वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

तीही एक गंमतच. परुळकर नावाचा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर आपणहून आला.

पक्षी टेबलावर येणं ही माणूस ‘ चे संपादक श्री.ग.माजगावकर यांची वाकलकब. ते म्हणत की लेख आणि लिहिणारी माणसं हे पक्षी त्यांच्या   टेबलावर आपणहून येऊन बसतात.

विजय परुळकर हा पक्षी माजगावकरांच्या टेबलावर एके दिवशी आला.

परुळकर हे  व्हिडियोग्राफर, परदेशात काम करत असत. ते देशात परतले. पुण्यात बानू कोयाजी यांच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमामधे ते फिल्म्स करत असत. ते ‘ माणूस ‘ वाचत असत. ‘ माणूस ‘ मधे येणारा मजकूर वेगळा असतो,   वर्तमानपत्रांत ज्या विषयावर सविस्तर माहिती दिली जात नाही ती माहिती माणूस देत असे असं विजय परुळकरांना वाटत असे. म्हणूनच ते माजगावकरांकडं आले. म्हणाले – कुटुंब नियोजन या महत्वाच्या विषयावर वर्तमानपत्रं लिहीत नाहीत. बानू कोयाजी यांच्या कामावर माणूसनं मजकूर छापावा.

माजगावकर त्याना म्हणाले ‘ अरे, मग तूच कां लिहीत नाहीस.’

‘ छे हो. मी कसला लिहितोय. मी फोटोग्राफर. मला फोटो काढायला सांगा. लिहिणं हे माझं काम नाही, मी कधीही लिहिलेलं नाहीये.’ परुळेकर म्हणाले.

‘ त्यात काय आहे. तू बानू कोयाजींबरोबर हिंडतोस. अनेक स्त्रियांना भेटतोस. त्यांचं म्हणणं तुझ्या कानावर येत असतं. तू खूप पहातोस. बस. ते लिहून काढायचं.’ माजगावकर.

परूळकर उत्साही माणूस. आहे काय न् नाही काय.  परूळकरांनी लिहून काढलं. “मोडकं तोडकं”. माजगाकरांनी ते दुरुस्त केलं. परिवार नियोजनाचं काम किती कठीण असतं, ते किती आवश्यक आहे वगैरे गोष्टी परूळकरांच्या लेखांमुळं वाचकांसमोर आल्या. एक वेगळं क्षेत्रं वाचकांसमोर मोकळं झालं.

परुळकर माजगावकरांना वारंवार भेटत. त्यांच्याजवळ जे काही होतं ते सारं  धडाधड माजगावकरांसमोर उलगडत. काहीही लपवून ठेवलं नाही. त्यांचे अनुभव, त्यांचा स्वभाव, त्यांचं संबंधित विषयाबद्दलचं ज्ञान आणि माहिती.  परूळकर पुस्तकी नव्हते, अकॅडमिक नव्हते. पुस्तकांतून जग समजून घेत नव्हते.  याच गोष्टीबद्दल माजगावकरांना आकर्षण होतं.

शरद जोशी आणि त्यांचं शेतकरी आंदोलन हे पक्षीही माजगावगरांच्या टेबलावर आले. कदाचित ते परुळकर या पक्षाचा माग घेत माजगावकरांकडं पोचले असावेत.  परूळकर भारतात परत आले त्याच्या आसपास शरद जोशीही आपली स्वित्झर्लंडमधील नोकरी सोडून शेतीचा अभ्यास करायला परत आले. शेतीचा अभ्यास जसा पुस्तकातून करता येतो तसाच शेती करून, शेत ते बाजार या शेतलमाच्या प्रवासाचा अनुभव घेऊनही करता येतो. शरद जोशींनी प्रत्यक्ष शेती करण्याचा  मार्ग पत्करला.

शेतीप्रधान देशात शेतकरी देशोधडीला लागतो, देशात अन्न टंचाई निर्माण होते, दुष्काळ होतात या जटील आणि दाहक प्रश्नाला शरद जोशी भिडत होते. माजगावकरांना शरद जोशी या व्यक्तीमधे कार्यकर्ता दिसला, जमिनीवर काम करणारा माणूस दिसला.

शरद जोशींचं आंदोलन धगधगू लागलं. त्याच काळात शेतीविकास, ग्रामविकास या विषयावर श्रीग माजगावकर चिंतनमग्न होते. व्यक्ती म्हणून आणि संपादक म्हणून. शेतीअर्थशास्त्राचा अभ्यास करणारे डॉ. व. द. देशपांडे आणि स.ह.देशपांडे यांच्याशी माजगावकरांच्या  चर्चा झडत असत. सैद्धांतिक अभ्यासाच्या बाजूनं जगात कोणता विचार चाललाय याचा मागोवा श्रीग घेत होते. दैनिकांमधे, चाकोरीतल्या वर्तमानपत्रांत ज्या रीतीनं शरद जोशींच्या आंदोलनावर लिहिलं जात असे त्या पेक्षा वेगळं माजगावकरांना हवं होतं.

माजगावकरांना याच वाटेबद्दल आकर्षण होतं. ‘ माणूस ‘ मधे थेट जमिनीवरच्या गोष्टी याव्यात, जमिनीवरची माणसं यावीत, जमिनीवरचं वास्तव यावं असं माजगावकारांना वाटत असे.  माजगावकरांचा पिंड कार्यकर्त्याचा. कामाची पद्धत कार्यकर्त्याची अभिव्यक्ती पत्रकारीची. माजगावकर वाचत असत. सर्व विषयावर वाचत असत. त्यांचा रा.स्व.संघाशी संबंध होता. त्यांच्या निकटची माणसं सांगतात की ते संघाच्या शाखेवर फारसे जात नसत. संघातल्या काही विचाराचं त्यांना काळानुरुप आकर्षण असावं. त्यांना अधिक आस्था होती ती स्वातंत्र्यवीर सावकरांच्या विचारांची. माजगावकरांचं विचार करणं आणि व्यक्त होणं या  घटकांच्या मिश्रणातून तयार झालं होतं.

एके दिवशी माजगावकरांनी स्कूटर काढली. पाठीमागं परुळकरांना बसवलं. दोघं शरद जोशीकडं आंबेठाणला पोचले. तिथं तिघांची चर्चा. शेतीचा एकेक भाग पिंजून काढणारी.

श्रीग परुळकरांना म्हणाले ” लिहून काढ. शेतकरी आंदोलन हा विषय. आंदोलन तुला जसं दिसतय ते लिहून काढ. तुला वाटतंय तेही लिहून काढ.”

परूळकर मनस्वी माणूस होता. एकाद्या गोष्टीवर प्रेम करायचं तर ते सर्वस्व अर्पण करून. परुळकर शेतकरी आंदोलनमय झाले होते. परूळकरांच्या बोलण्यात एक आवेग असे. तोच माजगावकरांना आवडत होता, हवा होता.

” तू लिही. पुढचं मी पहातो. ” माजगावकारंनी सांगितलं.

परुळकरांनी लिहून काढलं.  मळेकर वाड्यातल्या ‘ माणूस ‘ च्या कचेरीत माजगावकरांची नित्याची बैठक सुरु होई तेव्हां परुळकरांचा मजकूर त्यांच्या टेबलावर असे. बैठकीत  विद्याधर पुंडलीक असत, दिबा मोकाशी असत, दिवी गोखले असत. शेतकरी आंदोलनाची अनेक अंगं या बैठकीत पिंजून निघत.

परुळकरांचे लेख तयार झाले. माजगावकरांनी मजकुराला शीर्षक दिलं- योद्धा शेतकरी.

जुन्या मळेकर वाड्यात  ‘ माणूस ‘ चं ऑफिस होतं. एक मोठा हॉल. एका कोपऱ्यात माजगावकर बसत. तिथं त्यांना भेटायला अनेक माणसं येत.  मामला मोकळा ढाकळा. केबिन्स नाहीत. वाटेत सेक्रेटरी वगैरेंचा अडथळा नाही.  संपादक थेट दिसत, संपादकांना थेट अक्सेस.

माजगावकर सकाळी साडेनऊला येत. दुपारी जेवण आणि विश्रांतीसाठी घरी जात आणि साडेतीन वाजता पुन्हा येत. हिरव्या रंगाच्या स्कूटरवरून. कधी चालतही.

लेखक दि.बा.मोकाशी माजगावरकांच्या नित्याच्या बैठकीत असत. एकदा संध्याकाळी माजगावर-मोकाशी गप्पा मारत होते. मोकाशी पुण्यातल्या गंमती सांगत होते. माजगावकर त्यांना म्हणाले ‘हेच लिहा.’ त्यातून संध्याकाळचं पुणं हे सदर सुरु झालं.

प्रतिभा रानडे अशाच एके दिवशी माणूसमधे पोचल्या. लिहायची हौस होती, अनुभव नव्हता. माणूसमधे आपलं लिखाण यावं अशी इच्छा होती. माजगावकरांनी गप्पा केल्या. प्रतिभाताई कसं आणि काय लिहू शकतील याचा अंदाज घेतला. त्याना लिहितं केलं. अगदी तसंच वीणा गवाणकर यांच्या बाबतीत घडल. वीणाताईनी कार्वरची गोष्ट माजगावकरांना सांगितली. गोष्टीतली ताकद माजगावकरांनी जोखली. वीणाताईंना त्यांनी भरपूर, मनापासून लिहायला सांगितलं. त्यातून दिवाळी अंकाची कव्हर स्टोरी झाली आणि नंतर पुस्तकंही झालं.

बहुतेक वेळा माजगावकर लेखकांवरच सोडून देत असत, तुमचं तुम्ही लिहा असं म्हणत. कित्येक वेळा काय होई की लेखक तोंडी जे सांगे ते त्यांच्या लेखनात येत नसे. लिखाण कोरडं होई, त्यात भावना नसत.  माजगावकर तिकडं लेखकाचं लक्ष वेधत आणि लेखन अधिक रससशीत करायला सांगत. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर ते लेखन अधिक टोकदार करायला सांगत. कधी लेखकाला जमत नसे. तरीही शेवटी जे उरत असे ते माजगावकर प्रसिद्ध करत.

सतीश कामत हे माजगावकरांचे सहकारी. ‘ माणूस ‘ मधे दाखल झाले तेव्हां नवखे होते. त्या वेळी अंतुले मुख्यमंत्री झाले होते. वसंत दादा पाटील यांना शह देण्याची ती खेळी इंदिरा गांधींची खेळी होती. महाराष्ट्राच्या राजकारणात फार दूरगामी बदल होऊ घातले होते. माजगावकरांनी सतीश कामतांना  असाइनमेंट दिली. सांगली-सातारा विभागात आठ दिवस फिरायचं. तिथल्या सामान्य लोकांना, काँग्रेस पक्षातल्या लोकांना भेटायचं. त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्यावर लिहायचं.

सतीश कामत म्हणतात ” मी जरा हबकलो होतो.  रीपोर्टिंग करायला नुकतीच सुरवात केली होती आणि असा गंभीर, गुंत्याचा विषय माजगावकारांनी माझ्यावर सोपवला होता. …मी दुपारच्या बसनं सांगलीला जायच्या तयारीत होतो. येवढ्यात बातमी आली. संजय गांधी यांचं विमानाच्या अपघातात मरण झालं होतं. माजगावकरांनी मला थोपवलं. म्हणाले की महत्वाची घटना आहे. तू सांगलीचं रद्द कर आणि दुपारच्या झेलमनं दिल्लीला जा. तिथं तुला अशोक जैनची मदत होईल. तिथल्या पुढाऱ्यांना भेट. आपण फोनवरून बोलत राहू. मी दिल्लीला सुटलो.”

कामत यांनी अशोक जैन यांची मदत घेऊन  यशवंतराव चव्हाण, मधू दंडवते, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटी घेतल्या. माजगावकर पुण्याहून फोनवर बोलत होते, सूचना करत होते. कामत पुण्याला परतले, लगोलग लिहिलं. त्यातून एक अंक तयार झाला.

” अंक छापून झाल्यावर मी माजगावकरांना विचारलं की आमच्यासारख्या नवशिक्यांवर त्यांनी इतका विश्वास कसा काय ठेवला.माजगावकर म्हणाले –   अरे शेवटी तुमच्यावरही एक दडपण येतंच. आपण विषय करायला घेतलाय, त्यावर वेळ आणि पैसा खर्च होतोय, विषय नीट झाला नाही तर वाचक आपल्यालाच नावं ठेवतील. या दडपणाखाली माणूस मेहनत करतोच, आपापल्या व्यक्तिमत्वानुसार मजकूर तयार करतोच.”

केरळात मार्क्सवादी आणि संघवाले यांच्यात तुंबळ युद्ध चाललं होतं. अगदी खरोखरच्या मारामाऱ्या, एकमेकांच्या कार्यालयांवर हल्ले. माजगावकरांनी सतीश कामत  आणि विनय हर्डीकरना केरळात पाठवलं. हर्डीकर संघाच्या विचारांचे. कामतांना संघाची अलर्जी होती.दोघे हिंडले.  मुलाखती घेतल्या. पहिला खर्डा कामत लिहीत. मुलाखतींच्या बाबतीत मतभेदाला किंवा वादाला वाव नसे. तो भाग सटकन फायनल  होई. त्यांची  इंप्रेशन्स सत्यावर आधारलेली असल्यानं त्यावरही वाद नसे. जेव्हां   इंटरप्रिटेशेनचा संबंध येई तेव्हां वाद होत असत. दोघांनी आपापलं म्हणणं मांडलं.  नंतर माजगावरांनी त्यावर हात फिरवला. दहा लेख प्रसिद्ध झाले.  लेखमाला गाजली. एक नवाच विषय वाचकांसमोर आला.

बंगालमधे मार्क्सवादी पक्षाचं राज्य आलं. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या विचारधारेनं लोकशाही पद्धतीनं निवडणुक लढवून लोकशाही  राजकारण करायला सुरवात केली. छाया दातार मार्क्सवादी विचारांच्या. माजगावकर त्यांना म्हणाले- तू मार्क्सवादी ना, मग तूच बंगालमधे जा आणि वार्तापत्रं लिही.

माजगावकरांनी शिरीष सहस्रबुद्धे आणि चंद्रकांत पुरंदरेंना हैदराबादला पाठवून तिथल्या नक्षल चळवळीवर लिहायला सांगितलं. दोघेही व्यावसायिक पत्रकार नव्हते, नवशिके होते. त्यांच्या प्रामाणीकपणावर माजगावकरांचा भरवसा होता. नक्षलवादाच्या शोधात अशी लेखमाला त्यातून साकार झाली. गाजली.

माजगावकर  आणीबाणी विरोधी होते. त्यांनी सत्याग्रह केला. ते माणूसच्या अंकातून बोचरा मजकूर प्रसिद्ध करून  माणूस बंद होण्याचा धोका पत्करत होते. आर डॉक्युमेंट या उघडपणे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या कादंबरीचा अनुवाद माजवकरांनी छापला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीला त्यांचा पाठिंबा होता, वार्तांकनातून तो पाठिंबा व्यक्त होत असे.

माजगावकरांची इंदिराजींशी लव हेट रिलेशनशिप होती. राजकारण मान्य नव्हतं पण त्यांच्या क्षमतेबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल आदर होता. माजगावकर फक्त दोनच स्त्रियांचा उल्लेख वाघीण अशा शब्दात करत असत. इंदिरा गांधी आणि किशोरी आमोणकर.  १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर माजगावकर आणि कुमार केतकर यांनी इंदिरा गांधींची दीर्घ मुलाखत दिल्लीत जाऊन घेतली, माणूसमधे प्रसिद्ध केली. निवडणुकीत हरल्यानंतर इंदिरा गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शिरूरला त्यांची सभा होती. माजगावकरांनी सतीश कामत यांना ती सभा कव्हर करायला पाठवलं. सभेला पन्नासही लोक नव्हते. सतीश कामतांनी बातमीपत्र लिहिलं, सूर टिंगलीचा होता.

माजगावकर कामतांना म्हणाले ‘ मोठ्या माणसाबद्दल असं टिंगलवजा लिहू नये.इंदिरा गांधी सत्वसंपन्न बाई आहे. लढाऊ आहे. ती लढेल, पुन्हा सत्तेमधे परतेल. बघच.’

छचोरपणा, उथळपणा, विनाकारण सनसनाटी निर्माण करणं, टिंगल टवाळी, खोटी टीका किंवा भावूक स्तुती यांना माजगावकरांकडं वाव नव्हता. वाचकांना सारे तपशील आणि कंगोरे कळावेत यासाठी मजकुराची लांबी पुरेशी आणि भरपूर ठेवलेली असे. कित्येक वेळा पूर्ण अंक एकाद्या विषयाला वाहिलेला असे.

माजगावकरांना अकॅडमिक पद्धतीच्या चर्चांत रस नव्हता. सामान्य माणसाला समजेल अशा रीतीनं, सामान्य माणसाच्या बाजूनं त्यांना विषय मांडायचे असत. गहन गंभीर  विषय मांडण्याची एक रीत इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली या साप्ताहिकानं रूढ केली होती. त्यात रकाने असत, रकान्यात आकडेवारी असे. गणित आणि संख्याशास्त्राचा वापर केलेला असे. ग्रीक अक्षरांचा वापर करून संख्या शास्त्राचे निष्कर्ष त्यात काढलेले असत. इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकलीचा एक स्वतंत्र वाचकवर्ग होता. त्यातल्या मजकुराचा एक  डावा कल होता. तरीही त्यातल्या गंभीर आणि शास्त्रशुद्ध मांडणीमुळं सगळ्या रंगांचे वाचक ते साप्ताहिक वाचत. विशेषतः शिक्षक, अभ्यासक. वर्तमानपत्रांतून  स्तंभ लेखन करणारी मंडळी मुद्दाम वीकली वाचत. माजगावकरांच्याही वाचनात ते साप्ताहिक असे. पण माजगावकरांनी वेगळा वाचक वर्ग निवडला होता, एक वेगळा वाचक वर्ग तयार केला होता. वीकलीमधे येणारेच विषय पण वेगळ्या रीतीनं मांडणं. वार्ताहर पाठवून तो विषय विकसित करणं. लोकांशी, विचारवंतांशी आणि नेत्यांशी बोलून विषय विकसित करणं. सामान्य माणसाचे अनुभव, त्याच्यावरचे प्रभाव, त्याचे अनुभव वार्ताहरानं संकलित करून मांडायचे.

पारधी समाज विकसित करण्यात गुंतलेले   गिरीष प्रभुणे एके काळी माणूस साप्ताहिकात लिहीत होते.

” मी सातवी आठवीत असतानाच (१९६४-६५) माणूस या साप्ताहिकाचा प्रभाव माझ्यावर आणि आमच्या वर्गातल्या मुलांवर होता. पाडळी गावच्या  शाळेत माणूसची एक प्रत येत असे. आम्हाला राऊत आणि माळी असे दोन शिक्षक होते. ते माणूसच्या अंकातल्या लेखमाला वर्गात वाचून दाखवत. नाझी भस्मासुराचा उदयास्त ही अख्खी लेखमाला आम्ही त्यांच्याकडून ऐकली. ते शिक्षक लेख वाचत असताना स्वतःच्या पदरची माहिती त्यात मिसळून लेखमाला रंगवत असत. वर्ग भारलेला असे…..

…. माणूसमधे सिनेमा, नाटकं, राजकारण इत्यादी विषयांवर मजकूर असे. मला वाटे की आपणही लिहावं, असंच लिहावं. मी लाटाखालील पाणी नावाची एक कादंबरी लिहिली. नववीत. माझ्या बालपणीतल्या अनुभवावरून. साताऱ्याला येण्याच्या आधी आम्ही कोकणात, चिपळूणला होतो. कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमीन मिळत नव्हती. त्यांचं पुनर्वसन होत नव्हतं. त्यांची हलाखी आणि स्थिती या कादंबरीत होती. शरच्चंद्र चटर्जींच्या श्रीकांत या कादंबरीचा प्रभाव या कादंबरीवर होता. ती कादंबरी ‘ माणूस ‘ मधे प्रसिद्ध व्हावं असं मला वाटत असे. माजगावकरांशी बोलावं असं मला वाटत असे. पण बराच काळ ते जमलं नाही. ”

१९८०-८१ च्या काळात प्रभुणेंचा  ‘ माणूस’ शी संपर्क झाला. ‘ माणूस ‘   महानगर विशेषांक काढत होतं. विशेषांकासाठी लेखक, जाहिराती गोळा करण्यासाठी वंदना माजगावकर पिंपरी-चिंचवड भागात फिरत होत्या. लोकांनी गिरीषचा रेफरन्स दिला. एक धडपड्या माणूस असिधारा नावाचं नियतकालिक चालवतो, त्याचा उपयोग होतो कां पहा असं सांगितलं. वंदना गिरीषकडं पोचल्या.

गिरीषची चिंचवडमधे ऊठबस होतीच. कामगार, युनियनचे पुढारी इत्यादींच्या मुलाखती त्यानी घेतल्या आणि चिंचवड गावाची माहिती देणारे लेख तयार केले. सगळ्या लेखांचा मिळून एक पूर्ण अंकच तयार झाला. अनेकांपैकी एका लेखावर गिरीष प्रभुणेंचं नाव. बाकीचे लेख प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी अशा विविध नावांवर.

हे गिरीषचं माणूसमधलं पहिलं लिखाण. या निमित्तानंच माजगावकरांची भेट झाली.  गिरीष दररोज डायरी लिहितो हे माजगावकरांना कळलं.

” तू असं कर. सांगवी सांडस या गावाला जा. तिथं ग्रामायननं केलेल्या प्रयत्नातून एक उपसा सिंचन योजना उभी होतेय. अनेक वर्षं योजना बंद पडली होती. अनेक कारणांसाठी. तिथं जा. महिनाभर रहा. तुला दिसतं ते लिहून पाठव. ” माजगावकर म्हणाले.

” तू डायरी लिहितोसच. मुक्कामात तू जे पहाशील, जे ऐकशील ते डायरीत लिहून ठेव. ते गाव, त्या गावाचा इतिहास, बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनेचा इतिहास इत्यादी गोष्टी लोकांकडून समजून घे. मग ते सगळं लिहून काढ. तुला जमेल. सर्व तपशील काटेकोरपणे गोळा कर. कागदपत्रंही हाताशी असूदेत.” माजगावकर म्हणाले.

त्यातून माणूसचा ग्रामायन विशेषांक निघाला. एक अख्खा अंक गिरीषच्या लेखांवर आधारलेला.

” मी निमगावला ग्रामायनचं काम करू लागलो  तेव्हां संघातले माझे सहकारी म्हणाले, गड्या तू बिघडलास, समाजवादी झालास. त्यांच्या मते माजगाकवर समाजवादी होते. संघानं शाखा घ्यायच्या, बौद्दिकं घ्यायची, सामाजिक परिवर्तनाचं काम करायचं नाही असं  संघाला वाटत असे…  माणूसमधे काम करत असताना मी विलासराव साळुंखेंच्या कामावर लिहिलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या. ….दलित रंगभूमीवरचे एक प्रख्यात रंगकर्मी टेक्सास गायकवाड यांची मुलाखत घेतली. ”

ग्रामायनमधे प्रभुणेंनी  भटके विमुक्तांच्या विकासाचे प्रकल्प केले. त्या काळात माजगावकर त्यांना म्हणाले ”  तेही काम चांगलंच आहे.  ते काम करत असताना लिहिणं मात्र सोडू नकोस.  तू लेखक आहेस, तू जे पहातोस त्यात तुझी लेखनसामग्री आहे. लिहित जा, आपण माणूसमधे प्रसिद्ध करत राहू. ”

प्रभुणेंची माजगावकरांशी चर्चा होत असे, त्यातून  विषय निघत. चर्चेमधे माजगावकर विषयाचे विविध पैलू कसे शक्य आहेत ते सांगत. कोणाला भेटता येईल ते सुचवत. एकूण पर्सपेक्टिव  देत.  अमूक एक प्रकारे लिही असं सांगत नसत.  नव्याच गोष्टी समोर येतील, त्याही पहा त्यातून जे दिसेल सुचेल ते लिही असं सांगत. कोणतंही बंधन नसे. लेखात बदल करत नसत.

डॉ. कुमार सप्तर्षी ‘ माणूस ‘ च्या सुरवातीपासून माजगावकरांच्या संपर्कात होते, ‘ माणूस ‘ मधे लिहीत होते.ते  मेडिकल कॉलेजमधे असतानाच युवकांना विविध सामाजिक प्रश्नांवर संघटित करत होते. पुणे जिल्ह्यात सुपे तालुक्यात  गावातले सवर्ण दलितांना पाणी भरू देत नव्हते. दलितांच्या विहिरी गाळानं भरल्यानं निरुपयोगी होत्या. सप्तर्षी आणि त्यांचे मित्र  एकत्र आले. सुप्यात गेले. तिथं दलितांच्या बैठका घेतल्या. त्यांना धीर दिला. पुण्यात पैसे गोळा केले. युवकांनी श्रमदान केलं. विहिरीतला गाळ काढून त्या वापरत्या केल्या.

माजगावकर सप्तर्षींचं वरील आंदोलन  पहात होते. समाजात एकूणातच काही कार्य, धडपड करणाऱ्या लोकांवर, विशेषतः तरुणांवर माजगावकरांचं लक्ष होतं. जमेल त्या वेळी माजगावकर सप्तर्षींच्या कार्यक्रमात सहभागी होत, पैसे गोळा करण्याच्या मोहिमेला हातभार लावत.सप्तर्षींच्या बैठकांना माजगावकर हजर रहात.

१९६७ मधे बिहारमधे दुष्काळ पडला.जयप्रकाश नारायण यांनी पुण्यात येऊन मदतीची याचना केली. बिहारमधे कशा प्रकारे मदत करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी सप्तर्षी  बिहारमधे गेले. जाण्यापूर्वी माजगावकरांशी चर्चा झाल्या होत्या. पाटण्यात गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीवर त्याची वार्तापत्रं माणूसमधून प्रसिद्ध झाली.

सप्तर्षी म्हणतात ”  माणूसमधे आलेल्या वार्तापत्रांचा परिणाम झाला होता. अनेक विद्यार्थी संघटनाही पुढं आल्या. आम्ही हिशोब काढला होता. बिहारमधे माणसाला एक वेळचं खाणं – खिचाडा – देण्याचा खर्च सुमारे ११ पैसे होता. आम्ही मोहिम चालवली. डेक्कनवर फलक लावले. -अकरा पैसे ही रक्कम तुम्हाला फार नाही पण त्या रकमेत एक बिहारी माणसं जिवंत रहातो, वगैरे. पैसे गोळा करण्यासाठी आम्ही बूट पॉलिश करण्याची मोहिम चालवली. बूट पॉलिशवाल्यांना सांगितलं की तुमच्या दिवसाच्या मिळकतीयेवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो, ते सामान वगैरे आमच्या हाती सोपवा. जनतेनं बूट पॉलिश भले करून घेतलं नसेल पण भरभरून रकमा दिल्या. याही घटनांची माहिती आणि फोटो माणूसमधून प्रसिद्ध झाले. गोळा झालेले पैसे थेट बिहारमधे पोचत असत. ते हिशोब  माणूसमधे प्रसिद्ध होत. माजगावकर सार्वजनिक पैशाच्या हिशोबाबाबत फार काटेकोर असत. ”

मुकुंद संगोराम पत्रकार झाले नव्हते त्या काळात माजगावकरांबद्दल ऐकून असत, भारावलेले असत. माजगावकरांच्या बैठकामधे ते जात असत. तिथं जाणं, बोलणं हे त्यांच्या लेखी एक धाडसच होतं. जवळ जवळ दररोज   संध्याकाळी ते माजगावकरांना भेटायचे. जवळच दत्त उपहार गृह होतं. ते माणूसचं ऑफिसच असल्यागत. तिथं जायचं. तिथं चांगली मिसळ मिळत असे. माजगावकरांना तिखट खाण्याचा त्रास होत असल्यानं ते चहा आणि शंकरपाळे खायचे. बाकीच्यानी मिसळ चापायची. काय वाचलं, काय पाहिलं यावर संगोराम व इतर हजर माणसं बोलायची.

” एकदा महेश एलकुंचवारच्या  पार्टी या नाटकाचा प्रयोग पुण्याला झाला होता. मी तो प्रयोग पाहिला होता. कोणतीही भीडभाड न ठेवता माजगाकरांसमोर बोलायची सवय आणि मुभा होती. मी माझ मत सांगितलं. त्या काळातल्या मध्यम वर्गाचं जगणं एलकुंचवारांनी एक्सपोज केलंय असं म्हणालो. माजगावकर म्हणाले – पुंडलीकनंही ते नाटक पाहिलय. त्यालाही त्यावर बोलायचंय. उद्या ऑफिसवर ये. दुसऱ्या दिवशी मी, पुंडलीक आणि माजगावकर पार्टी या विषयावर तास दीड तास बोललो. माजगावकर बोलत फार नव्हते, ऐकत होते. एका क्षणी त्यांनी मला थांबवलं अन् म्हणाले – तू लिहून काढ. पुंडलीकशी चर्चा कर.’ मी उडालोच. पुंडलिक कुठं आणि मी कुठं. त्यांनीच लिहिणं योग्य.  मी माझं बालिश लिखाण करणं बरोबर नाही असं मला वाटलं. मी माजगावकरांना तसं सांगितलं.माजगावकर म्हणाले – तू पुंडलीककडं जा. त्याच्याशी चर्चा कर आणि तूच लिहून काढ. ही तुझी जबाबदारी.’ मी पुंडलीकांशी चर्चा केली. लिहून काढलं. त्यांचं आणि माझं म्हणणं एकत्र गुंफलं. पुंडलिकांनी ते वाचलं. त्यात सुधारणा केल्या. मी ते लेखन माजगावकरांकडं सोपवलं. माजगावकरांनी त्याची कव्हर स्टोरी केली.   माझं नाव पहिलं आणि विद्याधर पुंडलिकांचं नाव दुसरं अशा संयुक्त नावानं लेख छापून आला. मी काय सांगू. धन्य झालो. माजगावकरांनी माझ्यासारख्या अगदी ज्युनियर माणसाच्या प्रथम नावानं लेख छापणं म्हणजे माझ्या लेखी केवढी मोठी गोष्ट होती. मी कायमचा त्यांच्याशी बांधला गेलो.

विजय कुवळेकरांनी नुकतीच पत्रकारीत उमेदवारी सुरु केली होती. तेही दत्त उपहारगृह या जर्नालिझम स्कूलमधे माजगावकर गुरुजींच्या अनौपचारिक वर्गात बसत. ” त्या दिवशी  दादू इंदुरीकरांचं निधन झालं होतं.  मी म्हणालो की दादू इंदुरीकर हा एक भारी माणूस आज गेला.”

माजगावकरांना इंदुरीकरांचा परिचय नव्हता.

” त्यांचं काय वैशिष्ट्यं आहे असं त्यांनी मला विचारलं. मी दादूच्या नकला करून त्यांना हसवलं. दादूचा गाढवाचं लग्न हा वग इचलकरंजीला  मी कोल्हापूरहून चालत जाऊन तो कसा पाहिला याची गोष्ट मी त्याना सांगितली. हा विषय क्लिक होणार असं त्यांना वाटलं. दादूबद्दल  माझी माहिती कितपत आहे इत्यादी गोष्टी त्यांनी जोखल्या आणि म्हणाले की जा उद्या या विषयावर लिहून आण. ”

दादू इंदुरीकरांवरचा लेख प्रसिद्ध झाला.

कुवळेकरांनी सांगितलेली आणखी एक हकीकत.

” जनता दल फुटला त्या वेळची गोष्ट. फुटलेल्या दोन्ही पक्षाच्या सभा कव्हर करत होतो. रमण बागेत जनसंघीयांची सभा झाली. तिथं हज्जारो माणसं हजर होती. सरस्वती शाळेत समाजवाद्यांची बैठक झाली. तिथं दोन तीनशेच माणसं. या सभेत पुढाऱ्यांचे रुसवे फुगवे झाले. समाजवाद्यांचे एक नेते नानासाहेब गोरे सभेच्या ठिकाणी नाराज झाल्याचं दिसलं. हे सारं मी माजगावकरांना सांगितलं. माझ्या बोलण्यात नानासाहेबांबद्दल थट्टेचा, टीकेचा सूर होता.

माजगावकर म्हणाले – छान. लिहून काढ. दोन पक्ष दोन सभा. पण नाना साहेबांबद्दल थट्टा, टीका करू नकोस. तू लहान आहेस, अननुभवी आहेस, तू नानासाहेबांयेवढ्या मोठ्या नेत्याबद्दल असं लिहिता कामा नयेस. तुझे मतभेद जरूर असतील पण गोरे हे शेवटी एक मोठे नेते आहेत, विचारवंत आहेत, त्यांची थट्टा आपण करता कामा नये. हे सारं ऐकूनही तुला जर नानासाहेबांबद्ल थट्टेचं विधान विचारपूर्वक करायचं असेल तर त्याला माझी आडकाठी नाही. मी ते जरूर छापेन आणि त्याची जबाबदारी घेईन.’

कुवळेकरांनी घरी गेल्यावर विचार केला. त्यांना माजगावकरांचं म्हणणं पटलं. त्यांनी टीका टाळून लेख लिहिला. माजगावकरांनी त्याची कव्हर स्टोरी केली.

साऱ्या जगात,  भारतभर काय चाललंय ते समजलं की वाचकाचा एक पर्सपेक्टिव तयार होतो. वाचक परसातल्या विहिरीत डुबक्या मारत राहिला तर त्याची समज त्याच्या परसापुरतीच मर्यादित रहाते. राज्यात, देशात इतरत्र चाललेल्या गोष्टी त्याला समजल्या तर त्याला आपल्या नजीकचं जगही वेगळं समजू लागतं. माहिती तर माध्यमात द्यावीच लागते पण त्या माहितीतून वाचकाचा पर्सपेक्टिव तयार करायला मदत करणं हे  पत्रकाराचं काम.

१९६० मधे ‘ माणूस ‘  साप्ताहिक जन्नाला आलं ते देश आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणच्या वास्तवात, दाहक वास्तवात, जनतेमधे निर्माण झालेल्या असंतोषात. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले आणि वाढलेले माजगावकर देश आणि महाराष्ट्राकडून अपेक्षा बाळगून होते. त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसेनात. त्यानाच नव्हे तर एकूण भारतीयांनाही तसंच वाटत होतं. हे वास्तव, हे सारं नवनवं समजून घ्यावं, मांडावं असं माजगावकारांना वाटलं.

माजगावकरांबद्दल सप्तर्षी म्हणतात ” माजगावकर आमच्याशी बोलताना पुग सहस्रबुद्धे यांच्या शिकवणुकीचा उल्लेख नेहमी करत असत. सहस्रबुद्धे यांचा प्रभाव ते आणि त्यांचे जवळचे मित्र विद्याधर पुंडलीक, सह देशपांडे यांच्यावर होता. पुग रास्व संघाचे बौद्धिक प्रमुख होते. पण त्याच बरोबर ते एक वैचारिक म्हणूनही पुण्यात ओळखले जात. संघाच्या बाहेरचीही माणसं त्यांच्या बैठकांतून प्रेरणा घेत असत. मीही त्यांचा अभ्यास आणि वक्तृत्व यानं प्रभावित झालो होतो, त्यांच्याकडं अनेक वेळा मी जात असे.पुगंचं म्हणणं होतं की स्वतंत्र भारताला चांगल्या पत्रकाराची आवश्यकता आहे. माजगावकरांनी मराठी आणि इतिहास  विषय घेऊन एमए केलं होतं. त्यांच्यासमोर दोन करियर होत्या. प्राध्यापक किंवा संघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता. दोन्ही गोष्टी न करण्याचा निर्णय माजगावकरांनी घेतला, पत्रकार व्हायचं ठरवलं. हा पुगंचा प्रभाव होता. पुंडलीक पत्रकारी न करता कविता करायला लागले याचं दुःख पुगंना झालं होतं. माजगावकरांनी अगदी ठरवून, विचारपूर्वक पत्रकारी जीवन पत्करलं होतं.”

माजगावकरांचं व्यक्तिमत्व, माजगावरांचा राजकीय कल, माजगावकरांचं संपादक असणं या बद्दल सप्तर्षी म्हणतात,  ” आम्ही विचारानं समाजवादी आणि गांधीवादी. आम्हाला मार्क्सही जवळ वाटायचा, आंबेडकर आणि फुलेही जवळ वाटायचे. आम्हाला घडवण्यात राम बापट यांचा मोठा हात होता. आम्ही सतत आंदोलनं करायचो. आम्हाला क्रांती करायची होती, निवडणुकांचं राजकारण आम्हाला मान्य नव्हतं. राजकीय पक्षांशी आमचं जुळत नसे. त्यामुळं विचारानं जवळचे असूनही आम्ही समाजवादी पक्षापासून अंतर राखून असायचो. माजगावकर हे सारं जवळून पहात होते. माजगावकर समाजवादी नव्हेत. त्यांना  संघाची आपुलकी होती. तरीही ते आमच्या सोबत असायचे, हातचं राखून न ठेवता. याचं काय कारण असावं याचा शोध मी घेतो तेव्हां मला वाटतं की त्यांचा स्वभाव बंडखोरीचा होता. संघात असले तरीही ते बंडखोर होते. संघाचं देशप्रेम आणि देशाची सेवा या गोष्टी त्यांना आवडत होत्या पण शाखेसारख्या निष्क्रीय गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. संघानं समाजात उतरून कामं करावीत, शेतकरी-दलित-कामगार इत्यादी वर्गात संघानं उतरावं असं त्यांना वाटत असे. हा बंडखोरपणाच आमच्यातला समान धागा असावा. ”

माजगावकर यांचं संपादन म्हणजे काय होतं ते मुकुंद संगोराम सांगतात – संपादकांला द्याव्या लागणाऱ्या मजकुराचे दोन प्रकार असतात. एक मजकूर असतो वाचकांना हवा असलेला. तो द्यावाच लागतो, गत्यंतर नसतं. दुसरा   म्हणजे संपादकाला वाचकानी वाचावा असं वाटतं असा मजकूर. तो वाचक आनंदानं वाचतीलच असं नाही. आज वाचकांना आवडणारा मजकूर दिला जातो. तो दिल्यावर उरलेल्या जागेत असतात जाहिराती. लोकांनी वाचावा असं वाटणारा मजकूर द्यायला जागाच नसते.   असा काही मजकूर असावा असं वर्तमान काळातल्या संपादकांना वाटतच नाही. आताच्या संपादकांना स्वतःचं असं मतच राहिलेलं नाही. माजगावकरांच्या काळात सोबत होतं, किर्लोस्कर होतं, मनोहर होतं. सोबतनं अत्रेंच्या स्टाईलची एकतरफी आक्रमक पत्रकारी चालवली होती. बाकी  संपादकाना  स्वतःची मतंच नव्हती. माजगावकरांनी यातली मधली वाट शोधली होती. आक्रमक नाही,    वेगळा विचार करायला लावणाऱ्या  बाजू. वाचक जिथं वळायलाही तयार नाहीत अशी बाजू. वाचक विहिरीत रहातात. विहिरीतल्या वीस फूट परिघातल्या गोष्टीच संपादक वाचकांना देत. माजगावकर विहिरीच्या पलिकडं जाऊन वाचकाना जग दाखवत असत. चीनमधे काय चाललंय, रशियात काय चाललंय ते माजगावकर वाचकाना दाखवत, वाचायला लावत. चे गवारा काय, माओ काय. कोण मराठी माणूस या लोकांची नावं कधी ऐकणार होता की त्यांच्याबद्दल वाचणार होता. त्या काळात नक्षलवाद उफाळून आला होता. शहरात रमलेला मराठी माणूस कशाला मरायला नक्षलवाद समजून घेईल. तिकडं धुळ्यातल्या आदिवासींचे प्रॉब्लेम्स होते. तत्कालीन मराठी वर्तमानपत्रं आणि ती चालवणारे संपादक या गोष्टी समजूनही घेऊ शकत नव्हते, त्यावर मजकूर देणं तर सोडाच.  साप्ताहिकात, पुरवणीत खेळ, नाटक, संगित, चित्रपट इत्यादी गोष्टी देऊन चुटकीभर राजकारण दिलं जात असे. माजगावकरांनी राजकारण, अर्थकारण, समाजकारण इत्यादी गोष्टी लोकांसमोर ठेवल्या.

माजगावकरांनी उंबऱ्याबाहेरचं जग वाचकांसमोर ठेवलं. तो काळ लक्षात घ्या. दया पवारांचं बलुतं नंतरचं. त्या आधी हंसा वाडकर यांचं सांगत्ये ऐका. हंसा वाडकरांनी गावकुसाबाहेरचं जग माणूसमधे वाचकांसमोर ठेवलं. पुण्या मुंबईतल्या मध्यम वर्गीय लोकांना माहित नसलेलं हंसा वाडकर यांचं जग. माजगावकर जे जगत होते त्याहीपेक्षा खूपच वेगळं.  हे वेगळं जग काय आहे ते जाणून घेण्याची उत्सूकता आणि मोकळेपणा माजगावकरांकडं होता. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून हंसा वाडकरांचं जग माजगावकरांनी माणूसमधे मांडलं, नंतर त्याचं पुस्तकही केलं.”

१९६१ च्या जून महिन्यात माणूस या नियतकालिकाचा (पाक्षिक) पहिला अंक पुण्यात प्रसिद्ध झाला. श्री.ग. माजगावकर यांनी नियतकालिकासाठी काहीही पैशाची सोय नसतांना आणि  स्टाफवर एकही माणूस नसतांना हे पाक्षिक प्रसिद्ध केलं. १९८५ सालच्या जून महिन्यात ‘ माणूस ’ चा शेवटला अंक प्रसिद्ध झाला.

स्वातंत्र्य चळवळीत जनमानसामधे स्वतंत्र भारताबद्दल खूप आशा निर्माण झाल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सुजलाम, सुफलाम इत्यादी होणार असं नागरिकांना वाटत होतं. स्वातंत्र्यानंतर भारतानं राज्यघटना तयार केली, नियोजन मंडळ उभं केलं आणि पंचवार्षिक योजनेतहत विकास प्रयत्नांना सुरवात केली. १९५२ मधे पहिल्या निवडणुका पार पडल्या. नागरीक अधीर होते.  सारे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असं त्यांना वाटत होतं. स्वातंत्र्य पूर्व काळात केवळ राजकीय स्वातंत्र्यावर भर दिल्यानं आर्थिक- सामाजिक प्रश्नांची जटिलता आणि तो सोडवणं किती कठीण आहे याची कल्पना नागरिकांना नव्हती. सरकार स्थापन होऊन, निवडणुका झाल्यानंतर अधीर नागरिकांना वास्तवाचे चटके बसू लागले. भारतातलं आर्थिक सामाजिक वास्तव नागरिकांच्या लक्षात येऊ लागलं.

१९६० च्या सुमाराला वास्तवाचे चटके बसू लागल्यावर संवेदनशील व्यक्तींना वास्तव समजून घेण्याची, समजून देण्याची आवश्यकता भासू लागली. श्री.म. माजगावकर तरूणपणातच सामाजिक कार्याकडं आकर्षित झालेले होते. रास्व संघ, सावकर ही त्यांची प्रेरणास्थानं होती. आपण समाजिक कार्यासाठीच जन्मलो आहोत अशी त्यांची धारणा होती.  स्वतंत्र भारताला चांगल्या पत्रकारांची जरुरी आहे कारण देशाची सर्वांगिण वैचारिक तयारी करण्याची आवश्यकता आहे असं माजगावकर सहस्रबुद्धे यांच्याकडून शिकले होते. या प्रेरणेतूनच त्यांनी माणूस हे पाक्षिक सुरू केलं.

पुढली पंचवीस वर्षं माजगावकरांनी ‘ माणूस ’ जवळपास एकहाती चालवलं. जग, भारत आणि महाराष्ट्र या भूगोलात घडणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक अशा सर्व अंगांचं भान आणून देणारा मजकूर माजगावकरांनी प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातल्या नामांकित आणि होतकरू अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना त्यांनी लिहितं केलं.

भारतातल्या सर्व राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारांना आणि चळवळींना माणूसनं प्रसिद्धी दिली. पण माजगावकर कोणत्याही चळवळीतले कार्यकर्ते झाले नाहीत. अनेक विधायक कामं, अनेक संस्था उभ्या करण्यात आणि चालवण्यात माजगावकरांचा वाटा होता. परंतू माजगावकर त्या संस्थांत गुंतले नाहीत. ती ती कामं माजगावकरांनी   मजकुराच्या रूपात वाचकांसमोर मांडली.

संपादनाची एक विशेष शैली त्यांनी मराठी पत्रकारीत सिद्ध केली. वाचकांना सारे तपशील आणि कंगोरे कळावेत यासाठी मजकुराची लांबी पुरेशी आणि भरपूर ठेवलेली असे. कित्येक वेळा पूर्ण अंक एकाद्या विषयाला वाहिलेला असे. प्रसिद्ध होणारा मजकूर अकॅडमिक शैलीतला नसे पण अकॅडमिक गंभीरता आणि पुरावे यांचा समावेश मजकुरात असे. मजकूर अजिबात गंभीर असे. त्यात छचोरपणा, उथळपणा, विनाकारण सनसनाटी निर्माण करणं, टिंगल टवाळी, खोटी टीका किंवा भावूक स्तुती यांना वाव नव्हता.

वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार घडवणारी पत्रकारी माजगावकरांनी घडवली.

 

।।

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

6 thoughts on “वस्तुनिष्ठ, तपशीलवार, चौफेर, सखोल, विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर.

  1. माजगांवकर बरेंच जवळून पाहिलेलं स्मरतंय..
    पण या लेखांत त्याही पलीकडले खूप जवळून पाहायला मिळाले…
    परुळकर, मुकुंद, हर्डीकर वगैरे त्या काळापासूनची स्नेही मंडळी परत भेटली..
    खूप बरं वाटलं..

    अरुण काकतकर

  2. ‘माणूस’चा मी एक नियमित वाचक होतो. आपण श्री. ग. यांचे केलेले वस्तुनिष्ठ मूल्यमापन आवडलं.
    हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा आणि पारायण करावा असा आहे.
    धन्यवाद.
    मंगेश नाबर

  3. विचार- घडवणारं सा.माणूस, घडवणारे माजगावकर has been quite an individual who not only contributed social realities usually unknown to India’s urban people but in the process he could spot where talent can be found in writers who would conduct an in depth research of the facts and then put in to writing in their own words with minor finishing touches of his own before publishing in the weekly ‘ माणूस ’. Wish there was a reference to Bhanu Kale’s (Editor Antarnad) recent book ‘Angaryatra’ -shodh Sharad Joshincha, especially under the current scenario of farmers committing suicides and politicians making an issue of it to forgo farmer’s debt (not the accumulated interest on it) as if state and central governments have been bloated with surplus revenues. I guess, ‘माणूस ’ can come up with full issues for months to come because even the rich farmers (if politicians -how lucrative) have been suspected of washing off their hands in such an opportunity, while farmers are selling their produce and crop at throw away prices and remain hungry in poverty.

  4. A correction to previous submission: Title of the book by Bhanu Kale should have been: *अंगारवाटा, शोध शरद जोशींचा*

  5. Excellent article. I have been in the USA for over 22 years though while in India was a regular reader of Manus and admired it immensely. Nice to read the background stories of how he motivated some great contributors to society to write for Manus.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *