पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

२०१५ चं साहित्याचं
नोबेल पारितोषिक स्वेतलाना अॅलेक्सिविच या पत्रकार महिलेला मिळालंय. त्यांची काही प्रसिद्ध,
प्रभावी पुस्तकं अशी – व्हॉईसेस फ्रॉम चेर्नोबिल, 
झिंकी बॉईज (अफगाण युद्धातल्या रशियनांची कथनं), वॉर्स अनवुमनली फेस (दुसऱ्या
महायुद्धात भाग घेतलेल्या रशियन स्त्रियांच्या कहाण्या). अॅलेक्सिविच सध्या बेलारूसची
राजधानी मिन्स्क या शहरात रहातात. नारोवल या गावातल्या स्थानिक पेपरात त्या काम करतात.
त्यांनी लिहिलेली पुस्तकं सोवियेत युनियनच्या राज्यकर्त्यांना मान्य नसल्यानं त्यांना
फ्रान्स, जर्मनीत परागंदा व्हावं लागलं होतं. 
बेलारुस हा त्यांचा पूर्व युरोपियन देश सोवियेत युनियनमधून मुक्त झाल्यावर त्या
आपल्या मायदेशात परतल्या आहेत.
अॅलेक्सिविच यांच्या
पुस्तकात मुलाखती आहेत, रीपोर्ताज (वार्तापत्रं) आहेत. त्यांनी निबंधही लिहिले आहेत.
त्यांच्या लिखाणाचं वर्णन मौखिक किंवा जबानी इतिहास असं करता येईल.
अॅलेक्सिविच म्हणतात
” इतिहासात केवळ हकीकत, वास्तवकथन असतं. त्यात भावना नसतात, भावना वगळलेल्या असतात.
मी जगाकडं इतिहास म्हणून पहात नाही, एक लेखक म्हणून मी त्यात मानवी भावभावनांचा कल्लोळ
पहाते. माणसाचं दैनंदिन सामान्य जीवन पाहून मी थक्क होते. त्यात अथांग सत्य दडलेली
असतात.”
बेलारूस लेखक अॅलेस
अॅडोमोविच यांच्या विचार आणि लेखनाचा प्रभाव अॅलेक्सिविच यांच्यावर आहे. त्यामुळंच
विसाव्या शतकातलं भयाण वास्तव चितारायचं तर त्यासाठी फिक्शन उपयोगाचं नाही, लोकांच्या
आठवणी लिहिल्या पाहिजेत असं अॅलेक्सिविच यांचं मत आहे.
अॅलेक्सिविच आयुष्यभर
रशियन, लाल रशियन समाज म्हणजे काय आहे ते शोधण्याचा, समजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
झारनं शेजारचे देश गिळून रशिया तयार केलं, कम्युनिष्ट राजवटीनी त्याचीच री ओढली आणि
अजूनही रशियन माणसं क्रूर दादागिरी मानसिकतेच्या बाहेर पडत नाहीयेत असं अॅलेक्सिविच
यांचं निरीक्षण आहे. रशिया म्हणजे एक महाकाय शवालय आहे, एका महाकाय रक्तपाताचा इतिहास
आहे असं अॅलेक्सिविच म्हणतात. क्रांती, छळछावण्या, दुसरं महायुद्ध, अफगाण युद्द, सोवियेत
युनियनचं विघटन आणि नंतर चेर्नोबिल हे रशियाचे ठसे आहेत असं त्यांना वाटतं. मारेकरी
आणि बळी यांच्यातला निरंतर आलाप हे रशियन आख्यान (नॅरेशन) आहे असं त्यांचं मत आहे.
तोच त्यांच्या लेखनाचा विषय आहे.
अॅलेक्सिविच लोकांमधे
मिसळतात. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जातात. दुर्घटनेच्या ठिकाणी माणसांना भेटतात. मारेकरी
आणि बळी. तिऱ्हाईत आणि निष्पाप बघे यांची कथन गोळा करतात. त्या माणसांना बोलतं करतात
आणि त्यांच्या मुलाखती आणि दिसणारं वास्तव आपल्या पुस्तकात मांडतात.
लोखंड जसं लोहचुंबकाकडं
खेचलं जातं तसं लेखिका  वास्तवाकडं आकर्षित
होतात.  लोकांचे आवाज, लोकांची कथनं, लोकांचे
कबुलीजबाब, लोकांच्या व्यथा हेच वास्तव आणि इतिहास असतो असं लेखिकेला वाटतं. जग म्हणजे
असंख्य लोकांच्या दैनंदिन जगण्याचा  कोरस असतो,
कोलाज असतो. लिहितांना लेखिका एकाच वेळी  लेखक,
बातमीदार, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि उपदेशक होते.तोच त्यांच्या लेखनाचा बाज
आहे.
वॉर्स अनवुमनली फेसमधे
लेखिकेनं  दुसऱ्या महायुद्धात आघाडीवर असलेल्या
रशियन स्त्रियांच्या कहाण्या नोंदलेल्या आहेत. सैनिक, नर्स, डॉक्टर्स इत्यादी कामं
त्या स्त्रियांनी केली. स्त्री माणसाला जन्म देते, माणसाला वाढवते, त्याचं पोषण करते.
स्त्री म्हणजेच जीवन. अशी स्त्री युद्धात एकीकडं बंदूक आणि रणगाडा चालवून माणसं मारते
आणि दुसरीकडं जखमी सैनिकांची शुश्रुषा करून त्याचा जीव वाचवते. हे सारं दाहक वास्तव
या पुस्तकातल्या असंख्य मुलाखतींत आहे.
रशियाला अरबी समुद्रात
एक वर्षभर उपयोगी पडणारं बंदर   अफगाणिस्तान,
पाकिस्तान या वाटेनं मिळावं यासाठी अफगाणिस्तानवर रशियाला ताबा हवा होता. जेणेकरून
रशिया समृद्ध होईल आणि जगातला कम्युनिझम समृद्ध आणि सत्ताधारी होईल. त्यासाठी रशियानं
अफगाणिस्तानवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अफगाणिस्तानात एक धार्जिणं सरकार
उभं केलं आणि ते टिकवण्यासाठी सैन्य तिथं पाठवलं. त्या सैन्याच्या हकीकती झिंकी बॉईज
या पुस्तकात आहेत.
झिंकी बॉईज म्हणजे
जस्ताच्या शवपेटीतून आलेले सैनिकांचे देह. अफगाणिस्तानातल्या कम्युनिष्टधार्जिण्या
सत्तेला वाचवण्यासाठी लढायला गेलेल्या सैनिकांची शवं जस्ताच्या शवपेट्यांतून रशियात
परतत होती. रशियन विमानतळाच्या विस्तृत आवारात धूळ खात पडत होती. कोणत्या पेटीत कोणाचं
शव याचीही धड नोंद सरकारकडं नव्हती. सैनिकांचे नातेवाईक एकेक पेटी, पेटीवरचं नाव पहात
पेटीतलं शव आपल्याच नातेवाईकाचं आहे काय याचा तपास घेत फिरत.
हजारो सैनिक अफगाणिस्तानात
मरत होते किंवा अपंग होत होते.  रशियान समाजाला
त्याची पडलेली नव्हती. आपल्याला छान हवेच्या ठिकाणी ‘डाचा’ कसा मिळेल, चांगली कार कशी
मिळेल, चांगलं मांस कसं मिळेल याचीच फिकीर त्याला होती. मृत सैनिकाच्या आप्तेष्ठांना
आपलं आक्रंदन जाहीरपणे करायलाही रशियात बंदी होती.
अफगाणिस्तानातल्या
रशियन  अधिकाऱ्याना तोंड धुण्यासाठीही पाणी
मिळत नव्हतं अशी  कोरड्याठाक अफगाणिस्तानची
स्थिती. पाणी आणण्यासाठी ते तरूण सैनिकाला बाहेर पिटाळत. सैनिक बाहेर पडायला तयार होत
नसे कारण सभोवताली मुजाहिदांनी सुरुंग पेरलेले असत. लाथ घालून अधिकारी त्याला बाहेर
पिटाळत. सुरुंगांवर पाय पडून तरूण सैनिक मरे किंवा अपंग होई.
अफगाण मुजाहीद रशियन
सैनिकाला पकडून केवळ तोंड जमिनीवर राहील इतपत जमिनीत गाडत आणि त्याच्या तोंडावर मुतत.  नंतर संधी मिळाल्यावर हा रशियन सैनिक अफगाणाला बुकले,
भोसके, जाळे; त्याच्यावर गोळ्यांचा मारा करे.
रशियन सैन्याला मदत
करण्यासाठी गेलेल्या स्त्रियांना अधिकाऱ्यांखाली झोपावं लागे, त्यांचे बलात्कार सहन
करावे लागत.
रशियात चांगलं जगणं
शक्य नसल्यानं तरूण मुलं निदान लढाईवर गेल्यानंतर तरी चार पैसे मिळतील आणि चांगल्या
परदेशी वस्तू मिळतील या आशेनं अफगाणिस्तानात जात. तिथं मरणयातना सोसत आणि समजा जिवंत
परतलेच तर पुन्हा बंडल जगणं त्यांच्या नशिबी येई.
अफगाण युद्धात अपंग
झालेले सैनिक व त्यांचे कुटुंबीय ; अफगाण युद्धात मारले गेलेल्या सैनिकांचे आप्तेष्ट;
अफगाण युद्धात नाना सेवा द्यायला गेलेलेल्या स्त्रिया आणि पुरुष यांच्या कहाण्या झिंकी
बॉईज या पुस्तकात अॅलेक्सिविच यांनी नोंदल्या आहेत.
जॉन लॉईड यांनी लंडन
रिव्ह्यू ऑफ बुक्समधे या पुस्तकावर लिहिलेला लेख वाचावा.
अशा लेखिकेला रशियात
कोण थारा देणार? अॅलेक्सिविचना फ्रान्स, जर्मनीत परागंदा व्हावं लागलं.
यंदाच्या नोबेलच्या
संभाव्य लेखकांच्या यादीत जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी, केनयन लेखक एंगुई थियोंगो
आणि नॉर्वेजियन नाटककार जोन फोसे होते.
 वरील लेखक हे लेखक, नाटककार होते, साहित्य या वर्गवारीत
बसणारे होते. अॅलेक्सिविच ललित लेखक नाहीत. त्यांचं साहित्य कल्पित नाही. त्यांचा मजकूर
म्हणजे खडखडीत वास्तव आहे, पत्रकारी आहे. असं असूनही ललित साहित्याचं पारितोषिक अॅलेक्सिविच
यांना कां आणि कसं मिळालं?
एक कारण त्यांच्या
लेखनाचा विषय. विषय प्रामुख्यानं मानवी दुःख, व्यथा, भावना, भावनांचे अनेक स्तर, परस्पर
विरोधी आणि विसंगत सूर, अगतीकता असा आहे. परंतू त्याची पार्श्वभूमी रशियन समाजाची आहे.
सामान्यतः पश्चिमी देशातली माणसं, सरकारं आणि संस्था कम्यूनिष्ट विरोध आणि त्या अंगानं
रशिया विरोध या बाजूला झुकतात. त्यामुळंच रशियातल्या स्वातंत्र्यवादी लेखकांना बक्षिसं
सहज मिळतात. (अर्थात त्या लेखकांचं साहित्यही चांगलं असतं.) मुक्त लोकशाहीवादी विचार
आणि कम्युनिझम यात एक साप मुंगुसाचा संघर्ष असतो. त्याचं प्रतिबिंब बक्षिसांत पडतं.
ते अॅलेक्सिविच यांच्या बाबतीत काही अंशी खरं आहे.
रशिया अफगाणिस्तानात
घुसला तशीच अमेरिकी वियेतनाममधे घुसली होती. 
वियेतनामी गनीम आणि अमेरिकन सैनिकही वियेतनाममधे रशियन सैनिक आणि अफगाण मुजाहिदांइतकेच
क्रूर होते. अॅपोकलिप्स नाऊ हा सिनेमा त्याचं प्रक्षोभक वर्णन करतो. रशियन माणसं अमेरिकेला
दोष देणार आणि अमेरिकन माणसं रशियाला. परंतू माणसाचं क्रौर्य आणि त्याचे समाजावर होणारे
भयानक परिणाम या गोष्टी दोन्ही बाबतीत समान आहेत. त्याच अॅलेक्सिविच यांच्या पुस्तकातून
वाचकासमोर येतात.
दुसरं एक कारण शैलीबाबतचं.
ललित साहित्यामधे
मानवी वास्तवाचं लेखकाचं आकलन व्यक्त होत असतं. पण लेखक ते वास्तव पचवून, त्यात आपल्या
प्रतिभेची भर घालून, त्यात कल्पिताचं मिश्रण करत असतो. पत्रकारही त्याचं वास्तवाचं
आकलन पत्रकारी शैलीत मांडत असतो. मांडणीत त्याची प्रतिभाही व्यक्त होत असते. फरक येवढाच
की पत्रकारी व्यक्त होण्यात कल्पिताला वाव नसतो. कल्पितेचा वापर हा दोन शैलीमधील व्यवच्छेदक
फरक असतो. परंतू शैलीच्या बाबतीत बोलायचं तर ललित आणि पत्रकारी यातला फरक हा वर्णनाच्या
मांडणीतला, आकृतीबंधाचा फक्त फरक आहे. दोन्ही शैली प्रत्ययकारी असू शकतात.
मार्खेज आणि विजय
तेंडुलकर त्यांनी यांच्या सभोवतालचं वास्तव पत्रकारी आणि साहित्य या दोन्ही शैलीत मांडलं.
परंतू असे लेखक कमीच असतात. लेखनामधे पत्रकारी लेखन आणि साहित्यिक लेखन असे दोन ढोबळ
वर्ग करण्याची प्रथा आहे. या वर्गवारीनुसार नोबेल पारितोषिक साहित्याला दिलं जातं,
पत्रकारीला नाही. (पुलित्झर पुरस्कार पत्रकारी शैलीला दिला जातो.)
यंदा हा पायंडा नोबेल
कमिटीनं मोडला याला एक पार्श्वभूमी आहे. कापुश्चिन्सकी या पोलिश पत्रकाराला त्याच्या
पुस्तकांबद्दल नोबेल देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. मार्गारेट अॅटवूड
या लेखिकेनं धरलेल्या आग्रहामुळं कापुश्चिन्सकीचा विचार झाला होता.
          कापुश्चिन्सकीनं अंगोला, इराण, इथियोपिया
इत्यादी अनेक देशामधल्या क्रांत्या आणि संघर्षांवर पुस्तकं लिहिली. घटनांची ग्राफिक
वर्णनं आणि लोकांच्या मुलाखती हे त्याच्या पुस्तकांचे मुख्य आधार होते.  एकादी कादंबरी वाचत आहोत असं त्याचं पुस्तक वाचतांना
वाटतं. एकादा सिनेमाच पहात आहोत असं त्याची पुस्तकं वाचताना वाटतं. अत्यंत व्यामिश्र
अशी व्यक्तिचित्रं आणि पात्रं त्याच्या पुस्तकात असतात. कल्पितासारखं  वास्तव.
कापुश्चिन्सकीला
साहित्याचं पारितोषिक द्यायचा निर्णय नोबेल कमीटीनं घेतला. परंतू तो निर्णय होऊन अमलात
यायच्या आधी कापुश्चिन्सकी वारले. त्यामुळं ते पारितोषिक हुकलं. पण नोबेल कमीटीच्या
विचारात मुळातला बदल झाला होता. त्याचा परिणाम म्हणून स्वेतलाना अॅलेक्सिविच यांना
यंदाचे नोबेल मिळालं.
 ।।

2 thoughts on “पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *