माणसाचा देव करण्याचा खटाटोप

माणसाचा देव करण्याचा खटाटोप

देवासारखा माणूस तयार होईल काय?

युवाल हरारी यांचं होमो डियस (Homo Deus) हे पुस्तक सध्या गाजतय. होमो डियस म्हणजे जवळ जवळ देव झालेला माणूस. देव म्हणजे पूर्ण व्यक्ती, पुर्ण निर्दोष व्यक्ती. एकेकाळी माकड असलेला माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जवळजवळ देव बनवला जातोय या विषयाभोवती हे पुस्तक फिरतं.

लेखक पृथ्वीचा  ४ अब्ज वर्षांचा जीवनप्रवास धुंडाळतो. आजचा माणूस घडण्याचा पहिला टप्पा ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाला. त्यावेळी  माणसाला बोधनाची, ज्ञान आणि समज घडवण्याची सोय मेंदूत झाली. ११ हजार वर्षांपूर्वी माणसानं शेती   सुरू केली शेती सुरु केली, जंगलं, मोठी जनावरं, उपयोगी नसलेली जनावरं-प्राणी मारायला सुरवात केली. पृथ्वी केवळ आपल्यासाठीच आहे असं मानव तिथून मानू लागला. त्याच्या या समजुतीवर जगभरातले आदिधर्म आणि नंतर ज्यू-ख्रिस्ती इत्यादी धर्म तयार झाले. हिंदू धर्म अपवाद होता, त्यानं प्राण्यांना मानवी जीवनाचा भाग मानलं. नंतर ५०० वर्षापूर्वी वैज्ञानिक क्रांती झाली, २५० वर्षांपुर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि ताजी माहिती तंत्रज्ञानाची क्रांती ५० वर्षांपूर्वी झाली.

या प्रवासात पृथ्वीवर केवळ मानवच उरेल या दिशेनं माणूस वागला. त्यानं भूक, दुष्काळ, युद्ध यांच्यावर मात केली. मृत्यू हा माणूस आणि देवातला मुख्य फरक. माणूस आता आयुष्य लांबवत लांबवत पाचशे हजार वर्षांवर घेऊन जात आहे, माणसाला अमर करण्याच्या  खटपटीत लागला आहे. अमरच नव्हे तर शरीर, मेंदू या सगळ्या बाबत निर्दोष आणि परिपूर्ण माणूस तयार करण्याची खटपट माणूस करतोय.

दुष्काळ, उपासमार, रोग आणि युद्ध या गोष्टी माणसानं संपवल्या.पण आता युद्दात जेवढी माणसं मरत नाहीत तितकी रस्त्यावरच्या अपघातात मरतात, अती खाण्यानं आणि निकस खाण्यानं मरतात.मानसीक ताणामुळं आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय, जगातल्या मृत्यूत तो सगळ्यात मोठा आकडा आहे असं लेखक दाखवतो.

भावना हे माणसाचं वैशिष्ट्यं. पण भावना  म्हणजे  रासायनिक इलेक्ट्रिकल प्रेरणा आहेत याचा शोध माणसानं लावला आहे. या शोधाचा उपयोग करून रासायनिक आणि इलेक्ट्रिकल प्रेरणांची पद्धतशीर मांडणी करून एक नवा मेंदू माणूस तयार करतो, सेंद्रीय नव्हे, निरींद्रीय मेंदू. अलगोरिदम, म्हणजे पद्धतशीर निर्णय पायऱ्या चालण्याची क्षमता निरींद्रीय मेंदूत माणूस गुंफतोय.

लेखक निरींद्रीय मेंदू आणि माणसाचा मेंदू यातला फरक सांगतो. सध्या बाजारात एक नवी कार येऊ घातलीय. ती माणसाविना चालेल. रस्त्यावरून प्रवास करत असताना येणाऱ्या सर्व शक्यता आणि अडचणींचा विचार करणारा कंप्यूटर या कारमधे असेल. अपघात होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही आणि कारमधली माणसंही सुरक्षित रहातील अशा रीतीनं ही कार चालेल. रस्त्यात माणसं आली, खड्डा आला, मधेच एकादी कार किंवा जनावर आलं, पाऊस पडला, बर्फ पडला इत्यादी सर्व शक्यतांचा विचार या कारमधे झालेला असेल. लेखक विचारतो की ही कार म्हणजे माणूस असेल काय? कारमधला कंप्यूटर म्हणजे माणसाचा मेदू असेल काय? कारला भावना असतील काय?

निरींद्रीय आणि सेद्रीय मेंदूतला फरक असा की निरींद्रीय मेंदू नियम, अलगोरिदम पाळून चालतो. माणूस तसं करत नाही. एकादी गोष्ट घातक आहे असं सांगितली तरी तो ती करतो.   तर्क आणि उपदेश दोन्ही धाब्यावर बसवून चक्रम निर्णय घेणं, चुका करणं  हे माणसाचं वैशिष्ट्यं आहे.

                                        हरारी

पुस्तकाचा शेवटला आणि सर्वात मोठा धडा डेटा रिलिजन,  माहितीचा धर्म करणं या विषयावर आहे. जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे माहितीचा एक तुकडा, इन्फर्मेशन बिट असतो असं जगानं ठरवलं आहे. या माहितीचा वापर करून  देवमाणूस तयार करण्याचा खटाटोप होतोय. माहितीवर नियंत्रण ठेवून काही मोजके देवपुरुष तयार होतील त्यांच्या द्वारे कॉर्पोरेशन्स समाजावर ताबा मिळवतील. समाजाचे दोन भाग होतील. एका भागात तुमच्या आमच्यासारखी बावळट आणि बिनकामाची कामगार मंडळी असतील, जी भावना वगैरेत गुंतलेली सामान्य, कमी जगणारी, दीर्घायुष्य नसलेली, प्रोग्राम्ड मेंदू नसलेली माणसं असतील. ती बहुसंख्य असतील. दुसऱ्या भागात असतील प्रोग्राम्ड मेंदूची कारखान्यात तयार केलेली माणसं आणि त्यांचा ताबा ज्यांच्याकडं आहेत अशी माणसं. एक नवी विषमता जन्माला येईल असं लेखक सुचवतो.

लेखकानं मानववंश इतिहास, तंत्रज्ञान, विज्ञान, बाजार, उद्योग, धर्म, संस्कृती इत्यादी क्षेत्रांचा एक विस्तृत पण धावता आढावा घेऊन वर्तमान आणि भविष्याचं चित्रं पुस्तकात चितारलं आहे. असंच चित्र काही वर्षांपूर्वी रे कर्झवेल या माणसानंही काढलं होतं.यंत्रं आणि मानव यांचं एकीकरण होईल, माणूस चारशे ते एक हजार वर्षं जगेल असं कर्झवेल यांनी लिहिलं होतं. जेरेड डायमंड यांनी माणसाच्या वाटचालीचा मागोवा बंदूक, पोलाद आणि रोगजंतू या कसोक्यांवर घेणारं एक पुस्तक लिहिलं होतं. कर्झवेल किंवा हरारी ही माणसं एकाद्या क्षेत्रातली निष्णात आहेत आणि बाकीच्या क्षेत्रातली माहिती गोळा करून एक सम्यक चित्र उभारतात.

हे पुस्तक लेखकाच्या मते  तत्वचिंतनात्मक पुस्तक आहे. सुखाच्या शोधात, समाजाचं नियंत्रण करण्याच्या खटपटीत धर्म आणि अद्यात्म या दोन शाखा निर्माण झाल्या. लेखक म्हणतो की या दोनही शाखांचा उपयोग करून माणसानं संस्था, चौकटी निर्माण केल्या. बुद्धानं अद्यात्म सांगितलं, बुद्धाच्या अनुयायांनी त्याचा धर्म केला, यमनियम सांगितले. लेखक एका ठिकाणी झेनचं अवतरण देतो. झेन म्हणाला की वाटेत जर बुद्ध भेटला तर त्याला ठार करा. झेनला म्हणायचं असतं की रस्त्यात भेटणारा बुद्ध म्हणजे एक संस्थाच असेल.अद्यात्म हा व्यक्तीगत मुक्तीचा मार्ग असतो, ती सामुहीक संस्था वगैरे नाही असं झेन म्हणत होता. लेखक म्हणतो की धर्माची चौकट घालून वाट लावायची माणसाची सवय आजही जिवंत आहे, माणसानं  माहिती-माहिती तंत्रज्ञानाचा धर्म केलाय.

।।

हरारी यांनी डियसच्या आधी  सेपियन्स हे पुस्तक लिहिलं.

सेपियनमधे हरारी माणसाची तुलना वानराशी करतात.  ते म्हणतात आपण सुधारलेले किंवा बदललेले वानर आहोत.  सिंह आणि शार्कना जगण्यासाठी अधिकाधीक क्रूर व्हावं लागलं तसं वानरही म्हणजे आजचे वानर सभोवतालचं जग नष्ट करत चालले आहेत. बनाना रिपब्लिकमधे हुकूमशहा आपल्याला नको असलेली माणसं मारून टाकतो, त्या खटाटोपात बहुसंख्य समाजाला गरीब ठेवतो, समाजातली केळी आणि खनिजांसारखी संपत्ती निर्यात करून राज्य चालवत असतो. वानर आणि माणूस आज तेच करतोय असं हरारी सेपियन्स या पुस्तकात म्हणतात.

हरारी सेपियनबद्दल म्हणतात की ते पुस्तक म्हणजे माणसाचा इतिहास नाहीये, ते पुस्तक म्हणजे तत्वचिंतन आहे, फिलॉसफी आहे. माणसाच्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्या पुस्तकात केला आहे.

” मानवतेचं भविष्य काही चिमूटभर लोकांच्या हातात असणं ही गोष्ट मला चिंतेची वाटते. .. स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. माणसाला स्वातंत्र्य दिलंत  की तो समाजात अधिकाधीक विषमता निर्माण करत जातो.”

सेपियन्स हे पुस्तक खूप गाजलं होतं याचं एक कारण ते पुस्तक बराक ओबामानी वाचून त्याची प्रशंसा केली होती. झकरबर्गनही त्या पुस्तकाचं वर्णन आजचं सर्वश्रेष्ठ पुस्तक असं केलं होतं. त्यामुळं हरारी हे एकदम प्रकाशात आले. सोशल मिडियात त्यांना ३.८ कोटी अनुयायी मिळाले आणि आज जगभरच्या विश्वशाळात आणि शहरात ते भाषणं करत फिरतात. त्यांच्या या कीर्तीमुळंच डियस या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती, डियसच्या लक्षावधी प्रती खपल्या. सीएनेन, बीबीसीवर त्यांच्या पुस्तकाची चर्चा झाली, यु ट्यूबनं त्यांची भाषणं प्रसृत केली,ती भाषणंही लाखो लोकांनी पाहिली.

स्टीवन हॉकिंग यांचं ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम या पुस्तकानं प्रसिद्धीच्या वेळी नॉन फिक्शन पुस्तकाच्या खपाचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. आजही ते पुस्तक जोरात खपत असतं. गंमत म्हणजे हरारी यांच्या पुस्तकाचं नावही सेपियन्स ए ब्रीफ हिस्टरी ऑफ मॅनकाईंड असं आहे. हॉकिंगच्या पुस्तकाचा रेकॉर्ड ते किंवा नंतरचं पुस्तक मोडतंय का ते पहायचं.

एकूण मानवी इतिहासाचा धावता आढावा लेखकानं दोन्ही पुस्तकांत घेतला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, लोकशाही, आधुनिकता इत्यादी गोष्टी माणसानं विकसित केल्या असल्या तरी एकूणात माणूस निसर्गाचा नाश करण्याकडं, स्वनाशाकडं चालला आहे असं लेखक सुचवतो. पण हेही मान्य करतो की तसंच घडेल असं नाही.

अलिकडं पर्यावरणाचा विचार करणारे अनेक विचारवंत म्हणतात की जग आता विनाशाकडंच चाललं आहे, फक्त नेमका दिवस तेवढा माहित नाहीये. मागं वळताच येणार नाही अशा दिशेनं माणसानं वाटचाल केली आहे असं या विचारवंतांचं म्हणणं आहे. समजा माणसानं प्रजा वाढवणं बंद केलं, कार्बन हवेत सोडणं बंद केलं, घातक वायू उत्सर्जन बंद केलं, जैविक विविधता पुन्हा जागेवर आणण्याचा प्रयत्न केला तरीही आजवर केलेल्या चुकांमुळं जगरहाटीला जे वळण मिळालं आहे ते थांबणार नाही, फार तर परवाचं मरण तेरवावर टाकता येईल असं या काहीशा निराशावादी माणसांचं म्हणणं आहे.

हरारी निराशावादी नाहीत. परंतू कोंडी कशा रीतीनं फुटू शकेल याचा विचार हरारी मांडत नाहीत.

माणसाच्या मेंदूचा विकास झाला आणि माणूस प्रती जग निर्माण करू लागला. माणूस स्वतःचा देव होण्याच्या मागे लागला. विनाशाकडं जाण्याची शक्ती ज्या मेंदूनं माणसाला दिली तोच मेंदू अधिक समंजस, शहाणा होणारच नाही असं कां म्हणावं ? विनाश समोर दिसत असताना, विनाशाची कारणं दिसत असताना माणूस विनाश रोखण्याचा प्रयत्न करणारच नाही असं कां म्हणावं? १९४५ नंतर माणसानं अणुशस्त्रं वापरलेलं नाही. कदाचित असलेली अणुशस्त्रं नष्ट करणं, अणूचा वापर टाळणं याकडंही माणूस वळेल. सूर्य,वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा वेग यांचा वापर करून शुद्ध ऊर्जा माणूस वापरू शकेल.

युवाल हरारीनी मध्ययुगीन लष्करइतिहास या विषयावर पीएचडी केलीय. तोच विषय ते येरुसलेम विश्वशाळेत शिकवतात.

हरारे गे आहेत. हरारे शाकाहारी आहेत, प्राणी मारणं त्यांना मान्य नाही. हरारेनी पीएचडी करत असताना दोन महिने विपस्यना केली.

।।

Homo Deus. A Brief History of Tomorrow

Yuval Noah Harari

Vintage.

 

 

 

 

 

 

4 thoughts on “माणसाचा देव करण्याचा खटाटोप

  1. खूप चांगले प्रबोधन,वैश्विक पातळीवर मानवाचा इतिहास अचंबित करणारा आहे.

  2. On this EARTH, in the year 2010 (HUMAN) scientists have Created ‘SYNTHETIC LIFE’ from scratch and it has ROCKED the religious world, including from Dr. Harari’s Israel and his entire Jewish faith. Books such as this haven’t stopped scientists from creating healthy human parts in PETRI DISHES to replace genetically defective organs for a better life against all of the world’s religious scriptures and faiths (Almighty GOD spins our lives and he (sometimes SHE too as in our Hindu mythology) would take care of you against all odds)). Sure, all of this can get wiped out by a nuclear warfare but so can be ones’ life while innocently walking on the street sidewalks or a railway bridge -as an example.

    थोडक्यात, असली पुस्तके वाचणे हे जणूं मेंदूला ‘कल्हई’ लावल्याप्रमाणे असते, ‘तात्पुरता विरंगुळा’ आणि उच्यशिक्षित त्रयस्थाच्या विचारशक्तीमधून आपल्या ज्ञानात ‘क्षणिक भर’ -आठवड्याभरात कल्हई उडून जाईपर्यंत. …. भारतात असली पुस्तके वाचणार तरी कोण? राजकारण्यांपासून महाराजांची रोजची बुवाबाजी, त्यांचे एकाच माळेचे गरीब/श्रीमंत, सुशिक्षित/अशिक्षित कोट्यावधी भक्त व सर्वांची मिळून हजारांनी लफडी, यामध्ये इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे वाचन करण्यासाठी वेळ तरी कुणाला असतो? आणि सदर पुस्तक हे बिल गेट्स पासून ओबामांनी पुरस्कृत केल्याचे ऐकिवात आहे. …….. लेखकाच्या स्वतःच्या टिप्पणीशी मात्र पूर्णपणे सहमत!

  3. varil matashi mee sahamat aahe
    bharat ajun tari jagachyaa khup maage aahe aani
    dev hone aaplyaa dharmas maanya honare naahi
    m s tokekar pune

  4. Harari’s book ‘Homo Deus’ is a fact and our responses are just synthesis. I don’t find his overestimating opinions about human evolution and behaviour. A wise man, in fact curious man, can’t be away from this book, he will get this book anyhow and take the benefits of new words and knowledge.

    Our Indian people are really changing their mentality positively and expanding their reach at each corner of the world to touch each and every knowledge.

    Actually world really need this type of ideology to overcome from foolish religious mentality.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *