नॅचरल शुगर या कारखान्यानं केलेल्या दोन कामांचे व्हिडियोज सोबत.
एक काम म्हणजे जलसंधारणाचं.
जलसंधारण म्हणजे पाणी आणि माती टिकवून धरणं. दोन्ही गोष्टी जमिनीत टिकल्या नाहीत तर जमीन निकस होत जाते. दोन्ही गोष्टी जमिनीत टिकवण्याचा परंपरागत नैसर्गिक मार्ग म्हणजे बांध बंदिस्ती. एकेकाळी ते केलं जात असे. परंतू काही शेकडा वर्षं शेतकऱ्याला पोषक अशा व्यवस्था समाजात न झाल्यानं शेतकऱ्याकडं पैसेच उरत नसत. त्यामुळं बांध बंदिस्ती शक्य झाली नाही. परिणामी जमिनी खराब झाल्या. यातून वाट काढण्यासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षात सरकारनं जलसंधारणाची कामं काढली. परंतू त्यात सरकारला म्हणावं तेवढं यश आलं नाही. कारण एक तर अकार्यक्षम आणि भ्रष्ट कारभार. दुसरं असं की या कामात लोकांना संघटित करावं लागतं. अनेक कारणांसाठी ते सरकारला जमलं नाही. परिणामी जमिनीचा दर्जा खालावत गेला.
नॅचरल शुगरनं ते काम साधलं. या खाजगी कारखान्यानं आपला खाजगी पैसा खर्च करून लोकांना संघटित केलं, जल संधारण यशस्वी केलं.
दुसरं काम म्हणजे शेडनेट तंत्रज्ञान वापरून तरूणांना नॅचरल शुगरनं संघटित केलं आहे. तरूणांना बीज भांडवल, तंत्रज्ञान, बियाणं इत्यादी पुरवण्यात येतंय. ते पिकवतील त्या भाजा आणि फळं चांगल्या किमतीला परदेशात निर्यात केली जात आहेत. भांडवल, तंत्रज्ञान, मार्केट या तीन गोष्टी एकत्र आल्या तरच कोणताही व्यवसाय, शेतीही,  यशस्वी होते. भारतात जी काही मिश्र अर्थव्यवस्था आणि कारभाराची पद्धत आहे त्यामधे वरील गोष्ट जमली नव्हती. नॅचरल शुगर या खाजगी कारखान्यानं ते करून दाखवलं.  खाजगी उद्योग सचोटीनं चालवला तर तो यशस्वी ठरतो, समाजाच्या   उपयोगी पडतो.
नॅचरल शुगरचे उपक्रम मार्गदर्शक ठरावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *