सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही

सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही

जून महिन्यातलं चेन्नई. विभाग मायलाई. 

सकाळची वेळ. शरदकुमार, त्याची पत्नी गीता आणि त्यांच्या तीन मुली हातात प्लास्टिकच्या घागरी घेऊन गर्दीत उभ्या आहेत. धक्काबुक्की चाललीय, पाण्याच्या टँकरपर्यंत पोचण्यासाठी. तासभर झाला.

दोन मुली शाळकरी आहेत. त्या कुरकूर करत आहेत. ” आठवडाभर शाळेला उशीर होतो. बाई ओरडतात. पहिला तास बुडतो.” 

शरदकुमारच्या एका हातात घागर, दुसऱ्या हातात सेल फोन. फोन वाजतो. 

ऑफिसमधून फोन. 

” दररोज उशीरा येतोयस, आज तरी लवकर ये “

” काय करू? ऑफिसमधे येण्याआधी आंघोळ आणि कशीबशी पुजा तरी व्हायला हवी की नको.”

पावसाचा पत्ता नाही. जून महिना असाच गेला. जुलैचीही खात्री नाही.

पत्नी घामेजलेल्या शरद कुमारसाठी आणि मुलींसाठी ट्रेमधून पाण्याचे ग्लासेस घेऊन येते, फणफणते ” या पाण्यासाठी ३८ रुपये मोजावे लागलेत.”

शरद कुमार कातावलाय. काही अंतरावरच्या नव्या इमारतींकडं बोट दाखवून म्हणतोय ” त्या इमारतींनी आमचं पाणी खेचलंय. आमच्याकडलं पाणी तिथं खेचलं जातय. श्रीमंत आहेत आहेत ना. त्यांच्याकडं पैसे आहेत, आमच्याकडं नाहीत. तेव्हां पाणी त्यानाच मिळणार.”

टँकर केव्हां येतो याचा नेम नाही. कधी कधी रात्री दहा वाजताही येतो. मग सारी रात्र पाण्यात जाते. जागरण होतं. मुलींचा आणि शरदकुमारचा दुसरा दिवस तारवटलेला असतो.

  चेन्नईतलं जमिनीखालचं पाणी संपलंय.

सध्या एआयडीएमकेचं राज्य आहे. त्या पक्षाचं म्हणणं आहे की टंचाई वगैरेच्या बातम्या खोट्या आहेत. तो विरोधी पक्षांनी केलेला खोटा प्रचार आहे. 

लोकांचे हाल वर्णन करणाऱ्या बातम्या परदेशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतात. त्यावर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं असं की हा पश्चिमी देशांचा भारताबद्दल पूर्वग्रह आहे, ते भारत विरोधी आहेत म्हणून अशा बातम्या छापतात. परदेशी वर्तमानपत्रांनी कधी कौतुक केलं तर मात्र ही मंडळी वर्तमानपत्राची कात्रणं विधानसभेत, पत्रकार परिषदेत नाचवून म्हणतात की पहा, परदेशी लोकंही आमचं कौतुक करतात.

विरोधी पक्ष आहे डीएमके. डीएमकेची लोकं  मोर्चे काढून शंख करत आहेत, सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरत आहेत, राजीनामा मागत आहेत.

दोन्ही पक्ष आळीपाळीनं राज्य करत असतात. दर वर्षी पाणी टंचाई होते आणि दर वर्षी त्या वेळचा विरोधी पक्ष त्या वेळच्या सत्ताधारी पक्षावर आरोप करतो. दर वर्षी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षावर आरोप करतो की त्यांच्या राज्यातच हा प्रश्न निर्माण झालाय, विनाकारण तो आपल्या बोडक्यावर बसलाय.

पाणी जसं शहरातल्या लोकांना पिण्यासाठी लागतं तसंच खेड्यात ते शेतकऱ्यांना पिकासाठी लागतं. उदा. केळी. केळी हे पीक फार पाणी खातं. हीच केळी नंतर खेड्यातून चेन्नईत येतात. पाण्याची टंचाई खेड्यातही आहेच. त्यामुळं केळ्यांचं उत्पादन घटतं, केळ्यांची किमत वाढते. बाजाराचा नियम. शेतकरी तरी काय करणार.

चेन्नईत पाणी महागलंय आणि केळीही. बाजारातली केळ्यांची आवक रोडावलीय. गेल्या आठवड्यात केळी २०० रुपये किलो होती, आता ती ५०० रुपये किलो झालीत.

केळ्यांची आवक कमी झाली तरी केळीच्या पानांची आवक मात्र व्यवस्थित आहे. तामिळ लोकांना केळीच्या पानावर जेवायला आवडतं. चेन्नईच्या हॉटेलात माणसं ताट वाटीत जेवतात. पाण्याची टंचाई झाल्यानं ताटं वाट्या धुवायला पाणी नाही. त्यामुळं हॉटेलवाले केळीच्या पानावर जेवण वाढू लागलेत. तामिळ माणसं त्यामुळं सुखावली असावीत.

भारत सरकारची एक पहाणी सांगते की २०२० साली भारतातल्या २१ महानगरांमधलं भूमिगत पाणी संपेल. चेन्नई हे त्यातलं एक वरच्या क्रमांकावरचं शहर आहे. चेन्नईची लोकसंख्या एक कोटी आहे.

तात्पर्य.

सरकारातले पक्ष बदलत रहाणं आणि देशाचे प्रश्न सुटणं यात संबंध नाही. 

(आधार- गार्डियन)

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *