विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

विस्कटलेला समाज सदृढ करण्याचा रघुराम राजन यांचा विचार

रघूराम राजन यांचं थ्री पिलर्स हे पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र, अर्थ शास्त्र या विषयांची एक सहल आहे. राज्य (स्टेट), बाजार आणि समुदाय या समाजाच्या तीन घटकांचा इतिहास, त्यांची आजची स्थिती यांचा एक दीर्घ आढावा राजन यांनी घेतला आहे. बाजार,तंत्रज्ञान याचा संबंध राज्याशी येतो आणि हे दोन घटक मिळून समुदाय, समाज घडवतात. गेल्या वीसेक वर्षात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण यामुळं खूप बदल घडले असून त्यामुळं समुदाय हा घटक मोडकळीला आला, विस्कटला आहे. तेव्हां समुदाय (community)सुदृढ व्हावा यासाठी काय करता येईल याचा विचार राजन यांनी या पुस्तकात केला आहे.

राजन यांचा मुद्दा किंवा त्यांचा चिंतेचा विषय त्यांनी घेतलेल्या एका उदाहरणावरून लक्षात येतो. इंदूर या शहरात सराफा बाजार या विभागात माणसं टपऱ्यांवर खात असत आणि रिकाम्या प्लेट्स, उरलेलं अन्न इत्यादी गोष्टी रस्त्यावर फेकत असत. अनेक माणसं रस्त्यावरच विधी उरकत असत. एकूणात सराफा बाजारात फार घाण झाली होती आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत होता. पालिका होती, पालिकेचे कामगार होते, मध्य प्रदेश राज्याचा आरोग्य विभाग होता, कदाचित केंद्र सरकारचंही एकादं खातं या प्रश्नाशी संबंधित असेल. इतकं सारं असूनही इंदुरची आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. इंदूरमधे व्यापारी होते, उद्योगपती होते, शिक्षक होते, वकील होते, डॉक्टर होते, इंटलेक्चुअल होते.  इंदुरचा समुदाय मोठा होता, कार्यक्षम होता, लायक होता आणि निवडुकांत भाग घेत होता. हे सारं असूनही आरोग्याचा प्रश्न भेडसावत होता कारण इंदुरचा समुदाय बिघडला होता.

आज आफ्रिका, आशिया, द. आफ्रिका इत्यादी ठिकाणी असे अनेक समुदाय आहेत जे धड नाहीत, त्यातल्या लोकांना नाना त्रास आहेत, पण त्या देशातलं सरकार, बाजार, समुदाय मिळून ते त्रास कमी करत नाहीयेत. समुदायात विषमता वाढतेय,बेकारी वाढतेय, गुन्हे वाढत आहेत आणि त्यामुळं एकूण देश चिंतेत आहेत.

राजन म्हणतात की समुदाय हा समाजाचा मुख्य, पायातला घटक असतो. तो सदृढ असेल, कार्यक्षम असेल, उत्साहानं काम करणारा असेल, उत्पादक असेल, विचार करणारा असेल तर तो समाज प्रश्न सोडवू शकेल. समाजाचे वरील आवश्यक गुण वाढवण्याची जबाबदारी सरकारची आणि बाजारांची आहे. त्यांनी समुदाय अशक्त करता तो अधिक बलवान होईल याकडं लक्ष दिलं पाहिजे असं राजन म्हणतात.

इंदूरमधल्या एक उत्साही व्यक्ती आणि इंदुरचा पालिका आयुक्त यांनी एकत्र येऊन विविध कल्पक उपक्रम करून इंदूर स्वच्छ आणि सदृढ केलं. देशात इंदूरचा स्वच्छतेमधे पहिला नंबर आला. पालिका, राज्य सरकार, बाजार, उद्यमी इत्यादी घटकांना कल्पक रीत्या एकत्र आणणं त्यांच्याकडून पोषक मदत घेणं जमलं आणि इंदूरचा समाज सुखी झाला.

सामान्यपणे याच रीतीनं जगातले समुदाय सुखी होतील असं राजन म्हणतात. सरकार हा घटक आवश्यक असतोच. पण तो कधीकधी जाचक होतो तर कधी कधी तो समाजाला पंगू करतो. ते टाळलं पाहिजे. बाजार हा अर्थव्यस्था गतीमान करणारा घटक आहे. हा घटक कधी कधी राक्षसी होतो, स्पर्धा अती टोकाला नेतो आणि समाजातली विषमता वाढवतो. तेव्हां तोही आटोक्यात आणला पाहिजे. हे सारं तेव्हांच जमेल जेव्हां समाजाचं राजकीय नेतृत्व शहाणं असेल. बेकारी, विषमता, गरीबी, बेबनाव, गुन्हे इत्यादी समस्यांवर योग्य उपाय न शोधता धार्मिकता, अतिरेकी राष्ट्रवाद या सवंग मार्गांचा अवलंब आताशा होतोय, तो समुदाय सुदृढ करण्याऐवजी समाजाचं नुकसान करेल असं राजन यांचं मत आहे.

राजन यांच्या एकूण अर्थ विचाराला लिबरल डेमॉक्रसी असं नाव देता येईल. लिबरल या संज्ञेत बाजार या घटकाला महत्व आहे. म्हणजे बाजार आणि लोकशाही याचं योग्य मिश्रण हा समाजाच्या हिताचा मार्ग आहे असं रघुराम राजन सुचवतात.

रघूराम राजन अर्थशास्त्री आहेत, तो विषय ते अमेरिकेत शिकवतात, काही काळ ते भारत सरकारचे सल्लागारही होते.

पुस्तक फार लांबलं आहे, खूप पसरलेलं आहे. पुस्तकात अभ्यास आहे, मजकुराला खोली आणि गांभिर्य आहे पण पीेचडी वगैरेंचं झेंगट पाठी लागलेला माणूस सोडला तर कोणी माणूस इतकं जडजंबाळ पुस्तक वाचेल असं वाटत नाही. मुख्य मुद्दे आणि त्यातला अभ्यास कायम ठेवूनही पुस्तक अधिक संपादित करता आलं असतं.

समुदायातल्या खूप लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये अशी स्थिती भारतात तर आहेच परंतू अमेरिका या श्रीमंत देशातही आहे. शिक्षण, नोकऱ्यात अग्रक्रम, आरक्षण असे उपाय सरकारं योजत असतात. या उपायांचा उपयोग होतो आणि दुरुपयोगही होतो. समाजातल्या वंचित, मागे पडलेल्या लोकाना मदत देणं हा एक अत्यंत जटील प्रश्न आहे. अलीकडं युनिवर्सल बेसिक इन्कम ही कल्पना मांडली जाते. राजन यांनी या कल्पनेचा विचार केला आहे, राजन या कल्पनेच्या बाजूचे दिसतात. ते अमेरिकेचा संदर्भ देतात. अमेरिकेत जगण्यासाठी माणशी सालाना २० हजार डॉलर आवश्यक असतात. राजन सुचवतात की नोकरी किंवा इतर मार्गानी २० हजारांना जेवढी रक्कम कमी पडते तेवढी सरकारनं द्यावी. ही रक्कम अमेरिकेच्या वर्षाच्या महसुलायेवढी होते. लोकांकडून कराच्या रुपानं यातला किती पैसा मिळेल? कर्ज काढता येईल. परंतू कर्जही किती काढायचं याला मर्यादा आहेत. समाजाची उत्पादकता वाढली,उत्पादन वाढलं तर हा खर्च सोसता येईल असं राजन यांचं मत आहे. पण या बाबत अधिक तपशीलात राजन गेलेले नाहीत.

अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे राजन यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्या आधारे अमेरिकेतल्या समुदायांचा अभ्यास त्यांनी मांडला आहे. समाजशास्त्र हा राजन यांचा विषय दिसत नाही. त्यामुळं भारतीय समाजाचा विचार करताना ते खोलात गेलेले नाहीत, तो विषय त्यांनी विस्तारानं मांडलेला नाही. समाजातली विविधता हा समाज एकत्र ठेवण्यातला एक मोठा अडथळा असतो. भारतात जात आणि भाषा या ओळखी इतक्या तीव्र आहेत की बहुतेक वेळा त्या राजकीय, आर्थिक गोष्टीना धुडकावून लावतात. परलोकाबद्दल असलेलं प्रेम, मिथकं खरी मानून त्या नुसार जगण्याचा प्रयत्न करणं हे घटक भारतीय समाजाला बाजारपेठ किंवा इतर आर्थिक विचारापासून दूर ठेवत असतात. भारतीय समाजात अजूनही फ्यूडल संस्कृती आहे, प्रत्येक माणूस जगतो तो दुसऱ्या कोणीतरी उपकार केलेले असतात या समजुतीनं. स्वतःचे अधिकार, स्वातंत्र्य या गोष्टी भारतीय माणसाच्या मनात नसतात. भारतीय समाजातल्या या वैशिष्ट्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला आहे पण त्यावरचे उपाय अजून स्पष्ट झालेले नाहीत. 

राजन यांचा अनुभव असलेली शिकागोमधली वस्ती आणि भारतातल्या वस्त्या यात फरक आहे. भारतीय कम्युनिटी किवा समाज हा एक फारच गुंत्याचा विषय आहे. अनेक जाती धर्माची पंथाची माणसं मिळून एक वस्ती तयार होते. पण त्या वस्तीत जाती, धर्म, भाषा इत्यादींचे स्वतंत्र गट आपली स्वतंत्र वस्ती करून रहातात. अशा अनेक वस्त्यांची मिळून एक वस्ती असं भारतीय वस्तीचं स्वरूप आहे. नाना वस्त्यांना एकत्र आणून सक्रीय करणं जमत नाही असा अनुभव आहे. हा भाग राजन यांच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा नसल्यानं राहून गेलेला दिसतो.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *