मोदी पर्वाची सुरवात झाली आहे. मोदींची तुलना जगातल्या इतर दोन
नेत्यांशी होतेय. मार्गारेट  थॅचर आणि देंग.
थॅचरनी ब्रीटनचं ग्रेटनेस पुन्हा परत आणायचं ठरवलं होतं. थॅचर एका
दुकानदाराची कन्या होत्या. मोदी छोट्या व्यवसायिकाकडं जन्मले आणि वाढले आणि
भारताचं गतवैभव पुन्हा मिळवण्याचा त्यांचा इरादा आहे. थॅचर एकहाती कारभार करत,
त्यांना त्यांच्या कामात कोणाची ढवळाढवळ चालत नसे. नको असलेली माणसं त्या धडाधड
काढून टाकत. मोदीही आपल्या पेक्षा वेगळ्या विचारांची माणसं सहन करत नाहीत.
थॅचर उघड आणि टोकाच्या भांडवलशाही-मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या
समर्थक होत्या. सरकार कमीत कमी आणि खाजगी व्यवहार जास्तीत जास्त हे त्यांचं सूत्रं
होतं. नरेंद्र मोदी सामान्यतः लहान आणि मघ्यम उद्योगांचे समर्थक मानले जातात.
तरीही अदानी, रिलायन्स, टाटा या उद्योग समूहांना त्यांनी मुक्तपणे मदत दिली आहे ही
गोष्ट त्यांच्या आर्थिक धोरणाचं रूप दाखवते. परंतू काही उद्योगांना अनौपचारिक रीतीनं मदत करणं आणि
धोरण म्हणून उद्योगांना प्राधान्य आणि सरकारी हस्तक्षेप किमान पातळीवर आणणं या
आर्थिक धोरणाचे ते समर्थक आहेत काय? या क्षणी
कळायला मार्ग नाही. त्यांच्या पुढल्या वर्षभरातल्या कारभारातून ते दिसेल, सिद्ध
होईल.
आर्थिक विकासाला गती देण्याची एक पद्धत देंग यांनी अवलंबली होती.
बाहेरचं भांडवल येऊ देणं, बाहेरच्या उद्योगांना चीनमधे मुक्त वाव देणं,
निर्यातप्रधान अर्थव्यवस्था उभारणं ही बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेची साधनं देंग
यांनी फार वेगानं अमलात आणली. परंतू हे करत असताना पक्षाचं, स्वतःचं आणि सरकारचं
नियंत्रण मात्र त्यांनी पक्कं ठेवलं. थोडक्यात असं की केंद्रीय राज्यव्यवस्था,
कम्युनिष्ट राजकीय विचार हे पक्के ठेवून बाजारकेंद्री अर्थव्यवहाराला अनौपचारिक मोकळं रान द्यायचं असा  असा
व्यवहार देंग यांनी साधला. त्यातून चीनची हनुमान प्रगती झाली.
मोदींचं व्यक्तिमत्व पहाता मोदींना देंगपद्धत अधिक शक्य वाटते. ते
पक्षावरची, केंद्र सरकारवरची, देशाच्या राज्य-अर्थव्यवस्थेवरची स्वतःची  पकड कायम
ठेवतील, देशाच्या व्यवहारांवर सरकारचं अधिपत्य टिकवतील आणि उद्योगांना मोकळीक देतील.
मोदी विजयानं
इतर पक्षांना आव्हान दिलं आहे. देशात राजकीय-आर्थिक विचारात घोळ न ठेवता ध्रुवीकरण
करण्याची निकड आता निर्माण झाली आहे. बाजार, आधुनिक अर्थव्यवस्था, उद्यमशीलता,
सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप या कसोट्यांवर 
आधारलेली राज्यअर्थव्यवस्था हा एक ध्रुव. सरकार, सरकारी क्षेत्रं यांच्या
अधिपत्याखाली चालणारी कल्याणकारी आणि वाटपाला प्राधान्य देणारी राज्यव्यवस्था हा
दुसरा ध्रुव.
भारतात राजकीय
पक्ष स्पष्टपणे एकाद्या ध्रुवाला चिकटायला तयार दिसत नाहीत. त्यातूनच मिश्र
व्यवस्था नावाची एक निष्प्रभ आणि नुकसानकारक वाट किंवा ध्रुव तयार झाला होता. आता
बदलत्या जगात  राजकीय पक्षांनी आपली भूमिका
स्पष्ट करायला हवी. समाजवादी, डावे इत्यादी लोकांनी आपला ध्रुव पक्का करावा आणि
भाजपनं इतर पक्षांना सोबत घेऊन तो ध्रुव पक्का करावा.
अडचण आहे ती
प्रादेशीक पक्षांची. सेना, बीजू जनता दल, तृणमूल, देसम, द्रमुक इत्यादी पक्षांना
वरील संदर्भात ध्रुवच नाहीत. ते आपापलं स्थानिक निरूंद राजकारण करतात आणि
सोयीनुसार कुठल्या तरी ध्रुवावर तात्पुरता मुक्काम करतात. या पक्षांचं काय करायचं
ते कळत नाहीये. जनतेनंच त्यांना कुठल्या तरी ध्रुवाकडं लोटून किंवा त्यांना मत न
देता यातून वाट काढावी.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *