्य ठेवूनही तिथं आयसिस आणि तालिबानचा पराभव करणं अमेरिकेला जमत नाहीये. अगदी काल परवाच काबूलमधल्या कडेकोट विभागात तालिबाननं हल्ला करून शंभरेक माणसं मारली.

दुसऱ्या महायुद्धातली लढाई पारंपरीक लढाई होती. दोन्ही बाजूला लश्करं होती. लश्करं नेहमी स्वतःचा जीव वाचवत वाचवत शत्रूसैनिकांना मारत असतात. एकादा सैनिक जखमी झाला रे झाला की तिथं डॉक्टर, वाहन पोचतं, जखमी सैनिकावर  उपचार होतो, आवश्यक वाटल्यास त्याला  जलद गतीनं अधिक चांगल्या लश्करी आरोग्य केंद्रावर पोचवलं जातं. एक सैनिक जेव्हां आघाडीवर असतो तेव्हां त्याच्या मागं पाच दहा माणसं त्याची काळजी घेण्यासाठी सज्ज असतात. सैनिक मरण्यासाठी जात नसतो. स्वतःचा जीव वाचवण्यावर त्याचा भर असतो. सैनिक पुढं सरकण्याच्या आधी विमानं आणि तोफा त्याचा मार्ग निर्धोक करत असतात. हे सारं लष्करशास्त्र पारंपरीक युद्धासाठी तयार झालं आहे.

वियेतनामनंतरची युद्धं वेगळी आहेत. वियेत काँग, आयसिस, तालेबान, अल कायदा, लष्करे तय्यबा, हे शत्रू पारंपरीक शत्रू नाहीत. त्यांच्या लढाईचं मुख्य सूत्र स्वतः मरणं असं आहे. ती मंडळी क्षेत्राची कडेकोट व्यवस्था लावल्यानंतर पुढं सरकत नाहीत. ती मंडळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लढाईत उतरत नाहीत. ती मंडळी स्वतः मरण्यासाठीच लढाईत उतरतात. मोसुल, काबूल, पठाणकोट इथं येणारा दहशतवादी आपण जिवंत परत जाणार नाही या तयारीनंच निघालेला असतो. त्याला वाचवण्याची कोणतीही व्यवस्था त्याची संघटना करत नसते. त्यामुळंच पारंपरीक लष्कर किंवा पोलिस त्याचा मुकाबला करण्यास असमर्थ ठरतात.

न्यू यॉर्कचे टॉवर पाडायला निघालेली माणसं किती होती? डझनभरच. बलाढ्य अमेरिका त्यांना रोखू शकली नाही. अकरा सप्टेंबरनंतर अमेरिकेत पुन्हा तसे हल्ले झाले नाहीत किंवा ब्रीटनलाही तशा हल्ल्यांना तोड द्यावं लागलं नाही कारण त्यांनी उभी केलेली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था लश्करी पद्धतीची आणि बळाला प्राधान्य देणारी नाही. घराघरावर लक्ष ठेवून घटना घडायच्या आधीच थांबवण्यावर या यंत्रणांचा भर आहे.

इराक, सीरिया, अफगाणिस्तान, काश्मीर, पंजाब या ठिकाणीही लष्करी पद्धतीनं सरकारं वागत आहेत हे कदाचित तिथल्या अपयशाचं कारण असेल. अफगाण समाजात अमेरिका मिसळलेली नाही. अफगाण संस्था आणि लोक व्यवहारात अमेरिकन माणसांचा शिरकाव नाही. अफगाण शाळा, कॉलेजेस हॉस्पिटलं इत्यादी ठिकाणी अमेरिकन माणसं, गुप्तचर नाहीत. जवळपास तशीच अवस्था पाकिस्तानात आहे. अमेरिकन माणसं विमानात आणि रणगाड्यात असतात. त्यांना रस्त्यावरचं वास्तव कळत नाही. त्यामुळंच अफगाण आणि पाकिस्तानी त्यांना शेंड्या लावतात. ओसामा बिन लादेन साताठ वर्ष एबटाबादेत सुखात वावरत होता, पाकिस्ताननं त्याला लपवून ठेवलं, अमेरिकेला शेंडी लावली. शेवटी अमेरिकेनं जेव्हां पाकिस्तानला टांग मारून स्वतःची गुप्तचर यंत्रणा वापरली तेव्हांच बिन लादेन हाती लागला.

काश्मिरात, पाकिस्तानात, पाकव्याप्त काश्मिरात काय चालतंय याचा पत्ता भारतीय लष्कर, पोलिस, सरकारला लागत असेल असं वाटत नाही. कारण भारत अजूनही पारंपरीक लश्करी चाकोरीत आहे. बलाढ्य लष्कर वापरून आपण दहशतवाद्यांना नमवू शकतो अशा काळविसंगत कल्पनेत भारत वावरतो आहे. काश्मिरातल्या घटनांचं ते एक मुख्य कारण आहे. समाज आणि दहशतवादी, समाज आणि उपद्रवी लोक, यांना वेगळे ओळखण्याची आणि वेगळे राखण्याची ओळखण्याची गरज असते. दहशतवादी आणि उपद्रवी नेहमीच समाजात मिसळत असतात, समाजाला वेठीस धरत असतात, समाज ही त्यांची ढाल असते. तेव्हां दहशतवाद्यांना वेगळं पाडणं, त्यांना आधीच रोखणं यावर भर देणारी यंत्रणा तयार करायला हवी.

ज्यांना रोखायचं आहे अशा माणसांची, संघटनांची आणि देशांची बित्तंबातमी गोळा करणं हा नव्या लढाईचा कळीचा मुद्दा असेल. दिखाऊ दूतावास हा परदेश नीतीचा मुख्य भाग असता कामा नये. परदेशातले दूतावास आपल्या देशाच्या मोठेपणाची जाहिरात करण्यासाठी नसतात ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. परदेशात नाना पद्धतीनं, नाना संस्थांमधे वावरून  माहिती गोळा करणाऱ्या माणसांची संख्या वाढवावी लागेल. हे फार खर्चिक आणि चिकाटीनं करावं लागणारं काम आहे. हे काम करणाऱ्या संघटनांचं चिन्ह कान असायला हवं, ढोल नव्हे.

पुढला काळ बिकट आहे. दोन देशांमधली लष्करी लढाई हा प्रकार कमी असेल. दहशत आणि दादागिरीचा वापर आपापले हेतू साध्य करण्यासाठी होणार आहे. कदाचित देशही लष्करी कारवाई ऐवजी छोट्या दहशतवादी कारवाया करून शत्रू देशांना छळेल. धर्म या एकाच बिंदूभोवती दहशत पसरवली जाणार नाही. आपली जात, आपलं खाणं पिणं, आपले कपडे, आपली भाषा, आपलं राज्य, आपलं गाव, आपलं रेलवे स्टेशन, आपल्या नदीचं पाणी,आपला खेळ आणि आपली टीम अशा गोष्टींसाठीही गट एकत्र येऊन माणसं दहशतवाद करणार आहेत. जर्मनीतल्या तुर्कानी जर्मनीतल्या कोणाला मतदान करावं हे सांगण्यासाठी तुर्की प्रेसिडेंटनं जर्मनीतल्या तुर्कांना  दंगा करायला लावलं.

कोणीही पाच पन्नास माणसं कुठंही एकत्र येऊन हिंसा माजवू शकतात. अल कायदानं विकेंद्रित हिंसेचं तंत्रज्ञान तयार केलं आहे. आता बाँबचाच वापर करायला पाहिजे असं नाही. फ्रान्समधे आणि जर्मनीत दहशतवाद्यांनी जमावामधे ट्रक घुसवून माणसं मारली. लंडनमधे गेल्या काही दिवसात दोन वेळा दहशतवाद्यानी गर्दीत घुसून चाकूसुऱ्यांचा वापर करून माणसं मारली.

मुद्दा असा की बंदुका, रणगाडे, विमानं या अस्त्रांचा वापर आता अनेक ठिकाणी निरूपयोगी ठरणार आहे. माणसांवर, संघटनांवर, लक्ष ठेवून, वेळीच आळा घालणं, पुढची वेळ न येऊ देणं यावर भविष्यात लक्ष द्यावं लागेल. समाजानं स्वतःच्या संरक्षणाची आखणी, नियोजन, अमलबजावणी आता चाकोरीच्या बाहेर जाऊन करायला हवी.

।।

 

7 thoughts on “नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

  1. Crystal clear. Cuts through the clutter like a hot knife through butter! Excellent piece.

  2. १०.०६.१७
    आपले म्हणणे बरोबर आहे . परंतु त्यासाठी पोलीस खाते बळकट असावे लागते . पोलीस खात्यात CID विभाग असतो . त्यांना पूर्वी मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जायचा . ते सतत जनमानसाचा मागोवा घेत असायचे . पोलीस हे समाजाचेच घटक असतात . त्यांना जन सामान्यांची नस पटकन ओळखता यायची . CID विभागातील लोक गाजावाजा न करता काम करायचे . प्रसिद्धी पासून दूर असायचे . गुन्हेगार , गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडलेले लोक , अवैध व्यापार करणारे , त्यांच्याकडे काम करणारे असे सगळेच लोक CID खात्यातील लोकांना माहिती द्यायचे .

    हळूहळू गुन्हा अन्वेषण ( Crime Branch ) विभागाचे महत्व वाढत गेले . मारून टाकण्यातच धन्यता , वीरता मानली जायला लागली ( उदा . दया नायक , साळसकर ) . आणि CID खात्याचे networkउद्ध्वस्त होत चालले

    काश्मीर मध्ये पोलिसांचे नेटवर्कशिल्लक नाही , सगळे BSF आणि लष्कराच्याहातात समाजजीवन आहे . त्याची भीषण किंमत सगळ्यांनाच मोजावी लागत आहे . लष्करास खूप मर्यादा असतात . त्यांना फक्त मारून टाकावयास शिकवलेले असते .

    आधुनिक समाजव्यवस्थेत २५० पोलीस प्रती १ लाख लोकसंख्ये मागे असणे अपेक्षित आहे . तर ६ न्यायाधीश असणे अपेक्षित आहे . पोलीस खात्याचे सुद्धा त्रिभाजन होणे अतिशय गरजेचे आहे . १) कायदा सुव्यवस्था सांभाळणारे . २) गुन्हे शोधणारे आणि त्यांच्यावर खटले दाखल करणारे आणि खटले चालवणारे . ३) वाहतूक व्यवस्था सांभाळणारे .

    यासाठी नागरिकांनी सतत तक्रारी केल्या पाहिजेत . पोलिसांनीही जास्तीत जास्त तक्रारी नोंदवून घेतल्या पाहिजेत . ते तक्रारीच नोंदवून घेत नाहीत आणि सगळे आलबेल असल्याचे चित्र निर्माण करतात . मग सरकार म्हणते सगळेच व्यवस्थित आहे तर मग पोलिसांची संख्या कशाला वाढवायची ! आणि न्यायाधीश तरी कशाला पाहिजेत !!

  3. १०.०६.१७
    आपले म्हणणे बरोबर आहे . परंतु त्यासाठी पोलीस खाते बळकट असावे लागते . पोलीस खात्यात CID विभाग असतो . त्यांना पूर्वी मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जायचा . ते सतत जनमानसाचा मागोवा घेत असायचे . पोलीस हे समाजाचेच घटक असतात . त्यांना जन सामान्यांची नस पटकन ओळखता यायची . CID विभागातील लोक गाजावाजा न करता काम करायचे . प्रसिद्धी पासून दूर असायचे . गुन्हेगार , गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडलेले लोक , अवैध व्यापार करणारे , त्यांच्याकडे काम करणारे असे सगळेच लोक CID खात्यातील लोकांना माहिती द्यायचे .

    हळूहळू गुन्हा अन्वेषण ( Crime Branch ) विभागाचे महत्व वाढत गेले . मारून टाकण्यातच धन्यता , वीरता मानली जायला लागली ( उदा . दया नायक , साळसकर ) . आणि CID खात्याचे networkउद्ध्वस्त होत चालले

    काश्मीर मध्ये पोलिसांचे नेटवर्कशिल्लक नाही , सगळे BSF आणि लष्कराच्याहातात समाजजीवन आहे . त्याची भीषण किंमत सगळ्यांनाच मोजावी लागत आहे . लष्करास खूप मर्यादा असतात . त्यांना फक्त मारून टाकावयास शिकवलेले असते .

    आधुनिक समाजव्यवस्थेत २५० पोलीस प्रती १ लाख लोकसंख्ये मागे असणे अपेक्षित आहे . तर ६ न्यायाधीश असणे अपेक्षित आहे . पोलीस खात्याचे सुद्धा त्रिभाजन होणे अतिशय गरजेचे आहे . १) कायदा सुव्यवस्था सांभाळणारे . २) गुन्हे शोधणारे आणि त्यांच्यावर खटले दाखल करणारे आणि खटले चालवणारे . ३) वाहतूक व्यवस्था सांभाळणारे .

    यासाठी नागरिकांनी सतत तक्रारी केल्या पाहिजेत . पोलिसांनीही जास्तीत जास्त तक्रारी नोंदवून घेतल्या पाहिजेत . ते तक्रारीच नोंदवून घेत नाहीत आणि सगळे आलबेल असल्याचे चित्र निर्माण करतात . मग सरकार म्हणते सगळेच व्यवस्थित आहे तर मग पोलिसांची संख्या कशाला वाढवायची ! आणि न्यायाधीश तरी कशाला पाहिजेत !!

  4. Sadhya sthitich Uttam vishleshan… Bhavishyacha agadi yogya andaj vartawala aahe… Chan lekh.. Jagala velich dhokhyacha Ishara denarach lekh…

  5. THIS is a fact.
    a once successful strategy repeatdly used , without considering the changing time & situation, THEN IT IS BOUND TO FAIL.

  6. निळू माझा शाळेपासूनचा मित्र आहे. तो पहिल्या पासूनच अतिशय अभ्यासू आणि प्रत्येक गोष्टीचं सखोल विश्लेषण करायचा. Times of India वाचून राजकीय किंवा सामाजिक घटनेवर चर्चा करणारे त्याला कधीच आवडायचे नाही. माझ्या मनात निळू बद्दल नेहमीच प्रेमाची आणि आदराची भावना राहिलेली आहे.

  7. विविध विषयांवर माहितीपूर्ण ब्लॉग आहेत. राजकारणाची आवड असलेल्यांना खूप आवडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *