एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.

एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.

एलिझाबेथ एकादशी.
एलिझाबेथ खरंच टिकाऊ आहे. खूप टिकेल. खूप लक्षात राहील.
कित्येक वर्षात इतका सुंदर मराठी चित्रपट पहायला मिळाला नव्हता.
पंढरपुरातली चार पाच छोटी मुलं. प्रत्येकाचं घर वेगळं, घरची माणसं वेगळी. प्रत्येकाच्या घरच्या समस्या वेगळ्या. मुलं आपलं लहानपण पुरेपूर जगत असताना आपल्या घरचा भार उचलण्याच्या खटपटीत. खट्याळ, वांड, अभ्यास करणारी आणि अभ्यास न आवडणारी मुलं. आपलं लहानपण जगत असतानाही मोठ्या माणसासारखी वागायचा प्रयत्न करणारी. मोठी माणसं जशी नसतात पण असायला हवीत तसं वागणारी. 
चित्रपट पंढरपूरच्या गर्दीत घेतला आहे. तिथली घरं, तिथली गटारं. तिथलं मंदीर.
 तिथली माणसं. भोळी. घसघशीत चांगली. बेरकी आणि लबाड.मेहनती. शिवराळ. ओबड धोबड. भाविक. घरासाठी हाडं घासणारी. बाप रे. काय माणसं. मुद्दाम त्यांची वर्णन करत नाही कारण ती सिनेमातच पहायला हवीत. 
पंढरपूर हे गाव अगदी अस्सल उभं केलेलं आहे. इतकं समर्पक चित्रण कित्येक दिवसात पहायला मिळालेलं नाही. चिंचोळी घरं. चिंचोळ्या गल्ल्या. अंधारी तीव्र चढ असणारे जिने. एकमेकाला लगटलेल्या दगडी इमारती. नळावरचं पाणी भरणं. हंडे दोन मजले चढून नेणं. त्यात वारकऱ्यांची गर्दी. त्यात ही पोरटी सारखी धावपळ करत असतात. कॅमेरा मुलांच्या मागून फिरतो, कधी समोरून येतो. सभोवताली गर्दी कॅमेऱ्यात पहात नाही, आपल्याच नादात वावरते. असं चित्रण, दिग्दर्शन आणि माणसं हाताळणं हे फारच कठीण काम आहे. 
आणि काम करणारी माणसं, मुलं. बापरे. काय अभिनय. पोरं इतकी गोड आणि ओबड धोबड, धडपडी. त्यांची सारी निरागसता त्यांच्या चेहऱ्यांत. त्यांचे कपडे. त्यांच्या चपला. मुलांच्या आईचं काम केलेली अभिनेत्री ग्रेट. कित्येक दिवसात असा अभिनय पाहिला नाही. घरमालकीण. आजी. काय पात्रं आहेत. पोरांच्या दुकानात बांगड्या घ्यायला येणारा एक हळवा माणूस.   बांगड्या विक्रेता दुकानदार. त्याचा आवाज. या साऱ्या कलाकार मंडळींना प्रेक्षक सरावलेले नाहीत. कारण कलाकारही सरावलेले नाहीत. अक्टींग ठोकण्यासाठी ती चित्रपटात वावरत नाहीत. ती नावाजलेली नाहीत, त्यामुळं त्यांच्यात  ‘ दिग्गज ‘ घुसलेले नाहीत. 
मराठी वाहिन्यांनी कृपा करून या कलाकारांच्या घाणेरड्या ओकाबोकी मुलाखतींचे प्रोमो छापून सिनेमाची वाट लावू नये.
सिनेमाची कथा जिनं  कोणी लिहीलीय ती अस्सल चांगली आहे. आपण काय करत आहोत त्याची जाणच लेखिकेला नाही. आधी कथा लिहीली गेलीय आणि नंतर आता जगानं पाहिल्यावर लेखिकेला कळेल की आपली कथा एक जागतीक दर्जाची कथा आहे, एक जागतीक दर्जाचा सिनेमा या कथेनं दिलाय.
मी कथा काय आहे ते मुद्दामच सांगत नाहीये. लोकानी ती आपणहून पाहिली पाहिजे. पण तरीही कथा, कथानक आणि चित्रपटाबद्दल बोललं पाहिजे. या कथानकाला एक खूप मोठं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्र आणि भारतातबद्दल कथा बोलते. समाजाबद्दल बोलते. आर्थिक, धार्मिक, सामाजिक वास्तवाबद्दल बोलते. पण अगदी हळुवार. कुठंही गोंगाट नाही. कुठंही कंठाळी स्वर नाही. कुठंही प्रतिकांचा भडीमार नाही. स्टेटमेंट वाऱ्याच्या झुळुकीसारखी येऊन जातात. कधी ही झुळूक गारसुखद असते. कधी ती गरमछळवादी असते. मराठी आणि भारतीय चित्रपटांना अशा हाताळणीची सवय नाही. गाणी न टाकता पटापट सिनेमा संपतो. एकही इशारा, एकही संदेश, एकही प्रवचन वगैरे न देता. 
मुलं काय धडपड करतात. काय बोलतात. आणि ते सारं मुद्दाम घुसडलेलं नाही.  लेखनात विचारवंत, सुधारक, प्रवचनकार, क्रांतीकारक वगैरे दडलेला नाही. माणसं जगत असतात. धडपडत असतात. त्यांची धडपड हेच सत्य. त्यातून अर्थ काढणं वगैरे उद्योग पत्रकार, लेखक, विचारवंत, समीक्षक इत्यादी व्यावसायिक करत असतात. चित्रपट किंवा साहित्यात जगणं असायला हवं, अर्थ वगैरे इतरांनी काढायचे असतात. भारतात बहुतेक लिखाणात, चित्रपटात जगणं कमी आणि संदेशच जास्त असतात. हे या सिनेमात टळलंय.

जागतीक सिनेमा पहाणाऱ्यांना माजीद मजिदीच्या चित्रपटाची आठवण होईल. त्याच्या चित्रपटाला ऑस्कर मिळालं होतं. एलिझाबेथ हा त्याच प्रतीचा सिनेमा आहे. माजिद मजिदीचे सिनेमे लोकांनी पािहले नसतील. हरकत नाही. हा सिनेमा पहावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *