व्यापम. भुसभुशीत जमीन. त्यावर इमले बांधणारे भुसभुशीत इंजिनियर.

व्यापम. भुसभुशीत जमीन. त्यावर इमले बांधणारे भुसभुशीत इंजिनियर.

मध्य प्रदेशात चाळीसेक माणसांचे मृत्यू माध्यमांनी व्यापम घोटाळ्याशी जोडले आहेत. कोणाचा हृदय विकारानं मृत्यू झालाय, कोणी दारूचा डोस जास्त झाला म्हणून मेलंय, कोणी आत्महत्या केलीय. मध्य प्रदेश सरकारचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांची यातल्या काही मृत्यूंबद्दलची प्रतिक्रिया अशी- ‘ माणसं मरतच असतात. माणसाला हार्ट अटॅक येत असतो. जगण्यातल्या तणावामुळं माणसं आत्महत्या करत असतात. नेहमीच अशा गोष्टी घडत असतात. ‘
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले ‘ झालेले मृत्यू दुःखद आहेत पण ते व्यापम घोटाळ्याशी जोडणं योग्य नाही.’
दोन मृत्यूंचे तपशील असे.
८ जानेवारी २०१५ रोजी डॉ. रामेंद्र सिंग भदोरियाचा मृतदेह त्याच्या ग्वाल्हेरमधल्या खंचमिल मोहल्ल्यातल्या घरात पंख्याला टांगलेला आढळला. गळ्याभोवती उशी गुंडाळलेली होती आणि त्या भोवती टीव्हीची वायर गुंडाळलेली होती. वायरचं एक टोक छतावरच्या  पंख्याला गुंडाळलेलं होतं.
रामेंद्रचे वडील नारायण सिंग एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असत. तुटपुंजा पगार. मुलं शिकून मोठी झाली तरच जगणं सुखी होणार. मोठा होण्याचा एकच मार्ग म्हणजे डॉक्टर होणं. रामेंद्रचा शिक्षणातला रेकॉर्ड ठीकठाक, सामान्य होता. तरीही त्यानं डॉक्टर व्हावं असं त्याच्या वडिलांना वाटत असे. 
वैद्यकीय शिक्षणाची पूर्व परिक्षा व्यापम या मंडळासाठी रामेंद्रनं २००५ साली दिली. नापास झाला. पुन्हा ०६ आणि ०७ साली तीच परिक्षा दिली. नापास झाला. ०८ साली त्याला व्यापमच्या परिक्षेत कसं पास व्हायचं ते तंत्र कळालं. ( त्यानं तोतयाला परिक्षेला बसवलं की कॉपी केली की पैसे देऊन मार्क वाढवले त्याची चौकशी चालू आहे. ). ०८ साली रामेंद्र परिक्षा पास होऊन मेडिकल कॉलेजमधे दाखल झाला. २०१४ साली तो एमबीबीएस झाला.
 २०१३ साली व्यापम घोटाळा उघड झाल्यावर पोलिसानी केलेल्या चौकशीत रामेंद्र सापडला. ०८ साली रामेंद्रनं खोटेपणा करून प्रवेश मिळवला. नंतर २०१३ पर्यंत रामेंद्र व्यापम परिक्षात तोतया विद्यार्थी आणि कॉपी करून देणारा या नात्यान कार्यरत होता.  पोलिसानी २०१४ च्या एप्रिल महिन्यात त्याला नोटिस बजावली आणि त्याची एमबीबीएसची पदवी रद्द केली. 
 रामेंद्र हादरला. तरीही २०१४ च्या जून महिन्यात त्यानं एमबीबीएस पदवीच्या जोरावर ग्वाल्हेरच्या बिर्ला इस्पितळात डॉक्टर म्हणून नोकरी मिळवली. येवढंच नाही तर त्यानं पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्जही केला. पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश मिळवण्यासाठी एमबीबीस सर्टिफिकेटची आवश्यकता होती. पण  ते त्याच्याकडून पोलिसानी काढून घेतलं होतं.  त्याला पुढलं शिक्षण घेता येईना. परंतू बिर्ला इस्पितळातली त्याची डॉक्टर म्हणून नोकरी चालू होती, तो रोग्याना तपासत, उपचार करत होता. सप्टेंबरात त्यानं लग्नही ठरवलं. 
पोलिसांची चौकशी आणि ससेमिरा त्याची पाठ सोडत नव्हता.
८ जानेवारी 2015 रामेंद्रनं आत्महत्या केली.
।।
१६ जानेवारी २०१५.
मुरैना जिल्ह्यातलं नूराबाद हे गाव. गावातून वहाणाऱ्या संक नदीत  ललित कुमार गोलारियाचं प्रेत सापडलं. पुलावरून उडी मारून त्यानं जीव दिला होता. त्यानं घरी चिठ्ठी लिहून ठेवली होती. व्यापम प्रकरणी कंटाळून आपण जीव देत आहोत असं त्यानं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं.
ललित कुमार ग्वाल्हेरच्या गजरा राजा मेडिकल कॉलेजमधे शेवटल्या वर्षात शिकत होता. २००३ ते २००५ असं तीन वेळा ललितकुमार मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत बसला आणि नापास झाला. २००६ साली त्याला प्रवेश परिक्षेत पास होण्याचं तंत्र आत्मसात करून एमबीबीएसला प्रवेश मिळवला. रडत खडत त्याचं गाडं पुढं सरकत होतं. 
१९ जानेवारी २०१४ रोजी ललित कुमारला अटक झाली. खोटा प्रवेश, व्यापम परिक्षेतल्या घोटाळ्यातला सहभाग असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. तीन महिने ललित कुमार तुरुंगात होता. सुटल्यानंतर तो सतत तणावाखाली असे. मिटवा मिटवी, घेतलेले  किंवा देणं असलेले पैसे असला काही तरी मामला असावा. ललित कुमार आपल्या भावाकडं पैसे मागू लागला. या सगळ्या प्रकरणामुळं त्याच्या वैवाहिक जीवनातही तणाव झाले, त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. 
२०१५ च्या जानेवारीत ललित कुमारनं आपल्या मोठ्या भावाकडं १० हजार रुपये मागितले. कारण सांगितलं नाही. तणावाखाली होता असं भावाचं निरीक्षण. नंतर ८ हजार मागितले. भावानं दिले. नंतर १५ जानेवारीला पुन्हा ३ हजार मागितले. भावानं दिले. तो भावाशी शेवटला संपर्क. १६ जानेवारी २०१५ रोजी संक नदीच्या पुलावरून उडी घेऊन ललित कुमारनं आत्महत्या केली.
।।
अनुज, अंशुल आणि शामवीर असे तीन तरूण. 
कारनं प्रवास करत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. तिघंही मेले.
व्यापमसाठी तोतये गोळा करणं, खोटी प्रवेश पत्रं तयार करणं, विद्यार्थ्यांचे नंबर आणि पैसे व्यापम अधिकाऱ्यांकडं पोचवणं अशी एक मोठ्ठी इंडस्ट्री हे तिघं चालवत होते. तिघं उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश ही तीन राज्यं सांभाळत. प्रत्येक राज्यात यांनी व्यापमसाठी केंद्र उभारलेलं होतं.
उदा. उत्तर प्रदेशात लखनऊ, अलाहाबाद आणि कानपूर या ठिकाणी केंद्रं होती. या गावातल्या कोचिंग क्लासवर लक्ष ठेवलं जात असे. आयएस, परदेशी जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परिक्षा यांसाठी क्लासमधे जाणारी मुलं शोधली जात. सामान्य घरातली. ही मुलं मरमर अभ्यास करत, हुशार असत. त्यामुळं मध्य प्रदेशातल्या व्यापम सारख्या एकदम लल्लू पंजू परिक्षा म्हणजे त्यांच्या हातचा मळ असे. या विद्यार्थ्यांमधून तोतया विद्यार्थी तयार केले जात. या तोतयाना मध्य प्रदेशात परिक्षेच्या काळात नेलं जात असे. सर्व रचना काळजी पूर्वक केलेली असे. वर्गात एका विद्यार्थ्याच्या नावान हा तोतया परिक्षेला बसे.
 हे त्याला कसं जमे? 
परिक्षा वर्गात प्रवेश मिळण्यासाठी एक ओळख पत्र लागत असे. या ओळख पत्राच्या वरच्या अर्ध्या भागात विद्यार्थ्याचा फोटो असे आणि खालच्या अर्ध्या भागात विद्यार्थ्याचं नाव, पत्ता, सही इत्यादी तपशील असे. काम सोपं होतं. वरच्या भागातल्या  मुळ विद्यार्थ्याच्या फोटोच्या जागी तोतया विद्यार्थ्याचा फोटो लावला जात असे, खालच्या भागात बाकीचा तपशील जसाच्या तसा असे.
तोतया विद्यार्थी अशा ठिकाणी बसवला जाई जिथ त्याच्या आसपासचे तीन चार विद्यार्थी कॉपी करू शकत. म्हणजे एक अधिक चार अशा पाच जणांकडून पाच ते दहा लाख रुपये घेतले जात. ज्याच्या नावानं तो परिक्षेला बसे त्याच्याकडून जास्त पैसे, कारण तो विद्यार्थी काहीही न करता पास होत असे. म्हणून तो दहा लाख देणार. बाकीच्या मुलाना कॉपी करताना कां होईना थोडी तरी मेहनत करावी लागत असे. त्यामुळं त्यांना समजा दोन तीन लाख रुपये.
शिवाय स्वतंत्रपणे विद्यार्थ्याचे परिक्षा क्रमांक व्यापमला कळवणं, पैसे पोचते करणं आणि पास करवून घेणं हेही काम हे तिघं करत असत. तिघंही सतत फिरत असत, एकमेकाच्या संपर्कात असत. मध्य प्रदेशात ठिकठिकाणी त्यांना सतत जावं लागत असे.
तिघं अनेक वेळा एकत्र असत, पैकी एका वेळी अपघात झाला.
।।
१९९५ पासून हा घोटाळा सुरू होता असं म्हणतात.
किती आत्महत्या होणार? किती माणसं तणावाखाली मरणार?
जी मरत नसतील ती हज्जारो माणसं कशी जगत असणार?
।।
२०१३ साली प्रकरण उजेडात आलं. त्यानंतर ( कदाचित ) घोटाळा थांबला असण्याची शक्यता आहे.
या काळात किती मुलं पास झाली? एकूण समजा १६ वर्षं आणि प्रत्येक वर्षी सरासरी हजारेक मुलं. दोन चार हजार तोतये. प्रत्येक परिक्षा केंद्रातली काही माणसं. मेडिकल कॉलेजेसमधली माणसं. व्यापमच्या व्यवस्थापनातली काही माणसं. पोलिस, न्यायव्यवस्था, वैद्यकीय व्यवसाय यातली माणसं. प्रकरण चालू देणं आणि त्यातून पैसे मिळवणं यात अडकलेली शिक्षण, गृह इत्यादी खात्यातली काही शेकडा माणसं. म्हणजे काही हजार माणसं यात गुंतलेली. पक्के आकडे कळणं कठीण आहे. काही हजार  असं आडमापानं म्हणायचं.
ही झाली व्यापम घोटाळा चालवणारी माणसं. या घोटाळ्यात लायकी नसतांना पास झालेले डॉक्टर, पोलिस अधिकारी, न्यायाधीश, शिक्षक वेगळेच. त्यांचीही संख्या एकूणात दर वर्षी हजारभर धरली तरी पंधरा हजार लोक झाले. 
या हजारो लोकांची सपोर्ट सिस्टिम. गोविंदामधे वरच्या थरात एक दोन असतात, त्यांना खालच्या थरांतल्या पाच पन्नास लोकांची मदत असते. 
पंधराएक वर्षाच्या काळात इतकी लायक नसलेली माणसं समाजात वावरत आहेत. क्षमता नसल्यानं चुकीची माहिती, घातक माहिती व सेवा ही माणसं समाजात पसरवताहेत.  या सेवांनी वाढवलेली लाखो माणसं आताच्या पिढीत वावरत आहेत. 
।।
  शिवराज सिंह चौहान यांच्या भाजप आणि संघातली कित्येक लोकं या व्यवहारात थेट सामिल. त्यांनी यातून थेट पैसे गोळा केले. कित्येक लोक गोविंदाच्या खालच्या थरातले.   सर्व मिळून भ्रष्टाचाराची हंडी फोडतात. 
मुळात जमीन पोखरलेली.
तिच्यावर इमारत बांधायला निघालेली माणसं अज्ञानी आणि चोर. भाजप या पक्षाची यंत्रणा कशी आहे हे या निमित्तानं लक्षात आलं. ( काँग्रेस अजिबातच वेगळी नाही. काँग्रेसनं सुरवात केली, पायंडा पाडला.भाजप आता त्या वाटेनं जातोय.)
।।
राजकीय पक्ष तयार होतो, लोकांमधे जातो, लोकजागृती करतो, निवडणुका जिंकतो, सरकारमधे जाऊन योग्य कायदे करतो, सरकारनं आखलेले कार्यक्रम नोकरशाहीकडून पार पाडण्यासाठी मेहनत करतो. हे सारं पार पडतं कार्यकर्त्यांच्या जोरावर. पक्षाला कार्यकर्ते लागतात. ते कार्यक्षम, निरसल, स्वतःची तुंबडी न भरणारे असतील तर वरील सारी कामं पक्ष पार पाडतो.
चारित्र्यवान कार्यकर्ते  लोकांपर्यंत पोचले तर लोक आपणहून मतं देतात. पैसे मागत नाहीत. आमच्या घरावर छप्पर घालून द्या, आमच्या कॉलनीत पेवर ब्लॉक बसवून द्या असल्या मागण्या करत नाहीत. निरलस माणसानं गावात शाळा काढायची म्हटली तर शेतकरी आपली जमिन मोफत दान देतात. सरहद्दीवर सैनिक लढतात तेव्हां माणसं घरातलं सोनं नाणं सैन्याला देतात.
कार्यकर्ता काल फाटका होता आणि आज दणादण एसयुव्ही फिरवतोय म्हटल्यावर माणसं खट्टू होतात. कालपर्यंत घरोघरी कार्यकर्त्यांच्या बैठका होत होत्या आणि आता मोठाली एयर कंडिशंड कार्यालयं उभी राहिलेली पाहिल्यावर माणसं धास्तावतात. कालपरवापर्यंत सरसंघचालक एकट्यानं  रेलवेनं प्रवास करत भारतभर हिंडताना लोकांनी पाहिलेलं असतं.  आज सरसंघचालक ११६ सशस्त्र माणसांचा ताफा बाळगत  विमानानं फिरत असतात असं पाहिल्यावर माणसांचा विश्वास उडतो.  दिवसात सात ठिकाणी मार्गदर्शन करत नेता विमानानं फिरतो, त्याची विमानाची तिकिटं काढण्यासाठी काही तरी व्यवस्था करावी लागते. अशा मार्गदर्शनाचा परिणाम काय होणार, अशा मार्गदर्शनाला हजर रहाणारी माणसं कोण असणार? 
निरलस कार्यकर्ते संपले की माध्यमं, लालूच, आश्वासनं, स्वप्नांचे दाटघट्ट सायरप महासभांमधून पाजणं या वाटेनं जावं लागतं. त्यासाठी पुन्हा फार पैसे लागतात.
थोडक्यात असं की कार्यकर्ते नाहीत, फक्त धंदेवाईक माणसांच्या आधारे पक्ष आणि सरकारी यंत्रणा चालवल्या जातात.
लोकांना खरं काय आणि खोटं काय ते समजेनासं करून टाकलंय. 
योग्य काय आणि अयोग्य काय ते समजेनासं करून टाकलंय.
वैद्यकी न आली तरी चालेल, डॉक्टर झालं पाहिजे.
 ज्ञान आणि शहाणपण नसलं तरी चालेल शिक्षकाचा पगार मिळायला हवा. 
 घुशींनी पोखरलेला भुसभुशीत समाज. 
त्यावर इमले बांधू पहाणारे पक्ष. पक्षही भुसभुशीत.
कसं व्हायचं.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *