सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

लोकशाहीचा ताबा  सोशल मिडियानं घेतल्यासारखं दिसतय. अमेरिका,जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन  हे देश त्यांच्या सार्वजनिक जीवनात  सोशल मिडियानं घातलेल्या गोधळानं चिंतीत झालेत.

२०१६ ची अमेरिकेची  अध्यक्षीय निवडणुक.

प्रचार मोहिमेत भाषणं करकरून, तर कधी सर्दीमुळं हिलरी क्लिंटनचा घसा बसला होता. त्या खोकत होत्या. कधी काळी कुठल्या तरी कारणासाठी क्लिंटन तपासणीसाठी डॉक्टरांकडं गेल्या होत्या. डॉक्टरकडं जाणं आणि खोकल्याची दृश्यं या दोन एकमेकांशी संबंध नसलेल्या घटना एकत्र जोडून क्लिंटन  गंभीर आजारी आहेत, त्यांना मत देणं धोक्याचं आहे असा संदेश सोशल मिडियात ट्रंप मोहिमेनं पसरवला.

काळा माणूस गोळीबार करताना दाखवला. कपड्यांवरून मुसलमान आहे असं लक्षात यावं असा माणूस जाळपोळ करताना दाखवला. या चित्रांचे संदर्भ स्पष्ट न करता   ओबामानी कुठं नेऊन ठेवलाय अमेरिका अशा अर्थाचं उपशीर्षक दिलं.

असे अनेकानेक मुद्दे इंटरनेट, टीव्ही आणि सेल फोनवरून लोकांवर कोसळवण्यात आले. धूर येतोय त्या अर्थी नक्कीच कुठं तरी आग लागलीय अशा बातम्या   फॉक्स न्यूज या वाहिनीनं  केल्या आणि ट्रोलभैरव गोळा करून वाहिनीवर चर्चा घडवून आणल्या. अशी दृश्यं, जाहिराती आणि चर्चा दिवसाला  ५० ते ६० हजार इतक्या संख्येनं सोशल मिडियानं लोकांच्या डोक्यात घुसवल्या. कधी गंभीर आरोप, कधी संशय निर्माण करणं, कधी विनोदानं आणि थट्टेत बदनामी सुचवणं अशा अनेक रुपांमधे.

ट्रंप मोहिमेनं आणखी एक केलं.  जाहिरातीचा मारा करून लोकांच्या मनावर ठसवलं की बुद्दिमान माणसं, इंटलेक्चुअल,  बोगस असतात, ते नुसते शब्दांचे खेळ करून लोकांचा बुद्धीभ्रम करत असतात, ट्रंप म्हणतात तेच खरं.

क्लिंटन, ओबामा यांच्या विरोधात ट्रोलिंग करताना रशियन कंपन्यांनी दिलेली माहिती वापरली गेली. रशियानं पुढारी, पक्ष, कॉर्पोरेशन्स, डॉक्टर, विश्वशाळा इत्यादी ठिकाणच्या कंप्यूटरमधून माहिती चोरली, त्या माहितीला विकृत रूप दिलं, संदर्भ सोडून ती माहिती वापरली आणि ट्रंप प्रचारकांना पुरवली.

ट्रंप मोजक्या शब्दांचे एकतरफी आरोप करणारे ट्विट्स करत. ना त्यातल्या मजकुराचं स्पष्टीकरण, ना त्या आरोपांचे आधार. ट्विटोबा ट्रंप यांचा एकतरफी अल्पाक्षरी मारा. या ट्वीट्सचे असंख्य रीट्वीट्स.

असाच प्रचार रशियानं फ्रान्समधे केला.फ्रेंच अध्यक्षपदाची प्रचार मोहिम संपली. मतदान करेपर्यंत कोणीही उमेदवार जाहीरपणे कोणतंही वक्तव्य करू शकत नाही असा काळ सुरु झाला. नेमक्या त्या वेळी फ्रेंच माध्यमात एक बातमी रशियानं पेरली, व्हायरल केली. उमेदवार मॅक्रॉन यांचं एक बेकायदा खातं एका परदेशी बँकेत आहे आणि त्यात त्यांनी गोळा केलेली खूप बेकायदा संपत्ती साठवलेली आहे. गोची अशी की मॅक्रॉन काही बोलू शकत नव्हते. मत कोणाला द्यायचं ते नक्की न ठरलेल्या, मॅक्रॉनबद्दल शंका असलेल्या मतदारांवर या आयत्या वेळच्या माहितीचा परिणाम झाला.

जर्मनीच्या २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी इराक-सीरियामधून आलेल्या अरब स्थलांतरितांचा प्रश्न चर्चेत होता. मर्केल या स्थलांतरीतांना थारा देऊन जर्मनीचं नुकसान करत आहेत असं अनेक जर्मनांना वाटत होतं. रशियन ट्रोलरनी विविध ठिकाणच्या हिंसांची चित्रं संदर्भ सोडून मॉर्फ केली आणि बाहेरून आलेले सीरियन-मुसलमान जर्मनीत हिंसा माजवत आहेत असं माध्यमांत पेरलं.  बाहेरची मंडळी जर्मन संस्कृती  नष्ट करत आहेत, जर्मनीची सुरक्षितता  धोक्यात आली आहे असं सांगणाऱ्या क्लिप्स माध्यमांत पेरण्यात आल्या. गावोगाव इराकी-सीरीयन मंडळी गोंधळ घालत आहेत आणि मर्केल यांचं सरकार तिकडं डोळेझाक करत आहे असे संदेश पसरवण्यात आले. मर्केल यांची खूप मतं गेली, परद्वेषी उजव्या टोकाच्या पक्षाला खूप मतं आणि संसदेतल्या जागा मिळाल्या.

अमेरिकन माणूस दिवसातून २४०० वेळा   सेलफोनला स्पर्श करतो. माणसं काम करत असताना, प्रवासात, बाथरूममधे, डॉक्टरच्या बाकावर, हॉस्पिटलमधे, सेक्स आटोपल्यावर निर्माण होणाऱ्या काही सेकंदांच्या उसंतीत, शाळा कॉलेजच्या वर्गात, फेसबुक, व्हॉट्सएपवर असतात. इलाजच नाही म्हणून झोपतात. इलाजच नाही म्हणून तेवढ्यापुरती पोटापाण्याची कामं करतात.

अमेरिकन माणसांचा अटेंशन स्पॅन कमी झालाय. पुस्तकं वाचणं, गंभीर चर्चा करणं,  संदर्भ यासाठी त्यांच्याकडं वेळ नाहीये. टीव्हीवरचा प्रचार पाहून माणसं मतं तयार करतात.

मुबारक नालायक होते,भ्रष्ट होते हे तर खरंच.  लोकांचा तसा अनुभव असल्यानं सोशल मीडियातल्या माहितीमुळं  लोक रस्त्यावर गोळा झाले. त्यांनी मुबारकना सत्तेतून घालवलं.  मुबारक यांना घालवल्यावर येणारं सरकार कसं असेल, पर्यायी धोरणं कशी असतील, सरकार आणि अर्थव्यवस्था कशी चालेल याचा विचार रस्त्यावर गोळा झालेल्या लोकांनी केला नव्हता.  सोशल मिडियातले चार ओळींचे संदेश येवढंच ज्ञान त्या लोकांकडं होतं. वाचन, विचार, चर्चा, भावना दूर सारून निर्णय इत्यादी गोष्टींची सवय इजिप्तमधल्या लोकांमधे शिल्लक नव्हती.  हटाव या भावनात्मक आणि त्या वेळी योग्य असलेल्या मागणीभोवती करोडो लोक गोळा झाले. यथावकाश आंदोलन विरलं आणि मुबारक व त्यांचे लष्करी साथीदार पुन्हा सत्तापन्न झाले.

सोशल मिडिया अटळ आहे. सोशल मिडियाच्या मर्यादा आहेत. लोकांना गोळा करणं,  उत्तेजित करणं या माध्यमाला जमतं.   लोकांना विचार करायला लावणं या माध्यमातून शक्य होत नाही. समतोल, सर्व बाजूनी विचार करण्यासाठी इतर रुपाची माध्यमं वापरायला हवीत. सोशल मिडियात एकादी बातमी पसरली तर ती खरी आहे की खोटी, तिचा तपशील आणि संदर्भ तपासण्याची सोय आणि सवय असायला हवी. त्यासाठी समाजात गंभीर विचार करणारी वर्तमानपत्रं, नियतकालिकं, गंभीर वाहिन्या असायला हव्यात. अशी जोड मिळाली तरच सोशल मिडियाचा उथळपणा घातक होत नाही. अन्यथा अविचारी, दुष्ट, अज्ञानी, विकृत, स्वार्थानं प्रेरित, केवळ मौजमजा करणारी इत्यादी माणसं या माध्यमांचा वापर करू शकतात, करतात.

राजकीय पक्ष  सोशल मिडियाचा वापर करून लोकांना भुलवतात, भरकटवतात आणि स्वार्थ साधतात; विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता, इतरांचा आदर, इतरांसोबत नांदणं ही लोकशाहीची मूळ वैशिष्ट्यं  पायदळी तुडवतात, समाजाला समजावणं आणि शिकवणं याकडं  दुर्लक्ष करतात.

भारतात इंटरनेटचा वापर मर्यादित आहे. कंप्यूटर आणि लॅपटॉपचा उपयोग करणारी माणसं मर्यादित आहेत. अलीकडं सेल फोननं लोकांच्या नजरेचा आणि मेंदूचा ताबा घेतला आहे. सेलफोनचा वापर कामासाठी कमी,  रंजन-आंबटशोक यासाठी जास्त होतो. निवडणुकीत या वर्तणुकीचा वापर करून संदेशांचा प्रसार केला जातो. जाहीर सभा आणि अफवा हे माध्यम भारतात विकृत प्रचारासाठी वापरलं जातं. या दोन्ही पद्धतीनं लोकांमधे भ्रम पसरवला जातो. सरकार कोसळवण्यासाठी किंवा आणण्यासाठी संदर्भहीन, खोटे संदेश वारेमाप पसरवणं ही पद्धत लोकांचं लक्ष वेधून त्यांना मतदानापर्यंत गुंग ठेवण्भायासाठी भारतात वापरली जाते.

विचार करण्याइतपत वेळ बहुसंख्य सामान्य माणसांना नाही. तशी सवय भारतीय समाजात विकसित झालेली नाही.

२०१४ सालची निवडणुक केवळ एका माणसाभोवती फिरवण्यात आली, मोंदींभोवती. तिकडे ट्रंप इकडे मोदी. कार्यक्रम, व्यवस्थात्मक तरतुदी इत्यादी चर्चा नाही. एक माणूस.  देशातल्या सर्व प्रश्नांवर मोदी हे एकच उत्तर आहे असं प्रचंड पैसा वापरून लोकांच्या मनावर ठसवण्यात आलं.  गुजरातची आर्थिक घडी मोदींच्या कारकीर्दीत बसली होती, गुजरातची स्थिती इतर काही राज्यांच्या तुलनेत चांगली होती,   इतर काही  राज्यांच्या तुलनेत ती कमीही होती. सामाजिक कल्याण या कसोटीवर गुजरात बरंच मागं होतं. परंतू  मोदी आणि गुजरात म्हणजे काही तरी अद्भुत घडलंय अशा  प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला. भाजप विरोधक मुसलमानांचं लांगूलचालन करतात, हिंदूवर अन्याय करतात, देशद्रोही आहेत असा प्रचार झाला. मोदींच्या प्रचार मोहिमेत अनंत गोष्टी संदर्भहीन होत्या, उथळ होत्या, चुनावी जुमले होते. भाजप, काँग्रेस या पक्षांचे कार्यक्रम, त्यांच्या संघटना, त्याचे विचार, त्यांचा इतिहास, इत्यादी गोष्टीं प्रचार मोहिमेत चर्चिल्या गेल्या नाहीत. सारा मामला बहुतांशी मनोरंजनात्मक, भावनात्मक होता.

लोक काँग्रेसला कंटाळले होते, लोकांना बदल हवा होता. या वास्तवाशी मोदी प्रचाराची जोडी जमली.

१९७७ च्या निवडणुकीत जयप्रकाश नारायण आणि विरोधकांनी काँग्रेस विरोधाचा  धुरळा उडवला होता. जनता पक्ष धड अस्तित्वातही नव्हता त्यामुळं तो  लोकांचं भलं कसं करणार आहे ते कळायला मार्ग नव्हता. पण लोकांना काँग्रेसची सत्ता नको होती. जनता पक्ष म्हणजे काय याचा विचार न करता लोकांनी जनता पक्षाला भरघोस मतं दिली. त्यानंतर काय झालं तो आता इतिहास झाला आहे.

मोदी यांच्या कारकीर्दीचं मूल्यमापन व्हायला वेळ लागेल. मोंदींची कारकीर्द काँग्रेसपेक्षा काही मुद्द्यांवर चांगली ठरेलही. ट्रंपनी राज्यावर आल्यावर काहीही म्हणजे काहीही केलं नाही, फक्त ट्वीट्स केले. तरीही अमेरिकेची अर्थव्यवस्था ठीक चाललीय, कारण अमेरिकेतली अर्थव्यवस्था स्वतंत्रपणे चालते. नोटबंदी आणि जीएसटी हे वादग्रस्त उद्योग होऊनही वर्षभरानं भारताची अर्थव्यवस्था सावरेल, स्वतंत्र कारणांसाठी.

पण मुद्दा तो नाही. जगाची बदललेली स्थिती, नवं तंत्रज्ञान, सोशल मिडियाची शक्ती, माणसांची समतोल विचारांची क्षमता क्षीण होणं, बहुसंख्य लोकांनी फार विचार न करता निर्णय घेणं  हा मुद्दा आहे. समाजात झालेल्या या बदलांमुळं लोकशाहीचा पैस आकुंचित होतोय हा मुद्दा आहे.

माणसांना दररोजच्या जगण्याच्या धबडग्यात गुंतलेले असल्यानं  विचार करायला, अभ्यास करायला वेळ मिळत नाही. ही स्थिती १९४७ साली , १९७७ साली होती,  २०१७ सालीही आहे. माध्यमात झालेल्या क्रांतीकारक आणि प्रभावी बदलामुळं  विचारांच्या भानगडीत न पडणारी माणसं उथळ  प्रचारानं प्रभावित होऊन समाज घडवणाऱ्या प्रक्रियांमधे भाग घेत आहेत ही स्थिती चिंताजनक आहे.

।।

 

5 thoughts on “सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

  1. अगदी बरोबर समाज माध्यमांनी जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा आहे

  2. This has been an excellent analysis of worldwide situation that is GOVERNED by a variety of social media and major population believing in what they see and hear on their SMART gadgets while themselves mostly being IGNORANT. Add to that the new trend of sex scandles of entertainers, politicians and you name any from other catagories who’s famous in their eyes (not the intelligence), including me and they would see themselves in the green gossips hungry monster depicted in front of his laptop or the gentleman glued to the TV monitor. In my household, my homemaker wife sometimes forgets that we have to eat once in a while during the day -time permitting her other than seeing soap operas and constant barrage on TV’s various biased news channels who manage to get a bunch of (PAID) so called EXPERTS to shed their BULL …. to educate her and at the same time enlighten the thought provoking process that has no connection to a viewer’s education. Sir, I’m Glad that I could offer ‘few cents worth’ of my opinion on your excellent platform! Yes, now I can go back to fiddling with my smart gadgets and feast on watching them if there isn’t any professional football, basketball, golf etc on American TV . Thank goodness Cricket isn’t one of them!

  3. अतीशय संयतपणे केलेले हे लिखाण तेवढ्याच शांतपणे वाचले पाहिजे. सोशल मिडीयाचा वापर कशासाठी? यावर सातत्याने चर्चा झाल्या पाहिजेत. या माध्यमाची उपयुक्तता तटस्थपणे तपासण्याची वेळ आली आहे. जर ती वेळीच तपासली गेली नाही आणि याच्या सोबत वहावत जाणे चालू राहिले तर पुढचे चित्र अंधारमय दिसते. अतुल कुलकर्णी
    वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत, मुंबई
    ९८६७५२१०२२

  4. Dear Sir what you have written above is correct, however in context with India we need a autocratic person at top, we Indian’s are not fit for democracy, everyone has vested interest, and unfortunately day by day financial strength of common people is improving ( it is surly good), which is making personals more self-centric. I do not know nobody will like my above statement but unless it comes to U as person we are not bothered to see the problems at root,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *