कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.

कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.

कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.

केरळात कोचीमधे एक द्विवार्षिक प्रदर्शन नुकतंच पार पडलं. त्यात निर्वासित, स्थलांतरीत या विषयावर अनेक चित्रं, कविता, इन्सॉलेशन्स मांडली होती.

।।

समाजांना, देशांना सरहद्दी असतात. सरहद्दी लवचीक असतात, बाहेरच्या बाजूला त्या ताणल्या जाऊ शकतात. सरहद्दी सच्छिद्र असतात. नागरीक छिद्रातून बाहेर जाऊ शकतात, आत येऊ शकतात.

एके काळी साम्राज्यं असत, त्यांना सरहद्दी असत. सम्राट या सरहद्दी ओलाडून दुसऱ्या प्रदेशात घुसत. कोणाच्या लेखी ते आक्रमण असे तर कोणाच्या लेखी  साम्राज्यविस्तार.

साम्राज्य विलयाला गेल्यानंतर देश तयार झाले. देशांना सरहद्दी असतात.

येमेनची सरहद्द ओलांडून इराणी गनीम येमेनमधे घुसतात. रशियन सैनिक हद्द ओलांडून युक्रेन किंवा क्रिमियात घुसतात. अमेरिका इराकची किवा अफगाणिस्तानची हद्द ओलांडते.

भारताच्या हद्दीतल्या छिद्राचा उपयोग करून भारतीय माणसं अमेरिकन हद्दीचं छिद्र पार करुन अमेरिकेत जातात. भारतापेक्षा तिथं जास्त सुख मिळेल असं त्यांना वाटत असतं. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जर्मनीतले ज्यू जर्मन हद्द ओलाडून युरोपीय देशांच्या हद्दीत शिरले कारण जर्मनीत जगणं त्यांना अशक्य झालं होतं. आता इराक, सीरिया, येमेन इत्यादी देशातली माणसं आपापल्या हद्दी पार करून युरोपीय देशांत जात आहेत.

माणसं एका देशातून दुसऱ्या देशात सुखासुखी जात नसतात. जिथं जन्मापासून वाढलो तो गाव कोणत्याही कारणानं सोडून जाणं माणसाला सुखाचं नसतं.

स्थळांतर म्हणजे हद्दी ओलाडून जाणं. गावाची हद्द, राज्याची हद्द, देशाची हद्द, साम्राज्याची हद्द. स्थळांतरीत नकाशातल्या हद्दरेषा ओलांडतात. आक्रमक सैन्य नकाशातली रेषा ढकलतो. क्रांतीकारक नकाशातले रंग बदलतात. निर्वासित नकाशा गुंडाळून ठेवतात.  भटक्यांना तर नकाशेच नसतात.

” आपण अनेक राज्यांत, देशात इतकंच, अनेक खंडांत फिरतो. पण सतत आपला प्रयत्न असतो आपली संस्कृती जपण्याचा. जिथं जातो तिथं मिसळण्याची, तिथं फिट होण्याची गरज असते आपली. तरीही आपण विसरू शकत नाही की आपण कुठून आलोय. ”

हे शब्द आहेत अबीर कर्माकर याचे. केरळात कोचीमधे भरलेल्या द्विवार्षिक   प्रदर्शनामधे बडोद्यातल्या अबीरनं एक इन्स्टॉलेशन केलं होतं. त्यात चित्रं आणि वस्तूंच्या मांडणीतून अबीरनं त्याच्या आठवणीतलं कच्छमधलं घर दाखवली होती. पडदे, बाकं, खच्चून भरलेलं सामान, सामानाच्या बॅगा, स्वयंपाक घरातली पडताळं व त्यातली भांडी इत्यादी इत्यादी.

अबीरचे आजोबा वाढले चटगावमधे, म्हणजे आजच्या बांगला देशात. नंतर लखनऊमधे गेले आणि नंतर सिलिगुडीमधे. सिलिगुडीत अबीर जन्मला. नंतर अबीरचे वडील भूजमधे पोचले. अबीर भूजमधे वाढला. आता अबीर बडोद्यात रहातो. चटगाव, लखनऊ, सिलिगुडी या गोष्टी त्याच्या लेखी ऐकीव आहेत. त्याच्या नसांत भिनलय भूज.   त्याच्या मनात वास करून आहे भूजमधलं त्याचं घर. त्याच्या डोक्यात पक्कं रुतलंय. काही केल्या ते त्याच्या डोक्यातून जात नाही. ते त्याच्या चित्रांत, इन्स्टॉलेशन्समधे सतत येत रहातं.

केरळी कवी पी. सच्चिदानंदन हे आनंद या नावानं ओळखले जातात. आनंद यांचं लहानपण केरळात गेलं.  ते कामाधामाच्या नादात मुंबईत गेले आणि नंतर कलकत्त्यात स्थाईक झाले. ते कायम स्थलांतरितच राहिले.  नाना कारणांसाठी होणारी स्थलांतरं हा विषय त्यांना कायम छळत असतो. म्हणूनच फाळणी अनुभवलेली नसली तरी त्यांना फाळणी हा विषय फार सलत रहातो.

आनंद यांची पुस्तकं, शिल्पं आणि इन्स्टॉलेशन्स कोचीतील प्रदर्शनांत मांडली गेली होती. एक शिल्प त्यांनी मातीपासून तयार केलेलं होतं. गांडुळानी तयार केलेली माती. गांडुळं बिळं करतांना जमीन उकरून माती बाहेर टाकतात. घरं कशी करायची ते गांडुंळांकडून शिकावं असं आनंद म्हणतात. स्थलांतरित गांडुळं.

कवि हसन मुजतबा याचा जन्म सिंध प्रांतातला. झिया उल हक यांनी पाकिस्तानचा राज्यकारभार हाती घेतला आणि सिंधवर सूड उगवायला सुरवात केली. सिंधवरच नव्हे, माणुसकीवरच. शरिया लागू केला, कलाविष्कारावर बंधनं आणली. सिंधमधे बेधडक माणसं मारली जात होती. मुजतबा लहानपणीच पळाला आणि मजल दरमजल करत न्यू यॉर्कमधे पोचला.

जवळपास तशीच स्थिती होती चित्रकार सलमान तुर याची. सलमान लाहोरचा, तिथं त्याचा  स्टुडियो होता. पाकिस्तान सरकारला चित्रकला मंजूर नव्हती. सृष्टी निर्मितीचा एकाधिकार फक्त देवानाच होता, सृष्टीतली पानं फुलं असोत की प्राणी की माणसं, त्यांची चित्रं काढणं म्हणजे देवाचा अधिकार हिसकून घेणं असं इस्लामला वाटत होतं. सलमानला चित्रं काढाला परवानगी नव्हती.  तोही मजल दर मजल करत न्यू यॉर्कमधे पोचला.

कधी तरी सलमान आणि हसन भेटले. हसनच्या स्वप्नात त्याचं सिंध येत असे आणि सलमानच्या स्वप्नात लाहोर. मनानं दोघे पाकिस्तानात होते. पुन्हा आपल्या गावात जावं असं दोघानाही वाटत असे. ते तर शक्यच नव्हतं. कवि आणि चित्रकाराना जेवढं स्वातंत्र्य अमेरिकेत होतं तेवढं पाकिस्तानात नव्हतं. दोघं जगत होते अमेरिकन संस्कृती पण त्यांच्या नसात होती पाकिस्तानी संस्कृती. दोन्हींचं मिश्रण जगायचा प्रयत्न दोघे करत आहेत. त्यांची ओढाताण कोचीतल्या प्रदर्शनात पहायला मिळाली. हसनच्या कवितांवर सलमाननं चित्रं काढली. त्याच्या चित्रांत पाकिस्तान आणि अमेरिका दोन्ही दिसतात. चित्रात एकच पाय असलेला माणूस सतत दिसतो.

सायरस नमाझी. इराणमधल्या शिराझ या गावातला. १९७८ मधे खोमेनी यांनी सत्ता काबीज केली. खोमेनींचा इस्लाम मान्य करा नाही तर नाहिसे व्हा. सायरसचं कुटुंब बहाई श्रद्धा जपणारं होतं. खोमेनींच्या मुजाहिदांनी सायरसचं शिराझमधलं घर उध्वस्थ केलं. सायरसचं कुटुंब हालअपेष्टा सहन करत करत शेवटी स्वीडनमधे पोचलं. सायरस  स्वीडनमधे स्थायिक झालाय.

सायरस नमाझीनं कोचीमधे त्याच्या मनात खोलवर रुतून बसलेलं घर जसं होतं तसं  इन्स्टॉलेशमधे मांडलं, एक व्हिडियोही त्या इन्स्टॉलेशनमधे सामिल केला. घर, अंगण. समोर पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्या आपल्याला एका दिवाणखान्यात घेऊन जातात लालकाळ्या गालिचावरून. घरात असतात बाकं. खुर्च्या. एक जुना फ्रीज. भिंतीवर सायरसचे आई वडील आणि भावंडं यांची चित्रं.

चिली या देशातले कवि राहुल झरिटा यांनी एक इन्स्टॉलेशन मांडलं होतं. एक हॉल होता, एक दालन होतं. दालनात पाऊल बुडेल इतकं खोल पाणी. प्रेक्षकाला हे पाणी तुडवतच दालनात फिरावं लागलं. भिंतींवर होती चित्रं आणि चित्रांच्या खाली लिहिलं होतं – वेदना सागर. वेदनांचा समुद्र. एका ठिकाणी भिंतीवर एक प्रश्न लिहिला होता. ” तुम्ही ऐकताय/ तुम्हाला ऐकू येतायत वेदना/ या वेदना सागरातल्या.”

प्रेक्षक पाणी तुडवत, भिंतीवरची चित्रं आणि शब्द वाचत वाचत पुढं सरकत. टोकाला जात तेव्हां तिथं लिहिलेलं असे ” हे प्रदर्शन आयलान कुर्डी, त्याचा भाऊ आणि त्याची आई यांना समर्पित केलंय. सिरियातून ग्रीसला जाण्याच्या समुद्री खटाटोपात हे तिघं बुडाले.”

पुढं वाचायला मिळते झरिटा यांची कविता. कवितेत झरिटा म्हणतात की ही कविता वेदना आणि प्रेमाची कविता आहे.

” अनेक सिरियन निर्वासित होत होत नाहिसे झाले, त्यांची छायाचित्रं कोणी काढू शकलं नाही, प्रसिद्ध करू शकलं नाही. जे दिसतं त्या पेक्षा न दिसलेलं किती तरी अधिक आहे. कारण कित्येक गोष्टी आपल्याला पहायच्याच नाहियेत. ही आहे क्षुब्ध वेळ, हा काळ आहे संकटांनी भरलेला.”

कवि आनंद म्हणतात ” निर्वासिताला फक्त माहित असतं की तो कुठून आलाय.   तो कुठं जाण्यासाठी पळतोय ते त्याच्या ध्यानात नसतं.”

।।

 

 

2 thoughts on “कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.

  1. नुकतंच सीरियन मायभूमी जन्मलेल्या एका निर्वासितांच्या इंग्लंडमध्ये जन्म झालेल्या मुलाने मँचेस्टर येथील एका गाण्याच्या कार्यक्रमात पाईप बॉम्ब उडवून बावीस निरपराध लहानमोठ्या नागरिकांचे प्राण घेतले -स्वतः आत्महत्या करून. त्याबद्दल प्रशिक्षण सिरीयात जाऊन घेतल्याचे उघडकीस आलेले आहे -म्हणजे स्वतःच्या “संस्कृतीस उजाळा देऊन”. मुंबईत बिहारममधील भय्ये आणि भारतातील इतर राज्यांतून आलेले परप्रांतीय यांनी ‘महाराष्ट्रातून चालते व्हा’ -अश्या बातम्या व फोटो वर्तमानपत्रांतून रोजचे रतीब लावून असतात. असे असतांना सदर लेखात पाकिस्तानी संस्कृतीतून वाढलेले परंतु भारतात जन्म घेऊन परदेशात असणारे ‘संवेदनशील कवी आणि चित्रकार’ यांचे प्रदर्शनातील ‘कवतिक’ व त्याबद्दलची रसभरीत प्रस्तावना इत्यादी वास्तव दुर्लक्षित केल्याप्रमाणे भासली. सध्याचा काळ साहित्यातून जगण्याचा उरलेला नाही -इथे दुर्लक्ष केले म्हणजे झाले?

  2. फार छान .निर्वासितांच्या वेदना आपल्या शब्दातून अनुभवल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *